सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके पाऊस मिळाल्याची सूचना आहे. अशा प्रकारचे पाऊस येत्या आठवड्यामध्ये पुणे, सांगली व सोलापूर भागातील एखाद-दोन ठिकाणी आज गुरुवार (ता. १८) नंतर सोमवार (ता. २२) पर्यंत होण्याची शक्यता आहे. पुढे बुधवारी (ता.२४) सोलापूरच्या जवळपासच्या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता दिसते. सर्वच भागांमध्ये २२ तारखेपर्यंत निश्चितपणे अधूनमधून ढगाळ वातावरण राहणार आहे.
नाशिक विभागामध्ये शनिवार, रविवार (ता. २०, २१) वगळता पावसाची शक्यता कमी आहे. पुणे विभागामध्ये जुन्नर, बोरी, यवत, पाटस, बारामती या भागांमध्ये २० ते २२ तारखेपर्यंत हलक्या पावसाच्या एक दोन सरी मिळू शकतील. सांगली विभागामध्ये कवठेमहांकाळ, खानापूर, पळशी, विटा, तासगाव या पट्ट्यामध्ये ता. १८ ते २१ व नंतर २६ तारखेच्या आसपास पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. मिरज भागामध्ये कालच्या पावसाच्या नंतर २५ तारखेपर्यंत पावसाची शक्यता दिसत नाही. सोलापूर विभागामध्ये सर्वच भागांमध्ये अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता आहे. नानज, काटी, कारी, उस्मानाबाद, तुळजापूर, वैराग, बार्शी या भागामध्ये २१ ते २६ तारखेपर्यंत हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. ढगाळ वातावरण आणि पाऊस या दोन्ही वातावरणामध्ये सर्वच भागामध्ये अजूनही भुरीची शक्यता जास्त दिसते. छाटल्यानंतर काड्याच्या पृष्ठभागावर राहिलेल्या भुरीचे बिजाणू व भुरीच्या अवशेषातून भुरीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अलीकडेच छाटलेल्या बागांमध्ये फूट बाहेर निघण्याच्या आधी सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारून घ्यावे. या फवारणीमुळे भुरीची लागण नवीन फुटीवर लवकर होणार नाही. बऱ्याचशा बागा पोंगा अवस्थेमध्ये असतील. पोंगा अवस्थेतील बागांमध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्याची घाई करू नये. हलका पाऊस भागामध्ये झालेला असला तरीही जास्त आर्द्रता व सकाळचे दव जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत डाऊनीचा धोका जास्त नाही. पोंगा अवस्थेमध्ये डायथायोकार्बोमेट वर्गातील बुरशीनाशक ( मॅन्कोझेब किंवा प्रोपीनेब किंवा मेटीराम, प्रमाण ः२ ग्रॅम प्रति लिटर) फवारावे. तीन पाने अवस्था आल्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्या फवारणीची जरूरी असते. सकाळचे दव जास्त पडत असले तरच डाऊनी मिल्ड्यूचा धोका असतो. तीन पाने अवस्थेमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यात डायमिथोमॉर्फ १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम (टॅंक मिक्स) प्रति लिटर किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रोपीनेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर यांचा वापर करावा. काही ठिकाणी मोठे पाऊस झाले आहेत. अशा बागांमध्ये पाणी साठलेले असल्यास त त्याचा निचरा करण्याकडे जास्त लक्ष द्यावे. पाऊस सगळीकडे पडत नसल्यामुळे वातावरणातील आर्द्रता जास्त वाढत नाही. बागेत पाण्यचा चांगला निचरा व खेळती हवा नसल्यास आर्द्रता वाढते, त्यामुळे रोगाचा धोका वाढतो. बागेमध्ये आर्द्रता न वाढू दिल्यास रोगाचा धोका आपोआप कमी होतो. म्हणूनच फवारणीपेक्षा बागेतील निचरा आणि हवा खेळती राखण्याकडे लक्ष द्या. संपर्क ः ०२० -२६९५६००१ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)