पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा फायदा

पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा फायदा
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा फायदा

पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक, तुषार सिंचन उभे राहते. कोरडवाहू शेती असल्यास एक दोन संरक्षित पाण्याची सोय करण्यासाठी शेततळे वगैरे चर्चा सुरू होते. मात्र, आपण भू सूक्ष्मजीवशास्त्राच्या अनुषंगाने पाणी व्यवस्थापनाचा विचार या लेखात करणार आहोत. सन २०१८ मध्ये अगदी पावसाळ्यातही पश्‍चिम विदर्भ, मराठवाडा व खानदेशातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती होती. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हेही अंशतः दुष्काळाच्या छायेत आहेत. काही भागात अवर्षण, तर काही भागात महापूर अशी परस्परविरोधी स्थिती दरवर्षीच दिसून येते. पाण्याच्या समृद्धी, टंचाई व अतिरेक अशा तिन्ही काळासाठी पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला सूक्ष्मजीवशास्त्राची मदत होऊ शकते. सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनाप्रमाणेच पाणी व्यवस्थापन हा विषयही सूक्ष्मजीवशास्त्राच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. माती कणांच्या तुलनेत सेंद्रिय कण ३-४ पट जास्त पाणी धरून ठेवतात. जमिनीत सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढत जाईल तशी जमिनीची जलधारणशक्ती वाढत जाते, याची कल्पना अनेकांना आहे. सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढवण्याची माहिती सेंद्रिय खत व्यवस्थापनाअंतर्गत केली आहे. त्यातील कोणत्याही पिकाच्या जमिनीवरच्या भागापेक्षा जमिनीखालील (बुडखा व मुळांचे जाळे) यांचे खत जास्त चांगले असते. अर्थात, हलके खत व भारी दर्जाचे खत यांचा जलधारण शक्तीवर पडणाऱ्या परिणामाबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे. शून्य मशागत शेती ः या पूर्व मशागत केली जात नाही. याचा परिणाम जलसंवर्धनासाठी होतो. जमीन पोकळ न झाल्याने त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण कमी राहते. मशागत केलेल्या जमिनीतील ओलावा बाष्पीभवनाद्वारे जलद उडून जाऊ शकतो. यात हवा कमी खेळती राहते. प्रत्यक्ष मातीच्या दोन कणामध्ये पीक वाढीच्या गरजेइतकी म्हणजे २५ टक्के हवा व २५ टक्के पाणी हे प्रमाण राहू शकते. मशागतीमुळे जमिनीत हवेचे प्रमाण गरजेपेक्षा वाढते. ते जल व्यवस्थापनासाठी मारक ठरते. शून्य मशागतीमध्ये मागील पिकांची मुळ्या व बुडख्यांचे अवशेष जमिनीत तसेच असतात. जिवंत अवशेषात ८०-९० टक्के पाणी असते. ते मेल्यानंतर वाळताना आकसत जातात. या अवशेषाभोवती लहान मोठ्या पोकळ्या तयार होतात. या पोकळ्यातून ओलितात अगर पाऊस पडल्यास जास्त पाणी साठविले जाते. अतिरिक्त पाण्याचा जलद निचरा होऊन जमिनीला जलद वापसा येतो. अवशेष कुजत असताना सभोवताली सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढते. यामुळेही जलधारण शक्तीत सुधारणा होते. प्रचलित चांगले कुजलेले खत टाकण्याच्या पद्धतीत टाकलेले खत पिकांद्वारे वापरून संपत जाते. पेरणीवेळी असलेली सेंद्रिय कर्बाचे प्रमाण पक्वता काळात कमी झालेले असते. शून्य मशागतीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण पिकाच्या शेवटपर्यंत उच्च पातळीवर राहते. कारण सेंद्रिय कर्ब निर्मितीचा कारखाना चालू असतो. वापरल्या गेलेल्या सेंद्रिय कर्बाची जागा नव्याने निर्माण होणारे सेंद्रिय कर्ब घेत राहते. याचा नेमका चांगला परिणाम या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीतही कसा मिळाला, याविषयी शून्य मशागत तंत्राने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी दूरध्वनीद्वारे कळवले आहे. या लोकांची पिके प्रचलित पद्धतीच्या तुलनेत जास्त काळ हिरवीगार राहिली. काही पिकापासून अवर्षणातही व्यवस्थित उत्पादन मिळाले. एक पट्टा पिकाचा एक पट्टा तणांचा ः कोरडवाहू व पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात शेती करतेवेळी फक्त पिकांचे उत्पादन हा एकच उद्देश ठेऊन चालणार नाही. पिकाच्या प्रत्येक रोपासाठी आवश्यक पाणी त्याच्या मुळाजवळ साठविता आले पाहिजे. काही जमिनीचा वापर पीक उत्पादनासाठी, तर काही जमिनीचा वापर जलसंवर्धनासाठी असा विचार करावा लागेल. १) कापूस अगर तूर यासारख्या लांब अंतराच्या पिकात मिश्र पीक न घेता तणांचा पट्टा वाढवावा. ही तणे मुख्य पिकाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने वाढवावीत. यामुळे जमिनीखाली तणांच्या मुळांचे जाळे तयार होईल. या जाळ्यात मोकळ्या मातीच्या तुलनेत अधिक पाणी साठते. असे प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस गेल्यानंतर पुढे ५०-६० दिवस या जाळ्यातून गरजेइतका पाणीपुरवठा होत असल्याने कळविले आहे. पुढील वर्षी हा तणांचा पट्टा कुजून जमिनीत खत होईल. पुढील वर्षी या सेंद्रिय खताच्या पट्ट्यात पीक व मागील वर्षीच्या पिकाच्या पट्ट्यात आता तणांचा पट्टा असे नियोजन वर्षांनुवर्षे कोणत्याही अतिरीक्त खर्चावाचून करता येते. त्यातून जमिनीची सुपीकता वाढेल, उत्पादन पातळी राखली जाईल. २) जवळ अंतरावरील पिकासाठी एखादा हंगाम पीक न घेता, त्याऐवजी तणे वाढवून मारावीत. त्या सुपीकतेवर पुढील १-२ वर्षे पीक घेता येईल. ३) जमिनीमध्ये कोणताही सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया अधिक काळ सुरू राहणे आवश्यक. यातून कुजविणारी जिवाणू सृष्टी वाढते. त्यातून जलसंवर्धन तर होतेच, सोबतच जमिनीची निचरा शक्तीही वाढते. हे लवकर वापसा येण्यासाठी आवश्यक असते. पीक किंवा तणांचे जमिनीखालील अवशेष कुजताना अनेक उपपदार्थ तयार होतात. त्यातून जमिनीतील कणांची स्थिर रचना तयार होते. जमिनीची निचरा शक्ती वाढते. पिकाच्या वाढीसाठी हे अत्यंत गरजेचे आहे. प्रचलित शास्त्रातही जमिनीच्या सुपीकतेच्या गुणधर्मात कण रचनेसंबंधी शिकविले जाते. कणरचना बिघडते कशी व सुधारायची कशी, यविषयी सूक्ष्मजीवशास्त्रातूनच लक्षात येते. उदा. सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठी जमिनी अत्यंत जड आहेत. तेथे निचऱ्याची समस्या मोठी आहे. येथील ५-६ वर्षे वरील पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी निचरा प्रचंड सुधारल्याचे कळविले आहे. आच्छादन तंत्रातून जलसंवर्धन ः

पिकाच्या ओळीत, फळबागेत तणे वाढवून मोठी करून ती झोपविल्यास (आडवी पाडल्यास) त्यांचे जमिनीवर आच्छादन होते. हे आच्छादन तणनाशकाने मारून टाकल्यास आच्छादनाची गादी तयार होते. त्याखाली ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. अन्य पिकाचे अवशेष बाहेरून आणून त्याचेही मृत आच्छादन करता येते. (उदा. उसाचे पाचट, गव्हाचे काड, सोयाबीन, कडधान्याचे भुसकट) मात्र, त्यात वाहतूक व रानात पसरण्याचा खर्च वाढतो. यातूनही काही प्रमाणात जलसंवर्धन होऊ शकते. पाऊस अत्यंत कमी असेल व तणांची उंचीही फारशी नसल्यास, तणे तशीच रानात ठेवावीत. पिकाच्या दोन ओळीतील या हिरव्या आच्छादनाने जमिनीत ओलावा टिकून राहील. तणे आपल्या वाढीसाठी काही पाण्याचा वापर करत असली तरी उघड्या जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी असते. अवर्षण काळात हे तंत्र उपयोगी ठरते. कोळप्याच्या पाळ्या मारून भेगा सतत बुजवण्याची प्रचलित शिफारस आहे. त्यापेक्षा वरील तंत्र चांगले आहे. येथे रानाला भेगा पडत नाहीत. शून्य मशागतीने भूजल पातळीत वाढ ः शून्य मशागत पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीत उत्तम प्रकारे मुरत असल्याचा अनुभव आहे. शून्य मशागतीमध्ये पिकाचे जमिनीखालील अवशेष जागेवरच राहतात. त्यातून उभ्या पोकळ्या तयार होतात. या पोकळ्यातून पाणी जमिनीमध्ये मुरते. जमिनीमध्ये पाणी मुरण्याचा एक वेग असतो. या वेगापेक्षा जास्त वेगाने पाऊस पडू लागल्यास पाणी आडवे (अपधाव) वाहू लागते. मशागत केलेल्या रानात अशा पोकळ्या तयार होत नाहीत. अगर तयार झालेल्या असल्यास मोडून जातात. पाऊस पडू लागल्यानंतर जमिनीच्या वरच्या थरातील मातीचे कण पाणी पिऊन फुगतात. त्यांचा एकमेकावर दाब निर्माण होऊन खाली पाणी उतरण्याचे मार्ग बंद होतात. पाणी आडवे वाहू लागते. रानात काही अंतरानंतर खोल सरी पाडा, पावसाळ्याच्या काळात सपाट वाफे करून त्या वाफ्यात तटवून पाणी मुरवा, बांधाला खस गवत लावा अशा पाणी मूरविण्यासाठी विद्यापीठाच्या काही शिफारशी आहेत. मात्र, शून्य मशागतीची शेतीची उपयुक्तता लक्षात आलेली नाही. केवळ कमी वेळात पुढील पिकाची पेरणी करण्याइतकीच ती मर्यादित नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. दुष्काळासाठी कायम तयार रहावे...

  • दुष्काळ सांगून येत नाही. त्यासाठी कायम जागृत राहणे गरजेचे असते. बहुतेक शेतकरी शेततळ्यातील पाणी उन्हाळ्यापूर्वीच संपवून रिकामे होतात. पुढील हंगामात दुष्काळ आल्यास बागा जगविणेही अवघड होते. अनेकदा बागा काढून टाकाव्या लागतात.
  • यासाठी किमान बागा जगविण्याइतके पाणी तरी शेततळ्यात राखून पुढील वर्षासाठी ठेवावे. यासाठी चालू वर्षातील काही क्षेत्रातील पिके कमी करावीत. कमी पाण्यामध्ये पिके जगवण्याची सवय लावावी.
  • शून्य मशागतीनंतर मागील वर्षी टोमॅटो, मका अत्यंत कमी पाण्यात पिकविल्याने शेततळ्यातील ५० टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. या वर्षीही दुष्काळ असल्याने अन्य सर्व पिके बंद करून डाळिंब बागेचा बहर धरण्याचे नियोजन केले असल्याचे एका शेतकऱ्याने कळवले आहे, असे नियोजनही आवश्यक आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com