भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना

भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करताना

भाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अनेक समस्या कमी होऊ शकतात. रोपवाटिकेमध्ये बियाणे प्रक्रिया, कीड व रोगांना प्रतिबंध याला प्राधान्य द्यावे. टोमॅटो, मिरची आणि वांगी यांसारख्या भाजीपाला पिकांची तीनही हंगामामध्ये लागवड केली जाते. त्यांच्या रोपवाटिकांचे नियोजन लागवडीपूर्वी योग्य काळ आधी करणे गरजेचे आहे. रोपवाटिकेसाठी जमीन किंवा माती - मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा. या जमिनीमध्ये आडवी उभी नांगरणी करून चांगली भुसभुशीत करून घ्यावी. त्यात चांगले कुजलेले शेणखत (हेक्टरी १० ते १५ टन) टाकावे. रान बांधणी फळभाज्यांच्या रोपनिर्मितीसाठी शक्यतो गादी वाफे तयार करावेत. त्याची लांबी ३ मीटर, रुंदी १ मीटर आणि उंची १५ ते २० सेंमी असावी. गादीवाफ्याच्या निर्मितीवेळी त्यावर चांगलेले कुजलेले शेणखत एक घमेले (८ ते १० किलो), अधिक १९ः१९ः१९ हे मिश्रखत १५० ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० ग्रॅम प्रमाणात मिसळावे. लागवडीपूर्वी मानमोडी (डंपीग ऑफ) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० ते ४० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशीजन्य कीडनाशक गांडूळखत किंवा शेणखतामध्ये मिसळून द्यावे. बियाणे मात्रा आणि बीजप्रक्रिया

  • एक हेक्टर क्षेत्रासाठी रोपाच्या निर्मितीसाठी टोमॅटोच्या संकरित १२५ ते १५० ग्रॅम बियाणांची, तर सुधारित वाणासाठी ४०० ते ५०० ग्रॅम बियाणांची आवश्यकता असते. वांग्यासाठीही साधारणपणे वरीलप्रमाणे आवश्यक असते. मिरचीसाठी हेक्टरी १ ते १.५ किलो बियाणांची आवश्यकता असते.
  • खासगी कंपन्या व कृषी विद्यापीठांनी तयार केलेल्या बियाणांवर पॅकिंग करतेवेळी बीजप्रक्रिया केलेली असते. त्याविषयीची माहिती लेबलवर दिलेली असते. ती पाहून घ्यावी. जर बियाणांवर प्रक्रिया केलेली नसल्यास किंवा घरगुती बियाणे वापरत असाल, तर पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस कार्बेन्डाझिम किंवा थायरम २.५ ते ३ ग्रॅम याप्रमाणे प्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा हे बुरशीजन्य घटक ४ ते ५ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे गुळाच्या पाण्यामध्ये मिसळून प्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे किमान ८ तास सावलीमध्ये सुकू द्यावे. त्याचप्रमाणे स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) २५ ग्रॅम प्रतिकिलो प्रमाणात बियाणांस चोळल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढण्यास मदत होते. जैविक घटकांची प्रक्रिया ही नेहमी रासायनिक घटकांच्या नंतर करावी.
  • बियाणे लागवड गादीवाफ्यावर सुमारे ८ ते १० सेंमी अंतरावर रुंदीशी समांतर रेषा पाडून त्यात बियाणे टोकत जाते. ते बियाणे हलक्या हाताने मातीने झाकून टाकावे. झारीने पाणी द्यावे. रोपवाटिका व्यवस्थापन

  • बियाणांच्या पेरणीनंतर ६० के १०० मेश नायलॉनची कीडरोधक जाळी वाफ्यावर लावावी. त्यामुळे किडीचा रोपावस्थेतील प्रादुर्भाव रोखला जाऊन कीडमुक्त रोपे मिळतील.
  • रोपवाटिकेमध्ये मानमोडी (डंपिंग ऑफ) या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर किंवा कॅप्टन २ ते २.५ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे आळवणी करावी.
  • रोपवाटिकेमध्ये रसशोषक कीड व बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल)०.५ ते ०.६६ मि.लि. अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम.
  • रोपांची पुनर्लागवड

  • टोमॅटो पिकाची रोपे ३ ते ५ आठवड्यात तयार होतात. वांग्याची व मिरचीची रोपे ४० ते ४५ दिवसांत तयार होतात.
  • रोपांच्या पुनर्लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस आधी पाणी हळूहळू कमी करावे. लागवडीच्या आधी एक दिवस रात्रीच्या वएळी रोपवाटिकेला पाणी द्यावे. त्यामुळे रोपांच्या मुळे काढणे सुलभ होते.
  • रोप प्रक्रिया करताना रोपांची मुळे मॅन्कोझेब २ ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल)०.५ ते ०.६ मि.लि. प्रतिलिटर या द्रावणामध्ये बुडवून ठेवावीत.
  • रोपाच्या पुनर्लागवडीनंतर त्वरित पाणी द्यावे.
  • डॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२ (उद्यानविद्या विभाग, सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com