पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. सेंद्रिय खते, जैविक खते, द्रवरूप खतांची फवारणी, वाळलेली पाने काढून आच्छादन यांसारख्या तंत्रज्ञानांवर भर द्यावा. खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यानंतर लगेच माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी.
सध्याच्या काळात आडसाली, पूर्वहंगामी, सुरु आणि खोडवा ऊस पिकाला हवामानाच्या बदलाबरोबरच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याचा पीक वाढीच्या अवस्थेवर परिणाम होत आहे. ऊस तुटून गेल्यानंतर पाण्याअभावी ऊस काढून इतर कोणत्याही पिकाचे नियोजन करणे शक्य नसल्यामुळे ऊस तोडणी झाल्यानंतर फक्त खोडवा व्यवस्थापन केल्यामुळे कमीतकमी खर्चात काची जोपासना करणे शक्य आहे. जमिनीतील उपलब्ध पाणी कमी होऊन मुळाच्या आसपासचे तापमान वाढून त्यांची कार्य क्षमता कमी होते. परिणामी मुळाद्वारे पाणी व अन्नद्रव्यांच्या शोषणात घट होते. उसाच्या पानांवरील पर्णरंध्राद्वारा होणारे बाष्पीभवन कमालीचे वाढते. अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा ताण बसून पिकाची वाढ समाधानकारक होत नाही. पाणीटंचाईमुळे आडसाली उसाच्या उत्पादनावर विपरित परिणाम होतो, कारण हा ऊस पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो. पूर्व हंगामी उसाची बांधणी झालेली असताना सुरवातीस पाण्याचा ताण पडल्यामुळे वाढीवर व उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. जेथे पाण्याची उपलब्धता आहे तेथे आडसाली आणि पूर्व हंगामी ऊस लागवड झालेली दिसते. सध्या सुरु हंगामातील लागवड फेब्रुवारीच्या आत करावी. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. सेंद्रिय खते, जैविक खते, द्रवरूप खतांची फवारणी, वाळलेली पाने काढून आच्छादन यांसारख्या तंत्रज्ञानावर विशेष भर द्यावा. ऊस तुटून गेल्यावर पाण्याअभावी ऊस काढून इतर कोणत्याही पिकांची लागवड शक्य नसल्याने ऊस काढायचा विचार न करता तुटणाऱ्या सर्व उसाचा खोडवा ठेवावा. त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावेत, जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतील. पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी खोडवा पिकाच्या व्यवस्थापनासाठी कमी खर्चाची, कमी श्रमाची अत्यंत फायदेशीर पद्धत विकसित करण्यात आली आहे. या पद्धतीचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे सूत्र म्हणजे खोडव्यातील पाचट अजिबात जाळायचे नाही. पाचट ठेवल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. ज्याठिकाणी पाण्याची काहीच उपलब्धता नाही अशा ठिकाणी पाचट जाळू नये. खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यानंतर लगेच माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. खते देण्यासाठी पहारीसारख्या अवजाराचा वापर करावा. सदर पद्धतीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने जमिनीत वाफसा असताना दोन समान हप्त्यात द्यावी. पहिली खतमात्रा एकरी १०० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॅास्फेट आणि ५० किलो म्युरेट अॅाफ पोटॅश एकत्रीत मिसळून १५ दिवसांच्या आत पूर्ण करावी. पहारीने बुडख्यांपासून १० ते १५ सें.मी. अंतरावर १५ ते २० सें.मी. खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दोन छिद्रामधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. दुसरी तितकीच मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १२० दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची सोय असल्यास पाण्याच विरघळणारी खते म्हणजेच युरिया, म्युरेट अॅाफ पोटॅश सारखी खते ठिबक संचाद्वारे द्यावीत. ऊस वाढीसाठी मायक्रक्रोससोल हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त, पाण्यात पूर्र्णपणे विरघळणारे आणि सेंद्रिय आम्लयुक्त घनरूप खत ठिबक सिंचनाद्वारे तसेच जमिनीतून देण्यास उपयुक्त आहे. एकरी १० किलो व्हीएसआय मायक्रोसोलची मात्रा लागण आणि खोडवा पिकाला ठिबक संचाद्वारे प्रत्येकवेळी एकरी २.५ किलो प्रती १०० लिटर पाण्यात विरघळून लागणीचे वेळी, लागणीनंतर ६० दिवसांनी, १२० दिवसांनी आणि १८० दिवसांनी द्यावी. ठिबक संच नसल्यास शेणखतात किंवा कंपोस्ट खतात मिसळून रासायनिक खताच्या मात्रेसोबत लागणीचे वेळी एकरी ५ किलो आणि ऊस बांधणीचे वेळी ५ किलो या प्रमाणात जमिनीत चळी घेऊन द्यावी. ऊस पीक आणि खोडवा २ ते २.५ महिन्यांचा झाल्यावर मल्टिमॅक्रोन्युट्रियंट दोन लिटर अधिक मल्टिमायक्रोन्युट्रियंट दोन लिटर द्रवरूप खताची प्रती एकरी मात्रा २०० लिटर पाण्यात एकत्रित मिसळून पहिली फवारणी करावी आणि दुसरी फवारणी ९० दिवसांनी याच द्रवरूप खताची प्रत्येकी तीन लिटर मात्रा प्रती ३०० लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना उसाची पाने दोन्ही बाजूंनी चांगली भिजतील याची काळजी घ्यावी. शक्यतो वारा कमी असताना संध्याकाळी फवारणी करावी. कोणतीही इतर रसायने द्रवरूप खतात मिसळू नयेत. पाणी नसताना लागण आणि खोडवा पिकास पाण्याचा ताण सहन व्हावा म्हणून म्युरेट अॅाफ पोटॅश २.५ किलो प्रती १०० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून उसावर दर १५ ते २१ दिवसांनी पानांवर फवारणी करावी. दुष्काळी परिस्थितीत पीक व्यवस्थापन करत असताना जर एप्रिल किंवा मे महिन्यात एखादा उन्हाळी पाऊस झाला तर पिकास चांगले जीवदान मिळते. जुन महिन्यात हवामान बदलते, तापमान कमी होते आणि पाऊस वेळेवर सुरू झाल्यास उसाच्या वाढीस पोषक हवामान होते अशावेळी रासायनिक खताची हलकी मात्रा द्यावी म्हणजे उसाची वाढ जोमदार होऊ लागते. ः डॉ. प्रीती देशमुख, ९९२१५४६८३१ (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे)