राज्यात तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. पावसातील अनियमितता पाहता तुरीची रोपे तयार करून, त्याची पुनर्लागवड केल्यास उत्पादकता वाढवणे शक्य होईल. तुरीचे क्षेत्र वाढल्यामुळे उत्पादनात वाढ दिसत असली तरी गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदल व पावसामधील अनियमिततेमुळे तुरीची उत्पादकता घटली आहे. उशिरा पाऊस किंवा पावसातील खंड या काळामध्ये तुरीचे रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. तुरीची पुनर्लागवड कशी करावी : सिंचनाची किमान सोय असल्यास मे महिन्याची अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला तुरीच्या रोपवाटिकेला सुरुवात करावी. रोपाच्या निर्मितीसाठी १५ x ७ सें.मी. आकाराच्या काळ्या पॉलिथीन पिशव्या वापराव्यात. पहिल्या पावसानंतर शेत चांगले तयार करून घ्यावे. काडी कचरा वेचून स्वच्छ करावे. पावसाचा अंदाज घेऊन साधारणतः ३० दिवसांच्या वयाच्या रोपांची पुनर्लागवड करावी. पावसाचा खंड पडल्यास रोपे कोमेजून जाऊ शकतात. रोपे तयार करण्याची पद्धत :
१५ x ७ सें.मी. आकाराच्या पॉलिथीन पिशवीत रोपे वाढवावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी पॉलिथीन पिशव्यांना तीन ते चार छिद्रे पाडून घ्यावीत. पिशव्यामध्ये भरण्यासाठी माती व शेणखत यांचे मिश्रण समप्रमाणात ठेवावे. या मिश्रणामध्ये एक किलो युरीया प्रति १००० पिशव्यांच्या मातीमध्ये मिसळावा. कारण तुरीच्या सुरवातीच्या वाढीसाठी पहिले ३० दिवस हे नत्र उपयुक्त पडते. त्यानंतर मुळे व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्यावरील गाठीद्वारे हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात. त्यामुळे नत्राची फारशी आवश्यकता भासत नाही. बिया पिशवीच्या मधोमध ३-४ सें.मी. खोलीवर टोकाव्यात. बाजूला टोकल्यास पुनर्लागवडीच्या वेळी रोपटे वेगळे व पॉलिथीन पिशवीतली माती वेगळी होते. ९० x ६० अंतराच्या लागवडीसाठी हेक्टरी ५५,५५५ इतकी रोप संख्या पुरेशी होते. मात्र, मर आणि अन्य बाबींचा विचार करताना थोडी अधिक रोपे बनवावीत. रोपे ही झाडाच्या सावलीत किंवा शेडनेटमध्ये वाढवावी. दोन-तीन दिवसाला पाणी द्यावे. संशोधनाअंती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले BSMR-७३६ व BSMR-८५३ हे वाण पुनर्लागवडीसाठी योग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. BSMR-७३६ हे वाण १६० - १८० दिवसांत पूर्ण होते. ते मर आणि वांझ रोगास प्रतिकारक्षम असून, त्याचे दाणे आकाराने टपोरे व तांबड्या रंगाचे आहेत. BSMR-८५३ हे वाणदेखील BSMR-७३६ प्रमाणे १६० – १८० दिवसांत पूर्ण होते. मर आणि वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे दाणे रंगाने पांढरे आहेत. प्रत्यक्षात शेतात पुनर्लागवड कशी करावी :
पुनर्लागवड शक्यतो जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा १० जुलैपूर्वी करावी. १० जुलैनंतर लागवड केल्यास उत्पादनात घट येते. ३० दिवसांची पूर्ण वाढलेली रोपे लागवडीसाठी वापरावीत. लागवडीच्या दिवशी सकाळी रोपांना भरपूर पाणी द्यावे. रोपे लगेच उन्हात आणू नये. लागवड करताना दोरीच्या साह्याने टोकण करून घ्यावे. २० सें.मी. खोलीचे खड्डे करून रोपांची लागवड करावी. पॉलिथीन फाडताना ब्लेड आतील मुळीला लागणार नाही. रोप खड्ड्यांमध्ये ठेवताना मातीचा गोळा फुटणार नाही, याची काळजी घ्यावी. लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यावे. पुनर्लागवडीनंतर घ्यावयाची काळजी :
पुनर्लागवड केल्यानंतर तुरीच्या रोपांची जुनी पालवी नष्ट होऊन त्या जागी नवी पालवी साधारणतः १० ते १२ दिवसांत येते. पुनर्लागवड केल्यानंतर नियमित पाणी द्यावे. पाऊस असल्यास पाण्याची गरज नाही. काही ठिकाणी रोपे मृत झाल्यास शिल्लक रोपांतून नांगे भरून घ्यावे. पुनर्लागवड करण्याचे फायदे :
महाराष्ट्रात पावसाचे अनियमित आगमन व असमान वितरण होताना दिसते. यामुळे पेरणीला उशीर होत जातो. योग्य वेळ साधण्यासाठी रोपांची लागवड उपयुक्त ठरू शकते. पुनर्लागवडीमुळे थोड्या मोठ्या रोपांची ताकद अधिक असल्याने पावसात उघडीप वा खंड पडल्यास तग धरण्याचे प्रमाण अधिक असते. दुबार पेरणीची वेळ येत नाही. पाण्याची उपलब्धता असल्यास पेरणीची योग्य वेळ साधता येते. पुनर्लागवडीमुळे तूर झाडांमध्ये होणारे बदल ः
पुनर्लागवड केलेल्या तुरीची कायीक वाढ झपाट्याने होते. झाडांची उंची वाढते. तसेच प्रतिझाड फांद्यांचे प्रमाण वाढते. पुनर्लागवडीमुळे झाड हे अधिकच काटक बनते. तूर हे पीक इनडिटरमिनेंट असल्याने फुलोरा सारखा येत असतो. नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठीमुळे नत्र लवकर उपलब्ध होते. झाडांची संख्या लक्षात घेता फांद्या, शेंगा व शेंगेमधील दाणे हे जास्तीत जास्त भरले जातात. पुनर्लागवडीचे योग्य नियोजन केल्यास पेरणी केलेल्या तुरीपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते. संशोधनाअंती हेक्टरी १५ ते १८ क्विंटल उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे आढळले आहे. रोप वाढवण्याच्या कालावधीमध्ये सिंचनाची उपलब्धा आवश्यक आहे. रोपांची लागवड वेळेत करणे आवश्यक आहे. त्यासाठी ३० दिवसांच्या वयाची रोपे योग्य असून, त्याची शिफारस या वर्षीच्या जॉईंट ॲग्रेस्कोमध्ये झाली आहे. काही कारणाने रोपांचे वय वाढल्यास लागवडीमध्ये अडचणी येऊ शकतात. संपर्क ः राजीव साठे, ९४२३७२१८९४ (पीएचडी- कृषीविद्या, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)