कॅनोपीमध्ये वाढू शकतो भुरीचा प्रादुर्भाव

कॅनोपीमध्ये वाढू शकतो भुरीचा प्रादुर्भाव
कॅनोपीमध्ये वाढू शकतो भुरीचा प्रादुर्भाव

हवामान अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही भागात पावसाची शक्यता दिसत नाही. तापमानही बहुतांश ठिकाणी स्थिर राहण्याची शक्यता आहे. सोलापूर, लातूर, जालना या भागात तापमान ४०-४२ अंश सेल्सिअस राहील, तर अन्य भागामध्ये ३७-३९ अंश सेल्सिअस राहू शकेल. उर्वरित भागामध्ये थोड्याफार प्रमाणात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता दिसते. एकूण साऱ्या परिस्थितीचा विचार करता बाष्पीभवनाचा वेग (पॅन) १० मि.मी.च्या आतच असेल. वाऱ्याचा वेगही कमी असेल. वातावरणातील वरील स्थितीचा सध्या द्राक्ष बागेमध्ये असलेल्या विविध स्थितीमध्ये खालील उपाययोजना उपयुक्त ठरतील.

लवकर छाटणी केलेली बाग ः पुणे नजीकच्या इंदापूर, नाशिक येथील सटाणा भागामध्ये खरड छाटणी लवकर घेतली जाते. या भागात आता कॅनोपी पूर्ण तयार झालेली आहे. सबकेन तयार झालेले आहेत किंवा शेवटच्या टप्प्यात असतील. अशा बागेमध्ये पाने जुनी होत आहेत. अशा स्थितीमध्ये ढगाळ वातावरणामध्ये जुन्या होत असलेल्या कॅनोपीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

उपाययोजना ः

  • भुरीच्या प्रतिबंधासाठी कॅनोपी मोकळी करणे उपयुक्त ठरू शकते. मोकळ्या कॅनोपीमध्ये हवा खेळती राहून भुरीसाठी पोषक वातावरण तयार होणार नाही.
  • यासोबत आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी फायद्याची ठरेल. यासाठी ट्रायाझोल गटातील हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी याचा वापर करता येईल.
  • दाट कॅनोपीमध्ये आधीच प्रादुर्भाव झालेला असल्यास वरील फवारणी उपयुक्त ठरू शकेल.
  • वेळेवर छाटणी केलेली बाग ः या बागेमध्ये सध्या फुटी निघालेल्या असतील किंवा काही परिस्थितीमध्ये विरळणी ते सबकेन करण्याच्या स्थितीमध्ये बाग असेल. सध्याचे तापमान यावेळी फुटींच्या चांगल्या वाढीसाठी पोषक असे आहे. ज्या बागेत नवीन फुटी निघाल्या आहेत, परंतू पुन्हा काही फुटी निघत असतील, अशा स्थितीमध्ये वेलीवर पाण्याची फवारणी २ ते ३ दिवस करावी. यामुळे कमी होत असलेल्या तापमानामध्ये आर्द्रता वाढून उशिरा निघणाऱ्या फुटी निघण्यास मदत होईल. यावेळी नत्राचा वापर काळजीपूर्वक व्हावा. कारण सबकेन झाल्यानंतर जेव्हा बगलफुटी निघायला सुरवात होते, त्यावेळी वेलीमध्ये सूक्ष्म घडनिर्मितीची अवस्था सुरू होते. अशा वेळी वेलीचा जोम वाढल्यास घडनिर्मितीत अडचणी येऊ शकतात. ज्या बागेमध्ये सबकेन केल्यानंतर वेलीचा जोम अधिक असतो, त्या ठिकाणी स्फुरद जास्त आणि पालाश कमी असलेल्या खताच्या ग्रेडचा वापर करावा. जास्त जोम असलेल्या परिस्थितीमध्ये बागेत सल्फेट ऑफ पोटॅश (०-०-५०) एकरी ५ किलो प्रमाणामध्ये जमिनीतून देता येईल.

    रिकट घेतलेली बाग ः या बागेत ओलांडा तयार होत असताना त्यावर निघालेल्या बगलफुटी चांगल्या वाढाव्यात, या उद्देशाने बागायतदार विविध प्रकारच्या टॉनिक आणि संजीवकांचा वापर अधिक प्रमाणात करतात. यामुळे वेलीत वाढ व संजीवकांचे संतुलन बिघडते. बऱ्याच वेळा बागेमध्ये मोकळे पाणी दिले जाते. जास्त तापमान असलेल्या स्थितीमध्ये मोकळे पाणी दिल्यानंतर ३-४ दिवसांमध्ये वेली अचानक सुकायला सुरुवात करतात. हे टाळण्यासाठी संजीवकांचा अति वापर होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे अशा बागेत मोकळे पाणी देऊ नये.    ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०- २६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com