माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक पातळीवरील समुद्रांच्या तापमानवाढीचे मोजमाप प्राधान्याने १९५० पासून केले जाते. मात्र, ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने १८७१ पासून २०१७ या काळातील समुद्राच्या तापमानातील वाढीचा आलेख मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण गणितीय प्रारूप वापरले आहे. गेल्या शतकापासून हरितगृह वायूंचे उत्सर्जन वेगाने वाढत गेले आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त ऊर्जेपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक ऊर्जा ही समुद्राकडून शोषली जाते. ही बाब सागरी पातळी वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे मानले जाते. आंतरशाखीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष पीएनएएसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
सागरी तापमानाची माहिती मिळविण्यासाठी संशोधकांनी प्रो. समर खातीवाला यांनी विकसित केलेल्या गणितीय प्रारूपाचा वापर केला. त्याविषयी माहिती देताना प्रो. खातीवाला म्हणाले, की या पद्धतीमध्ये समुद्राच्या पृष्ठभागामध्ये वेगवेगळ्या रंगाचे डाय मिसळून, त्यांचा प्रसार वेगवेगळ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे होतो, याचा अभ्यास केला जातो. ही माहिती अन्य कोणत्याही घटकाशी उदा. मानवनिर्मिती कार्बन किंवा उष्णता यांच्यावर राबवली जाते. जर आपल्याकडे १८७० मधील उत्तर अॅटलांटिक सागराचे तापमान ज्ञात असेल, तर त्यात पुढे वाढत गेलेल्या उष्णतेमुळे किती भर पडली ते काढता येते. अगदी २०१८ तील खोल भारतीय समुद्रातील वाढही काढता येते. ही कल्पना २०० वर्षांपूर्वी इंग्लिश गणिती जॉर्ज ग्रीन यांनीही मांडली होती. १८७१ ते २०१७ पर्यंतच्या जागतिक सागरी तापमानातील अंदाजित वाढ ही ४३६ x १०२१ ज्युल्स एवढी आहे. हे प्रमाण प्राथमिक ऊर्जेच्या व्ययाच्या १००० पट असल्याचे दिसून येते. या अभ्यासात १९२० -१९४५ आणि १९९० -२०१५ या कालावधीतील तापमानांचा तुलनात्मक विचार करण्यात आला. पर्यावरणात मानवी कार्यामुळे उत्सर्जित केल्या जाणाऱ्या आणि समुद्राकडून शोषल्या जाणाऱ्या अतिरिक्त ऊर्जेचे पुरावे मिळाले आहेत. नवीन अंदाजानुसार गेल्या ६० वर्षांतील अर्ध्या काळापर्यंत उष्णतेमध्ये वाढ झाल्याचे मांडले जाते. परिणामी, अॅटलांटिक सागराच्या खालील आणि मध्य अक्षांशांवरील पातळीमध्ये सागरातील विविध प्रवाहामुळे फरक पडतो. या प्रारूपावर अधिक काम करण्याची आवश्यकता असली तरी यातून तापमानांचे मोजमाप मिळवणे शक्य आहे. त्याबद्दल माहिती देताना प्रो. झाना म्हणाले, की हे तंत्र मानवनिर्मित कार्बनचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हा कार्बन सागरी प्रवाहाद्वारे वाहून नेला जातो. मात्र, सागरी उष्णता प्रवाहित होण्यामध्ये सागरी पाण्याच्या बदलत्या घनतेचे परिणाम होतात. नव्या तंत्राद्वारे सागरी तापमानातील बदल व मोजमाप मिळवणे शक्य होते. यातून सागरी तापमानाविषयी आजवर उपलब्ध नसलेली माहिती मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे.