शेतीची कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वाटचाल सुरू

कृत्रिम बुद्धीमत्तेकडे शेतीचा वाटचाल सुरू
कृत्रिम बुद्धीमत्तेकडे शेतीचा वाटचाल सुरू

इतिहासाच्या अभ्यासातून भविष्याचा अंदाज घेत वर्तमान अधिक सुसह्य कसे करता येईल यावर भाष्य करणे, हेच खरे कोणत्याही इतिहास संशोधकाचे ध्येय असले पाहिजे. या प्रचंड आवाका असलेल्या कसोटीवर उतरणारा इतिहासकार म्हणजे युवाल नोवाह हरारी. ते इस्राईल येथील हिब्रू विद्यापीठामध्ये इतिहासाचे प्रोफेसर आहेत. त्यांची मानवी प्रजातीच्या इतिहासावरील सेपियन आणि होमो ड्युएस ही दोन पुस्तके जगभरातील विचारवंतामध्ये मान्यताप्राप्त झाली आहेत. त्यांचे तिसरे पुस्तक २१ लेसन्स फ्रॉम दी २१ सेंच्यूरी हे नुकतेच बाजारात येत आहे. या पुस्तकांनी टाकलेल्या प्रकाशझोतामध्ये आजच्या ग्रामीण महाराष्ट्रासमोर कोणत्या समस्या येऊ घातल्या आहेत, याचा आढावा घेण्याचा एक प्रयत्न.

युवाल नोवाह हरारी यांना विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले होते, की जागतिकीकरण, वातावरण बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या तीन बाबी केवळ माणसांच्याच नव्हे, तर पृथ्वीच्या भविष्यावर सर्वांत मोठा परिणाम करणार आहेत. सामान्यतः जागतिकीकरण, वातावरण बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे शब्द आले की ते टाळून जाण्याची वृत्ती कोणत्याही सर्वसामान्य माणसांमध्ये असते. सुरवातीला शिकारीसाठी दगडांची हत्यारे करण्यापासून सुरू झालेला प्रवास आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजात नष्ट करण्याची क्षमता असलेल्या अणू किंवा हायड्रोजन बॉँबपर्यंत पोचला आहे. एका अविचारी कृत्यातून संपूर्ण पृथ्वी बेचिराख करण्याची क्षमता मानवाकडे आहे. या प्रगतीचा अभिमान बाळगावा की लाज वाटावी, असा विचार कोणत्याही संवेदनशील माणसाला पडू शकतो. हा जागतिक पातळीवरील प्रश्न असला तरी, कोणीही गावखेड्यातील माणूस अविचारी कृत्यातून उद्भवलेल्या या समस्येतून वाचू शकणार नाही. आपण तर ग्रामीण भागातील साधी शेतकरी माणसे! यातील वातावरण बदलाचा आपल्या शेतीवर सर्वाधिक परिणाम होत असूनही त्याचे गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही. शहामृगी वृत्तीने वाळूत मान खुपसून बसणे एकवेळ शहरी माणसांला परवडू शकेल, मात्र शेतकऱ्याला परवडणारे नाही. या एकूणच बदलत्या वातावरणाचे शेती आणि ग्रामीण भागावर नेमके काय परिणाम होऊ शकतील, याचा अंदाज घेऊ. माणसाने शिकार सोडून शेती करायला सुरवात केली, तेव्हा शेती ही प्रामुख्याने महिलांच्या हाती होती. त्या हाताने टोबून बिया लावत, येणाऱ्या उत्पादनातून धान्य, बिया वेगळ्या करत. त्याचा स्वयंपाकात वापर करत. पुढे काही पशू माणसाळल्याने मोठी व अवजड कामेही शक्य होऊ लागली. बैलासारख्या आडदांड प्राण्याला कह्यात ठेवण्यासाठी महिलांची ताकद अपुरी पडत असल्याने पुरुषही शेतीत आला असावा. सुरवातीला मशागतीसह  पेरणी ही कामे लाकडी नांगरानी होऊ लागली. मातीची उलथापालथ थोड्या अधिक प्रमाणात होऊ लागली तरी सुपीक मातीच्या थरामध्ये जास्त ढवळाढवळ होत नव्हती. पूर्वी प्रवाही सिंचनासाठी सपाटीकरण आवश्यक असे, तेवढीच उलथापालथ होई. मात्र, पुढे या कामासाठी ट्रॅक्टर, लोखंडी नांगरांचेही विविध प्रकार आणि मातीची उलथापालथ करणारी यंत्रे विकसित झाली. यांत्रिकीकरणामुळे माणसांचे कष्ट कमी झाले. वेग वाढला. वर्षभर बैल सांभाळण्याची गरज राहिली नाही. ज्या कामासाठी पूर्वी बैल आणि माणसांना आठवडा लागत असे, ते काम आता एका दिवसात होऊ लागले. ही यंत्रे महाग असली तरी गावपातळीवरही सहजतेने भाड्याने मिळू लागली. मग मातीच्या सुपीकतेचा विचार न करता सपाटीकरणाने वेग घेतला. त्याचप्रमाणे पूर्वी तीन किंवा पाच वर्षांतून एकदा खोल नांगरट केली जायची. ती आता यंत्रामुळे कष्ट कमी झाल्याने दरवर्षीच होऊ लागली. या अविचारी सपाटीकरण आणि सातत्याने होणाऱ्या खोल नांगरटींमुळे मातीचे फूल मानला जाणारा सुपीक मातीचा थर खोलवर गाडला गेला. मग एवढा खर्च करूनही चांगले उत्पादन मिळत नसल्याचे चित्र सर्वदूर दिसू लागले.

शिक्षणामुळे पारंपरिक शहाणपण पडले मागे महाराष्ट्रांमध्ये समाजसुधारकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची गंगा पोचली. शेतकऱ्यांची हुषार मुले शिकून हळूहळू शहरी होत गेली. मात्र, ज्याला शिक्षणामध्ये फारशी गती नाही, रस नाही अशी सारी पिढी शेतीवर अवलंबून राहिली. वास्तविक कोणताही व्यवसाय उजगरीला यावयाचा असेल, तर त्यात काम करणारे मनुष्यबळ हे उत्तम हवे. अनेक कुटुंबांत शेती हा व्यवसाय ज्याला अन्य काहीच जमत नाही त्याच्या गळ्यात टाकला गेला. सतत बदलणाऱ्या वातावरणानुसार, आपत्तीनुसार त्वरीत निर्णय घेण्याची क्षमता असलेली व्यक्तीच उत्तम शेतकरी बनू शकते. ही क्षमता आपल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शहाणपणातून मिळवली होती. हव्यासापोटी तो पारंपरिक शहाणपणा डावलण्याची वृत्ती शेतकऱ्यांत वाढत गेली.

मनुष्यबळाची कमतरता १९६० नंतर अधिक उत्पादनक्षम नव्या सुधारित किंवा संकरित जाती, रासायनिक खते, पीक संरक्षणासाठी कीडनाशके, तणनाशके उपलब्ध होत गेली. त्यांच्या पेरणी, फवारणीसाठी अत्याधुनिक यंत्रांचीही उपलब्धता वाढली. सुरवातीला वाढलेल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा हुरूपही वाढला. वाढत्या शहरीकरणाबरोबरच थोड्या बहूत प्रमाणात वाढलेल्या औद्योगिक वसाहतींमुळे ग्रामीण भागातील मजूर, मनुष्यबळ त्याकडे आकृष्ट झाले. ग्रामीण भागामध्ये उत्तम दाम देण्याची तयारी असूनही मजूर उपलब्ध नसण्याच्या काळात या यांत्रिकीकरणाने शेतीला मोठा हात दिला. परदेशातही कमी लोकसंख्येमुळे शेतीत व उद्योगांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने यंत्रांचा वापर विपूल होतो. अलीकडे या यंत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्याचे प्रमाणही वाढत आहे. गावामध्ये एक दोघांकडे असलेली ठिबक सिंचन प्रणाली बहुतांश गावांमध्ये नियमित झाली आहे. सिंचनाच्या पाण्यातील बचत, पाणी देण्याचे कमी कष्ट, त्यासाठीचा माणसांच्या वार्षिक पगाराचा आकडा याचा विचार करता शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आपलेसे केले.

तंत्रज्ञान झिरपण्याचा वाढला वेग

  • अगदी आपल्याकडेही स्वयंचलित सिंचन यंत्रणा अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर दिसू लागली आहे. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वांत पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यामध्ये मातीतील आर्द्रता व तापमान सांगणारे सेन्सर, पिकाच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची व पाणी गरज सांगणारे सेन्सर यावर सिंचनासाठी किती पाणी द्यावयाचे, याची अचूक गणिते करून त्याची पूर्तता करणारी यंत्रणा उभारली जात आहे. त्याला हवामानाची माहिती नोंदवणारे सेन्सर मदतीला आहेत. ही माहिती क्लाऊड तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाच्या हातातील मोबाईलपर्यंत सहज पोचणार आहे. यातून पाण्याचा, खतांचा कार्यक्षम वापर होण्यासोबतच उत्पादनामध्ये वाढ होईल. उत्पादनातील वाढ पाहता शेतकरी हे नवे तंत्रज्ञानही आत्मसात करतील.
  • गुगल, टेसला अशा महाबलाढ्य कंपन्या स्वयंचलित कारच्या उत्पादनामध्ये उतरल्या आहेत. हे कदाचित आपल्याला फार दुरचे वाटत असले तरी हे तंत्रज्ञान शेतीतही उतरणार आहे. याच धर्तीवर ड्रायव्हरशिवायच्या ट्रॅक्टरच्याही भारतात चाचण्या सुरू आहेत. तोही येत्या काही वर्षामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती येण्याची शक्यता आहे.
  • आपल्याकडे दरडोई शेतीचे क्षेत्र कमी असल्याने असे तंत्रज्ञान पहिल्या टप्प्यात जरी आवाक्याबाहेरचे वाटले तरी प्रगतीचा एकंदरीत वेग बघता गावोगाव पोचलेल्या मोबाईलप्रमाणे येणारे प्रत्येक तंत्रज्ञान नक्कीच झिरपत जाणार आहे. आज नाशिक पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात लाखो रुपये किंमतीची फवारणी यंत्रे दिसत आहेत. त्याचप्रमाणे पुढील कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञानही शेतकरी नक्कीच आत्मसात करेल, यात शंका नाही. मात्र, या बदलत्या वातावरणाचा ग्रामीण समाजकारणावरील परिणामांचा विचार होणेही अत्यावश्यक आहे.
  •  संपर्क : ९९२२४२१५४० (लेखक ॲग्रोवनमध्ये उपसंपादक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com