रांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न पाहिजे असल्यास कांदा उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. सध्याचा काळ रांगडा कांद्याची रोपवाटिका तयार करण्याचा आहे. जमीन ः कांदा पिकाची मुळे खूप खोलवर जात नाहीत. म्हणून पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन योग्य असते. चोपण किंवा क्षारपड जमिनीत कांदे चांगले पोसत नाहीत. अशा जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. हलक्या मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा केल्यास चांगले उत्पादन मिळते. जाती ः लागवडीकरिता डेंगळे न येणारी, जोड कांद्यांचे प्रमाण कमी असणारी आणि गरज भासल्यास निदान दोन ते तीन महिने कांद्याची साठवणयोग्य जातीची निवड करावी. रांगडा हंगामासाठी भीमा सुपर, भीमा रेड, भीमा राज, भीमा शक्ती आणि भीमा शुभ्रा या सुधारित जाती कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केल्या आहेत.
एक हेक्टर कांदा लागवडीसाठी सुमारे पाच गुंठे रोपवाटिका पुरेशी होती. रोपवाटिकेची जागा सूर्यप्रकाशाची व विहिरीजवळ असावी. लव्हाळा किंवा हरळीसारखी गवते त्यात नसावीत. रोपवाटिकेच्या जागेत लोखंडी नांगराने खोल नांगरणी करावी. नंतर दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे बनविण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे आणि दगड गोटे काढून टाकावेत. तणाची शक्यता असल्यास किंवा शेणखतातून तण होण्याची शक्यता असल्यास वाफे बी पेरण्यापूर्वी भिजवून, त्यातील तण उगवून आल्यानंतर खुरपणी करून घ्यावी. त्यावर कांद्याचे बी पेरावे. गादी वाफ्यावर रोप तयार करण्याचे फायदे ः
रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांच्या भोवती पाणी साचून राहत नसल्याने रोपे कुजणे किंवा सडणे हा प्रकार होत नाही. लागवडीसाठी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड आणि लवकर तयार होतात. रोपवाटिकेसाठी गादी वाफे एक मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब करावेत. वाफ्याची उंची १५ सें.मी. ठेवावी. गादी वाफे नेहमी जमिनीच्या उताराला आडवे करावेत. पेरणीपूर्वी ५०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत १.२५ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी टाकून जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळावे. रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघ पाडाव्यात. त्यात बी पातळ पेरून मातीने किंवा कुजलेल्या शेणखत, कंपोस्ट खताने झाकून टाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे. दोन ओळीत अंतर राखल्यामुळे खुरपणी किंवा माती हलवणे ही कामे सुलभ होतात. पुनर्लागवडीवेळी रोपे वाफ्यामधून सहज उपटून काढता येतात. बीज प्रक्रिया ः पेरणीपूर्वी थायरम २ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बी फोकून रोपे करण्यातील तोटे ः
यात दोन ओळी आणि रोपे यामध्ये समान अंतर राखता येत नाही. बी काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी एकदम पातळ पडते. खुरप्याने हलवले तरी अपेक्षित खोलीपर्यंत जात नाही. परिणामी दिलेल्या पाण्यासोबत वाहून ते वाफ्याच्या बाजूला जमा होते व रुजते. तिथे रोपांची दाटी होते. दाटीमुळे रोपे नुसतीच उंच वाढतात, पिवळी पडतात आणि गाठ धरण्यास उशीर होतो. खुरपणी किंवा विरळणी ही कामे करणे अवघड होते. लागवडीलायक रोपे कमी मिळतात. केवळ रेघा पाडायचा कंटाळा केल्यामुळे रोपांचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत रोपांचे नुकसान होऊ शकते. गादी वाफे करता न आले तरी सपाट वाफ्यामध्ये रेघा पाडून पेरणी करावी. सिंचन ः १) पाटाने पाणी देताना
बी पेरल्यानंतर शक्यतो पहिले पाणी झारीने द्यावे. वाफ्यांचे प्रमाण जास्त असल्यास, झारीने पाणी देणे जिकिरीचे असल्यास पाटाने पाणी द्यावे. मात्र, पाण्याचा प्रवाह वाफ्याच्या तोंडाशी गवताची पेंढी ठेवून कमी करावा. पहिल्या पाण्यानंतर रोप उगवत असताना लगेच हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण सुलभ होते. त्यानंतर पाणी बेताने आणि हवामानानुसार ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्यावे. २) ठिबक सिंचन - पाणी देताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. प्रत्येक वाफ्यामध्ये ठिबक सिंचनासाठी इनलाइन ड्रीपर असणाऱ्या १६ मिमी व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रीपरमधील अंतर ३० ते ५० सेंमी असावे. त्यांची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी. ३) तुषार सिंचन -
पद्धतीसाठी दोन लॅटरलमध्ये ६ मीटर इतके अंतर ठेवून, ताशी १३५ लिटर पाणी फेकण्याची क्षमता असलेले नोझल वापरावेत. बियाण्यास कोंब येईपर्यंत मातीच्या वरच्या थरात ओलावा राहील याची खबरदारी बाळगावी. रोपवाटिकेतील वाफ्यांमध्ये बियाण्यास कोंब येईपर्यंत सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस पाणी द्यावे. पुनर्लागणीच्या अगोदर पाणी कमी- मी करावे, दोन पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर वाढवावे, त्यामुळे रोपे काटक बनतात. मात्र रोपे उपटण्यापूर्वी २४ तास अगोदर पाणी द्यावे. त्यामुळे रोप काढणे सोपे होते. गवत असल्यास खुरपणी करावी. तसेच रोपांच्या ओळींमधील माती हलवून घ्यावी, म्हणजे रोपांच्या मुळांभोवती हवा खेळती राहील. अन्नद्रव्य व्यवस्थापन ः पेरणीपूर्वी ५०० किलो चांगले कुजलेले शेणखत, २ किलो नत्र, १ किलो स्फुरद, १ किलो पालाश खत आणि पेरणीनंतर २० दिवसांनी १ किलो नत्र टाकावे. तणनियंत्रण
कांद्यासोबतच तणही उगवते. वाफ्यात शेणखताचा वापर केला असल्यास तणांचे प्रमाण जास्त आढळते. निंदणी करणे अवघड व खर्चिक होते. अशा वेळी शेतकरी रोपांवर तणनाशकाचा वापर करतात. त्यामुळे तण कमी होते, जळते, पण त्याच बरोबर रोपांचे शेंडेसुद्धा जळतात. बी पेरणीनंतर वाफ्यावर पेंडीमिथॅलिन २ मिलि प्रति १ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तणनाशक मारल्यानंतर लगेच पाणी देण्याची काळजी घ्यावी. तणनाशकाच्या वापरामुळे तणाचे बी रुजत नाही, मात्र कांद्याचे बी चांगले उगवून येते. लव्हाळा किंवा हरळी नियंत्रणासाठी पेंडीमिथॅलिनचा काहीही उपयोग होत नाही. पेरणीनंतर २० दिवसांनी एकदा हाताने खुरपणी करण्याची शिफारस केली आहे. रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण ः फूलकिडे - फवारणी प्रति लिटर पाणी फिफ्रोनिल १ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा कार्बोसल्फान २ मिलि मर रोग व मातीतून पसरणाऱ्या रोगांसाठी - मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात रोपांच्या ओळीत द्रावण ओतावे. करपा रोग - पानांवर फवारणी प्रति लिटर मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम. फवारणीवेळी ०.५ मिलि प्रति लिटर या दराने चिकट द्रव्य वापरावे. रोपांची काढणी व प्रक्रिया - रांगडा हंगामात ४५ दिवसांत रोप तयार होते. लागवडीच्या वेळी रोपांची गाठ हरभऱ्याएवढी असावी. रोपे उपटण्याअगोदर वाफ्यांना हलके पाणी द्यावे. मुळे न तुटता रोपे उपटता येतात. रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. मुळे पाण्यात धुवून घ्यावीत. रोप प्रक्रिया - कार्बोसल्फान २ मिली अधिक कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणामध्ये रोपांची मुळे दोन तास बुडवून लागवड करावी. - डॉ. शैलेंद्र गाडगे, ९९२२४९०४८३ (वरिष्ठ वैज्ञानिक (कृषी प्रसार), कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)