गांधीजींची लोकशाहीवादी निर्णय प्रक्रिया

आपल्या सगळ्यांना समग्र, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सर्वांच्या भावनांचा आदर करणाऱ्या भारत देशात राहण्यास नक्कीच आवडेल. आणि हेच गांधींजींचे स्वप्न होते. गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांनी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याच्या, काम करण्याच्या दाखविलेल्या मार्गावर चालू या.
संपादकीय
संपादकीय

माझ्या वडलांचे मित्र आणि हिंदुस्थानचे संपादक रतनलाल जोशी यांनी मला गांधीजींच्या निर्णय क्षमतेची एक उत्कृष्ट कथा सांगितली होती. कोणताही निर्णय घेताना महात्मा गांधी काॅँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्व सभासदांसोबत चर्चा करीत असत. आणि त्यातून सर्वांचे मत जाणून घेतले जात असे. ‘‘बापू आम्हा सर्वांना हे माहीत आहे की अंतिम निर्णय हा आपलाच असतो तर मग सर्वांचे मत जाणून घेण्याचा हा ड्रामा तुम्ही का करीत आहात’’ अशी तक्रार एकदा डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी काॅँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये केली. तेव्हा गांधीजीसह सर्व सभासद मोठमोठ्याने हसू लागले. अत्यंत बुद्धीमान आणि समजूतदारपणामुळे गांधीजी हे सर्वांना अत्यंत सुरक्षित असे व्यक्तिमत्त्व वाटत होते. इतरांचे मत जाणून घेण्यात त्यांना धोकादायक वाटले नाही. १९३० मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी मात्र त्यांच्या निर्णय प्रक्रियेच्या सर्वोच्चत्तम स्थानामध्ये बाधा आणली होती. परंतु गांधीजींनी याबाबत वाईट वाटून तर घेतलेच नाही तसेच सुभाषचंद्र बोस यांच्यावर वैयक्तिक टीकासुद्धा कधी केली नाही. त्यांचे बोस बरोबरचे संभाषण हे तत्त्वावर आधारित आणि स्वातंत्र्य लढा कोणत्या दिशेने न्यायचा अशा मुद्द्यांवरच व्हायचे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा त्यांचे सहकारी मेजर जनरल बी. सी. खंडुरी यांना सांगितले होते, एका थोर नेत्याचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे विशाल हृदय आणि क्षमा करण्याची क्षमता हा आहे. महात्मा गांधींमध्ये हा गुण खच्चून भरलेला होता. आज आपण मात्र सर्वांना एकत्र घेऊन संभाषणाची कला हरवून बसलो आहोत. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात अनेक मते-मतांतरे होती. स्वातंत्र्य कसे मिळवायचे याबाबतचे मार्ग वेगवेगळे होते. लढा-झुंज देऊन स्वातंत्र्य मिळविण्याचे नेतृत्व बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय आदीं करीत होते. ब्रिटिशांनी या देशातील हिंदू आणि मुस्‍लिम यांच्यात फूट पाडण्याचे काम केले. या दोहोंसोबत इतरही काही घटक आणि सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांवरच थेट हमलाच केला असे असतानादेखील गांधीजींनी आपला शांततेचा, चर्चेचा मार्ग सोडला नाही. आपल्या या मार्ग आणि कृतीबद्दलसुद्धा ते सतत विस्ताराने इतरांना समजूनच सांगत होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अध्यात्मिक वळण देत अगदी उच्च पातळीवर चर्चा, संभाषण चालूच ठेवले. आपण भारतीयसुद्धा ब्रिटिशांच्या बरोबरीचेच आहोत, हा आत्मविश्वास त्यांनी भारतीयांमध्ये निर्माण केला. आणि जागतिक महासत्ता असलेल्या ब्रिटिशांना शांततेच्या मार्गाने पराभूत करू शकतो, हे दाखवून दिले. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर होती. अशा परिस्थितीमध्ये देखील गांधीजींनी आवाज दिल्यावर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि आपण अशक्यप्राय ते शक्य करू शकतो, याचा विश्वास दिला. आजची परिस्थिती अगदीच भिन्न आहे. आपण आर्थिककदृष्ट्या सक्षम आहोत. इंटरनेट, मास मीडियामुळे जग जवळ आले आहे. लोकांच्या महत्त्वाकांक्षा अनेक पटीने वाढल्या आहेत. या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा अनेक समस्यांमुळे पूर्ण होत नसल्याने लोकांमध्ये नैराश्य वाढत आहे. वाढते नैराश्य दूर करण्याचे तर सोडाच त्यास प्रोत्साहन देण्याचे काम काही राजकीय पक्ष करीत आहेत. परिस्थिती अधिक विस्फोटक बसविण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रोत्साहन ठिणगी पेटून देण्याचे काम करीत आहे. या नैराश्येतून अनेक घटना घडत असल्याचे दैनंदिन बातम्यांमधून आपण पाहत आहोत. भारतासारख्या बहुलवादी समाज रचनेत जेथे २६ प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, अनेक धर्म, पंथ, जाती, संस्कृतीचे लोक एकत्र राहतात तेथे अनेक प्रकारच्या समस्या दररोज पुढे येत असतात. राजकीय नेत्यांनी जनतेच्या या समस्या दूर करीत त्यांना दारिद्र्य, अंधश्रद्धा, अंध विश्वास यांच्याविरोधात लढायला शिकविले पाहिजे. जीवनात उच्च उद्देश-ध्येय असतील तर संपूर्ण मानवदात त्याबद्दल सकारात्मक पद्धतीने प्रतिक्रिया देते, हे जगभरात विविध प्रसंगातून दिसून आले आहे. अशावेळी योग्य दिशेने चर्चा घडवून आणल्यास चांगला प्रामाणिक निर्णय घेतला जाऊ शकतो. नेमक्या अशा पद्धतीने गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत अशा पद्धतीने सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याच्या प्रक्रिया हरवून बसली आहे. अधिकारांचे केंद्रीकरण करून लोकांच्या मनामध्ये भय निर्माण केले जात आहे. अशा परिस्थितीत चांगले राजकीय नेतृत्वच विस्कटलेली घडी नीट बसवून समाजातील प्रत्येक घटकांचा राष्‍ट्र उभारणीत सहभाग घेऊ शकते. सध्या सर्वच राजकीय पक्षांचा मुख्य उद्देश आगामी लोकसभा निवडणूक जिंकून आपणच सत्तेत यायचा आहे. जनतेच्या अडचणी कमी करून राष्ट्राचा विकास करायचा कोणाच्याही ध्यानीमनीसुद्धा दिसत नाही. त्यामुळे गांधीवादी नेतृत्वासाठी आपण कोणत्याही राजकीय पक्षावर अवलंबून राहू शकत नाही. अशावेळी आपण प्रत्येकाने बदलाचा घटक बनायला हवे. आपण पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे आपले काम केले तर आपल्यातूनच चांगले नेतृत्व उदयास येईल. असे झाले तरच देशाचा विकास आणि भरभराट होईल. आपण सर्व जण या देशाचे घटक आहोत, आपला जन्म येथे झाला, या मातीत आपण वाढलो आहोत. आपला धर्म, जात वेगळी अाहे, समस्या भिन्न अाहेत. परंतु आपल्या सगळ्यांना समग्र, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सर्वांच्या भावनांचा आदर करणाऱ्या भारत देशात राहण्यास नक्कीच आवडेल. आणि हेच गांधींजींचे स्वप्न होते. गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करुन त्यांनी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याच्या, काम करण्याच्या दाखविलेल्या मार्गावर चालू या. शांततामय, प्रेममय वातावरणात संभाषणातून सर्वांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करू या... अनिल राजवंशी, ९४२२४०२३२६ (लेखक शेती तसेच सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अाहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com