सध्याच्या काळात सोयाबीन आणि भुईमूग पिकावर शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
शेतात बांध स्वच्छ ठेवल्याने गोगलगाईला लपण्यास जागा मिळणार नाही. संध्याकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगाई गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खड्ड्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकावी. संध्याकाळी शेतामध्ये वीस फूट अंतरावर ठिकठिकाणी गवताचे ढीग ठेवावेत. सकाळी त्याखाली दडलेल्या गोगलगाई गोळा कराव्यात. पिकाच्या मुळाशेजारी गोगलगाईंनी पुंजक्यामध्ये घातलेली साबुदाण्याच्या आकाराची पिवळसर अंडी गोळा करून नष्ट करावीत. बांधाच्या शेजारी चार इंच रुंदीचा तंबाखू किंवा चुन्याच्या भुकटीचा पट्टा टाकावा. त्यामुळे गोगलगाईंना शेतात येण्यापासून अडथळा येईल. मेटाल्डीहाईड कीडनाशकाच्या तयार गोळ्यांचा नियंत्रणासाठी वापर करावा. प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात संध्याकाळच्या वेळेत प्रति हेक्टरी ५ किलो या प्रमाणात गोळ्या पसरून द्याव्यात. गोगलगाई याकडे आकर्षित होतात. पिकलेली उंबाराची फळे, पपईकडे गोगलगाई आकर्षित होतात. यांचा आमिष तयार करण्यासाठी उपयोग करावा. नियंत्रणाच्या उपाययोजना प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे राबविणे गरजेचे आहे. गोगलगाई ऑक्टोबर ते मे या काळात जमिनीमध्ये खोलवर सुप्तावस्थेमध्ये जातात. पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीतून बाहेर पडतात. जून ते सप्टेंबरदरम्यान सक्रिय राहतात. म्हणून पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच गोगलगाईंच्या नियंत्रणासाठी सलग २ ते ३ वर्षे सामूहिकपणे उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. संपर्क ः डॉ. रवींद्र कारंडे ः ९९७०२५५०५७ (विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे)