दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्व

दुग्धोत्पादनमध्ये पाण्याचे महत्त्व
दुग्धोत्पादनमध्ये पाण्याचे महत्त्व

पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण घटते. रक्त घट्ट होते आणि त्यामुळे रक्ताभिसरण क्रियेत अडथळा निर्माण होतो. पाणी कमी पडल्यास पचन क्रिया मंदावते आणि दूध देण्याचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी घटते. जनावरांची प्रजनन क्षमता ढासळते. हे लक्षात घेऊन जनावरांचा पुरेसे पाणी पाजावे.

पशुव्यवस्थापनामध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जनावरांच्या शरीरात ५० ते ९५ टक्‍क्यांपर्यंत पाणी असते. ते गर्भावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत कमी-कमी होत जाते. सदृढ जनावरांच्या शरीरात एकूण वजनाच्या ५० ते ६० टक्के पाणी असते. गरोदरपणाच्या सुरवातीच्या काळात प्राण्यांच्या गर्भात ९५ टक्के पाणी असते.

  • नवजात वासराच्या जन्मावेळी त्याच्या शरीरात ७५ ते ८० टक्के व ५ ते ६ महिन्यांच्या वासराच्या शरीरात ७० टक्के पाणी असते. जसजसे वासराचे वय वाढत जाते, तसतसे त्याच्या शरीरातील पाण्याची मात्र कमी होत जाते.
  • पाणी हे जनावरांच्या शरीरातील प्रत्येक अवयवांमधील महत्त्वाचा घटक आहे. रक्तामध्ये ९० ते ९२ टक्के तर स्नायूंमध्ये ७२ ते ७८ टक्के पाणी असते. हाडांमध्ये व दातांमध्येही पाण्याचा अंश असतो. जनावरांच्या दुधामध्ये ८६ टक्के पाणी असते.
  • जनावरांच्या शरीरातील पाण्याचे मुख्यतः तीन स्रोत आहेत यामध्ये अन्न, प्यायलेले पाणी व शरीरात उपलब्ध असलेले पाणी. हे पाणी जनावरांच्या शरीरात दोन प्रकारे उपलब्ध असते. एक म्हणजे मुक्तपणे वाहणारे पाणी जसे रक्त, दूध, मूत्र व दुसरे म्हणजे बंधिस्त पाणी जसे की शरीरातील प्रथिने व विकरे. जनावरांच्या शरीरातील सर्व रासायनिक क्रिया या मुख्यत्वे बंधिस्त पाण्यात घडून येतात. शरीरात मुक्तपणे वाहणाऱ्या पाण्यात रासायनिक क्रिया अतिशय कमी प्रमाणात घडतात अथवा घडतही नाहीत.
  • पाण्याची गरज ः १) पाणी शरीराची लवचिकता टिकवून ठेवते. शरीरातील विविध स्त्राव, रक्त, लाळ, सांध्यातील वंगण इत्यादी सर्व पाण्यानी बनलेले असते. घामामार्फत व रक्ताभिसरण करून शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. २) शरीरातील विविध रासायनिक क्रिया पार पाडण्यासाठी तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीवाटे बाहेर काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ४) पचनक्रियेत अन्नघटक पाण्यात विरघळून त्याचे संपूर्ण शरीरात विलयन होते आणि शरीरातील सर्व पेशींना पोषणद्रव्ये पुरवली जातात. पाणी चाऱ्याला कोठी पोटात भिजवून किण्वन प्रक्रियेस मदत करते. चाऱ्याचे योग्य पचन होण्यासाठी गरज असलेली लाळ आणि पाचक द्रव्येसुद्धा पाण्यापासून बनलेली असतात. चाऱ्यातील घटक विरघळून ते रक्तामार्फत शरीरभर पोचविण्याचे आणि चाऱ्यातील न पचलेला भाग आतड्यातून बाहेर नेण्यासाठी पाणी मदत करते. कमतरतेची लक्षणे ः १) पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातून विषारी पदार्थ मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे बाहेर टाकण्यास अडथळा निर्माण होतो. मूत्रपिंड व मूत्राशयावर विपरीत परिणाम होतो. २) जनावरांची प्रजनन क्षमता ढासळते. जनावरांचे पाय बधिर होतात. ३) शरीरातील रक्ताचे प्रमाण घटते. रक्त घट्ट होते आणि त्यामुळे रक्ताभिसरण क्रियेत अडथळा निर्माण होतो. ४) पाणी कमी पडल्यास पचन क्रिया मंदावते आणि दूध देण्याचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी घटते. पाण्याच्या आभावामुळे डोळे व कातडी कोरडी पडते. जनावरांच्या उत्पादन क्षमतेत आणि वजनात घट होते. जनावरांमध्ये शरीरातील एकदशांश पाणी जरी कमी झाले, तरी जनावर दगावण्याची शक्‍यता असते. जनावरांसाठी पाणी व्यवस्थापन : १) नेहमी स्वच्छ, ताजे पाणी पिण्यास द्यावे. ते मुबलक प्रमाणात असावे. पाण्याचे तापमान खूप कमी किंवा जास्त नसावे. पाण्याचे तापमान १६ ते २६ अंश सेल्सिअस असावे. दिवसातून कमीत कमी तीन वेळेस पाणी पाजावे. २) उन्हाळ्यात दुभत्या जनावरांना पाणी दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चारवेळा दिल्यास जनावरे १५ ते २० टक्के अधिक दूध देतात. गायी-म्हशींना पाणी कमी पाजल्यास त्यांची दुग्धोत्पादन क्षमता असतानाही घट येते. ३) जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे प्रमाण जास्त असल्यास जनावरे कमी पाणी पितात. कारण, हिरव्या चाऱ्यामार्फत त्यांची पाण्याची गरज काही प्रमाणात भागविली जाते. कारण, हिरव्या चाऱ्यामध्ये ६५ ते ८५ टक्के पाणी असते. १५ ते ३५ टक्के शुष्क भाग असतो. मात्र, उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, त्यामुळे अशा काळात जनावरे सुका चारा जास्त प्रमाणात खातात आणि त्यामुळे त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. सुक्‍या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण फक्त १० ते १५ टक्के एवढे असते. एक किलो शुष्क खाद्य पचवण्यासाठी ४ ते ५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ४) कळपात नवीन आणलेली जनावरे शक्‍यतो पाण्यातील बदलामुळे पाणी कमी पितात. अशावेळी पाण्यात थोडा गूळ मिसळून पाजावे म्हणजे नवीन जनावरे पाणी आवडीने पितात. ५) गाय व म्हैस दिवसाला साधारण ४५ ते ६० लिटर पाणी पिते. गायीने खाल्लेले शुष्क पदार्थ आणि पाणी पिण्याचे गुणोत्तर १:३ एवढे असते. शेळ्या, मेंढ्या प्रतिदिवस ४ ते ६ लिटर पाणी पितात आणि त्यांचे शुष्क पदार्थ आणि पाणी पिण्याचे प्रमाण १:४ एवढे असते. कोंबड्या प्रतिदिन २०० ते २५० मिलि पाणी पितात. ६) एक लिटर दूध निर्माण करण्यासाठी ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. डॉ. गोपाल मंजुळकर,९८२२२३१९२३ (विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान), कृषि विज्ञान केंद्र, सिसा (उदेगाव), अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com