हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन महत्त्वाचे...

हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन महत्त्वाचे...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन महत्त्वाचे...

हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन महिन्यांची अवस्था म्हणजे हळकुंड फुटण्यास सुरवात होते. जे नव्याने फुटवे आले असतात त्यांच्यापासून हळकुंड येण्याचा हा कालावधी असतो. या काळात भरणी, खत आणि पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा. हळद लागवड होऊन पाच महिन्यांचा कालावधी (१५० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये उगवण आणि शाकीय वाढ पूर्ण झाली आहे. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्चित वाढ होत असते. पावसाळ्यात खोड तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. या वेळी वातावरणात २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असते. उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पीक वाढीची पुढील दोन महिन्यांची (१५० ते २१० दिवस) अवस्था म्हणजे हळकुंड फुटण्यास सुरवात होते. जे नव्याने फुटवे आले असतात त्या फुटव्यांपासून हळकुंड येण्याचा हा कालावधी आहे. या वेळी वातावरणातील तापमानात घट होत असते. साधारणत: २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानात हळकुंडे फुटत असतात. भरणी

  • लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करावी.
  • सरीमधील माती किंवा दोन्ही गड्ड्यांमधील मोकळ्या जागेतील माती शिपीच्या कुदळीने खणून १.५ ते २ इंच दोन्ही बाजूच्या गड्ड्यांना लावावी. भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात, त्यांची चांगली वाढ होते.
  • भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये १० ते १५ टक्यांनी वाढ होते.
  • गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा दोन गादीवाफ्यामधील जागेतील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. मजुरांच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रिपर मातीखाली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • जर भरणी केली नसेल तर फुटव्यांपासून नव्याने आलेली हळकुंडे उघडी राहतात. सूर्यप्रकाशात हळकुंड आल्यास ती हिरवी पडून वाढ खुंटते. उघड्या राहिलेल्या हळकुंडावर कंदमाशी अंडी घालते. त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रसार होतो. हे लक्षात घेऊन मजूर किंवा भरणी यंत्राच्या साह्याने तात्काळ मातीची भर लावून हळकुंडे संपूर्णपणे झाकून घ्यावीत. त्यामुळे हळकुंडांचे चांगले पोषण होते, हळकुंडे चांगली पोसतात.
  • खत व्यवस्थापन

  • हळदीस रासायनिक खतांमध्ये हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात आली आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी द्यावयाचे असते. नत्राची मात्रा ही दोन हप्त्यात विभागून द्यावी.
  • नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी दिलेला आहे. नत्राचा दुसरा हप्ता भरणीच्यावेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) देण्याची शिफारस आहे. भरणीच्यावेळी हेक्टरी २१५ किलो युरीया, २५ किलो फेरस सल्फेट आणि दोन टन निंबोळी किंवा करंजी पेंड ही मात्रा द्यावी.भरणी करताना खते दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीत मिसळली जातात.
  • शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत जसे युरीया इत्यादी देऊ नये. जर युरिया सारखी खते दिली तर पिकाची अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी पिकाची पुढील अवस्था जसे हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे लांबणीवर पडते.
  • ज्या ठिकाणी पोटॅशयुक्त खतांची कमतरता असेल त्याठिकाणी हेक्टरी १२५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. त्यामुळे हळकुंडांचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.
  • पाणी व्यवस्थापन :

  • सध्याच्या काळात जर पाऊस झाला तर पाणी शेतामध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी जर साठून राहीले तर मुळांना श्‍वसनास घेण्यास अडथळा येतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज होतात. अशावेळी साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा करावा.
  • रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये.
  • जमिनीत सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजतात. त्यामुळे कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव होतो. हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळीमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. आठ महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदूराप्रमाणे पिकास पाणी देत रहावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते.
  • फुलांचे दांडे न काढणे:

  • शाकीय वाढ पूर्ण झाल्यांनतर हळदीला फुले येण्यास सुरवात होते. काही जातींना मोठया प्रमाणात तर काही जातींना कमी प्रमाणात फुलांचे दांडे येतात.
  • हळदीला फुले येणे म्हणजे हळदीच्या शाकीय वाढीचा कालावधी संपून हळदीस कंद सुटण्यास सुरवात झाल्याचे लक्षण आहे.
  • फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास पिकाला त्याचा कोणताही तोटा होत नाही. फुलांचे दांडे काढणे ही प्रक्रिया खर्चिक आहे.
  • राज्यात कुठेही फुलांचे दांडे काढले जात नाहीत. संशोधनातील प्रयोगांमध्ये असे निदर्शनास आले आहे की, हळदीवर फुलांचे दांडे असल्यामुळे उत्पादनात कोणत्याही प्रकारे घट झालेली नाही. फुलांचे दांडे ही न संपणारी प्रक्रिया आहे. एकदा जरी दांडे काढले तरी ते नव्याने येत राहतात.
  • फुले काढताना खोडाला इजा झाली तर त्या भागातून बुरशींचा पिकात शिरकाव होवून कंदकुज रोग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हळदीला आलेली फुले तशीच राहू द्यावीत.
  • डॉ. मनोज माळी,९४०३७ ७३६१४ (हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज जि. सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com