पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये ही अत्यल्प प्रमाणात लागतात. मात्र, ती पिकाच्या जीवनक्रमात महत्त्वाची भूमिका निभावतात. तसेच ती कीड रोगाच्या नियंत्रणासाठीही मदत करतात. पिकाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांच्या पुरवठ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. मात्र, अत्यंत कमी प्रमाणात लागणाऱ्या अन्य मूलद्रव्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये फारशी जागृती नाही. त्यांची आवश्यकता प्रमाणामध्ये अत्यल्प असली तरी एकूण जीवनक्रमाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये महत्त्वाची असतात.
लोह, जस्त, तांबे, बोराॅन, मंगल, माॅलिब्डेनम, क्लोरीन आणि निकेल अशी एकूण ८ मूलद्रव्ये आहेत. प्रमुख अन्नद्रव्यांच्या तुलनेमध्ये यांची आवश्यकता कमी असल्याने त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात. त्यांचा उपयोग वनस्पतीमध्ये उत्प्रेरक निर्मितीचे कार्य, हरितद्रव्य निर्मिती, फूल व फळधारणेस मदत आणि प्रथिने तयार करण्यात होतो. सोडियम, सिलिकाॅन, कोबाल्ट आणि व्हॅनाडियम ही पिकासाठी हितकारक सूक्ष्मअन्नद्रव्ये मानली जातात. हितकारक सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास मिळाली नाही तर पिकाचा जीवनक्रम पूर्ण होऊ शकतो, परंतु मिळाल्यास पिकास त्याचा फायदा होतो. उदा. सिलिकाॅनचा भातास पुरवठा केल्यास भातामध्ये खोड किडींची प्रतिकारशक्ती वाढते. सर्वसाधारणपणे सूक्ष्मअन्नद्रव्यांची जमिनीतील उपलब्धता ही जमिनीचा सामू, क्षारता, मुक्त चुनखडीचे प्रमाण, पाण्याच्या निचऱ्याची स्थिती, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, जमिनीमध्ये राबवली जाणारी पीक पद्धती व जमिनीचा प्रकार अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. अन्नद्रव्याची लक्षणे झाडाच्या किंवा फांदीच्या वेगवेगळ्या भागात दिसता. काही वनस्पतीमध्ये चलन होणाऱ्या अन्नद्रव्यांच्या (उदा. जस्त, माॅलिब्डेनम यांच्या) कमतरतेची लक्षणे खालच्या जुन्या पानांवर प्रथम दिसतात. याउलट वनस्पतीतील स्थिर / अचल अन्नद्रव्ये (उदा. तांबे, लोह, मंगल आणि क्लोरीन) कमतरतेची लक्षणे शेंड्याकडील भागात, नवीन कोवळ्या पानांवर दिसतात. सूक्ष्मअन्नद्रव्ये कमतरतेची कारणे
संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांमुळे अधिक शोषण व अधिक वापर. सेंद्रिय भर खतांचा कमी वापर. अन्नद्रव्यांचा रासायनिक खतांद्वारे अमर्यादीत किंवा असंतुलित वापर. एकसारखी सलग किंवा बहुपीक चक्र पद्धतीचा अवलंब केल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अधिक शोषण. पिकांची फेरपालट न केल्यामुळे पिकाकडून एकाच प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अधिक शोषण. जास्त पाणी, कमी सेंद्रिय पदार्थाचा वापर यामुळे ढासळत चाललेले जमिनीचे आरोग्य. सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतांचा अतिशय कमी वापर. डॉ. अनिल दुरगुडे, ९४२०००७७३१ महेश आजबे, ९७६६६६५०८४ (डॉ. दुरगुडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे रसायनशास्त्र विभागांतर्गत सूक्ष्म अन्नद्रव्ये संशोधन योजनेत विश्लेषक आहेत, तर आजबे व राऊत हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.)