ज्वारी, हरभरा, सूर्यफूल पिकातील आंतर मशागत

ज्वारी, हरभरा, सूर्यफूल पिकातील आंतर मशागत
ज्वारी, हरभरा, सूर्यफूल पिकातील आंतर मशागत

रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, करडई आणि सूर्यफूल ही पिके घेतली जातात. कोरडवाहू क्षेत्रामध्ये उपलब्ध ओलावा टिकवण्याच्या उद्देशाने आंतरमशागत योग्य पद्धतीने केली पाहिजे. त्याचा उत्पादनवाढीसाठी फायदा होतो. रब्बी ज्वारी

  • पेरणीनंतर १० दिवसांनी पहिली व १२ ते १५ दिवसांनी दुसरी विरळणी करावी.
  • पोंगेमर झालेली रोपे काढून टाकून आवश्यक तेथे नांगे भरावेत.
  • जमिनीत ओल धरून ठेवण्यासाठी ज्वारीच्या पिकाला तीन कोळपण्या द्याव्यात. पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली, पाचव्या आठवड्यात दुसरी; तर आठव्या आठवड्यात तिसरी कोळपणी करावी. त्यासाठी अखंड पासाचे कोळपे वापरावे. दुसरी व तिसरी विशेषतः शेवटची कोळपणी दातेरी कोळप्याने केल्यास रान फुटून पडणाऱ्या भेगा बुजतात. बाष्पीभवन कमी करण्यासाठी ही कोळपणी अत्यंत महत्त्वाची आहे.
  • तणांच्या उपद्रवानुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी.
  • जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हेक्टरी पाच टन काडीकचरा/धसकटे, सरमाड पिकाच्या दोन ओळीत पसरावे. या आच्छादनामुळे जमिनीत ओल चांगली टिकून राहण्यास मदत होते.
  • हरभरा

  • पेरणीनंतर १५ दिवसांच्या आत आवश्यक तेथे नांगे भरावेत. दाट पेरणी झाली असल्यास विरळणी करून दोन रोपांतील अंतर १० सें.मी ठेवावे.
  • पेरणीपासून चार आठवड्यांच्या आत एक खुरपणी आणि कोळपणी देणे आवश्यक आहे. परिणामी, तणांचा नायनाट होऊन उत्पादनात २५ टक्के वाढ होते.
  • रासायनिक तणनियंत्रणासाठी, पेरणी करताना वापशावर पेंडीमेथिलीन हे तणनाशक २.५ लिटर प्रतिहेक्टर प्रमाणे ५०० लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.
  • करडई या पिकाची विरळणी उगवणीनंतर १० दिवसांनी किंवा पेरणीपासून २० दिवसांनी करावी. मध्यम जमिनीत दोन रोपांत साधारणतः २० सें.मी., तर भारी जमिनीत ३० सें.मी. ठेवावे. जरुरीप्रमाणे एखादी निंदणी करावी. दोन ते तीन कोळप्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे आहे. पहिली कोळपणी ३ ऱ्या आठवड्यात फ्तीच्या कोळप्याने, दुसरी कोळपणी ५ व्या आठवड्यात अखंड पासच्या कोळप्याने व तिसरी कोळपणी ८ व्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी. सूर्यफूल पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी. आधी दोन व अखेरीस एका ठिकाणी एकच रोप ठेवावे. विरळणी करताना मध्यम जमिनीत २० सें.मी, तर भारी जमिनीत ३० सें.मी अंतर ठेवावे. पिकास १५ दिवसांच्या अंतराने एक–दोन कोळपण्या, तसेच एक खुरपणी देऊन शेत तणविरहित ठेवावे. दोन ओळीमध्ये गव्हाचे भुसकट अथवा उसाच्या पाचटाचे तुकडे करून आच्छादन केल्यास हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रब्बी पिकांमध्ये वरीलप्रमाणे योग्य वेळी आंतरमशागत करावी. तणांचे नियंत्रणासह जमिनीतील हवा खेळती राहते. उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून राहतो, परिणामी उत्पादनात भरीव वाढ होते. डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ ०२४२६-२४३३३८ (प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे ), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com