मागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी यांनी आपली आचार्य पदवी अमेरिकेत डॉ. वॉक्समन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. त्यांनी अॅग्रीकल्चरल मायक्रोबायोलॉजी (कृषी सूक्ष्मजीवशास्त्र) या नावाचे एक पुस्तक इंग्रजीतून लिहिले आहे. त्या पुस्तकातील महत्त्वाच्या बाबींचा परिचय करून घेऊ. अॅग्रीकल्चरल मायक्रोबायोलॉजी (कृषी सूक्ष्मजीवशास्त्र) या डॉ. रंगास्वामी लिखित व १९६५ साली एशिया पब्लिशिंग हाउसतर्फे प्रकाशित पुस्तकातील एका परिच्छेदाचे भाषांतर पाहू. ‘‘वनस्पतीच्या गरजेची अन्नद्रव्ये जमिनीत क्लिष्ठ स्वरूपात साठविली जातात, की ना ती सहज पाण्यात विरघळतात, ना ती सहज पिकाला उपलब्ध होतात. रंगास्वामी लिहितात, सहज उपलब्ध होणारी अन्नद्रव्ये झटकन निचऱ्यावाटे जमिनीबाहेर निघून जाऊ शकतात. अशा परिस्थितीत जमिनीची उत्पादन क्षमता अशा उपलब्ध अन्नद्रव्यावर अवलंबून नसते, तर वाढणाऱ्या वनस्पतीच्या गरजेनुसार स्थिर साठ्यातून जलद उपलब्ध साठ्यात रूपांतर करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. जमिनीतील अनेक सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.’’ वरील परिच्छेदात प्रचंड अर्थ भरला आहे. त्याचे चिंतनातून अनेक पारंपरिक विचारांना मूठमाती द्यावी लागेल. १९६५ साली मांडलेल्या या विचारांवर शेती शास्त्रात आजही फारसा विचार केला जात नाही. अजूनही आपण मातीच्या रासायनिक पृथक्करण करण्याची शिफारस करतो. मातीतील उपलब्ध अन्नद्रव्ये मोजून खतांच्या शिफारसी फक्त करतो. अन्नद्रव्यांच्या स्थिरीकरण - उपलब्धीकरणाबाबत अवाक्षरही काढत नाही. त्यातील सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे स्वतः लेखक अखिल भारतीय मृद-रसायन शास्त्रज्ञांच्या संस्थेचे (अलाहाबाद) काही काळ अध्यक्ष असूनही त्यांचे विचार शास्त्रीय जगतात उतरू शकले नाहीत. त्यांच्यानंतर महाराष्ट्रातील ज्येष्ठ मृद्शास्त्रज्ञ डॉ. गो. का. झेंडे (पुणे) वरील संस्थेचे अध्यक्ष झाले. निवृत्तीनंतर त्यांची व माझी अनेक वेळा चर्चा झाली. परंतु, शेवटपर्यंत त्यांनी स्थिरीकरण - उपलब्धीकरणाची संकल्पना मान्य केली नव्हती. याच मताशी आजचे बहुतेक शास्त्रज्ञ चिकटून आहेत. शास्त्रीय जगतातील या अमान्यतेचा कृषी क्षेत्रावर प्रत्यक्ष परिणाम काय झाला? त्याचे उत्तर - पहिल्या १५-२० वर्षे उत्पादनाचे विक्रम करणाऱ्या हरित क्रांती उत्तर काळात अपयशी ठरली याची कारणमीमांसा आजही आपण योग्यप्रकारे करू शकलेलो नाही. रासायनिक खताचा वापरही शेतीतील सर्वांत खर्चिक ठरत आहे. त्यात ती भारतात तयार होत नसल्याने प्रचंड परकीय चलन खर्चून आयात करावी लागतात. सरकार त्यावर मोठे अनुदान देत असल्याने खतांच्या किमती शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीच्या आवाक्यात राहतात. वास्तविक खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रबोधन व्हायला हवे. मात्र, ते होताना दिसत नाही. या पुस्तकातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि चिंतन करण्यायोग्य मुद्दे देत आहेत.
असे अनेक चांगले संदर्भ या १९६५ साली प्रकाशित पुस्तकातून मिळतात. त्या वेळी हरितक्रांतीला नुकतीच सुरवात झालेली होती. त्या वेळी केवळ उत्पादन वाढीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. रासायनिक खतांचा वापर आणि नव्या सुधारित जाती यातून यशाकडे वाटचाल होत होती. अगदी लेखकालाही पुढे येऊ घातलेल्या हरितक्रांतीच्या अपयशाची चाहूल लागलेली नसेल किंवा अशी कोणी वाच्यता जरी केली, तरी त्याला मुर्खात काढले गेले असते. मात्र, या पुस्तकातील अशा काही निवडक संदर्भावर चिंतन केल्यास पुढे घडलेल्या अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो. ही सुक्ष्मजीवशास्त्राची पुस्तके ५०-६० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली आहेत. बहुतेक पुस्तके आज बाजारात उपलब्ध नाहीत. तसेच ही शास्त्रीय व तांत्रिक इंग्रजी भाषेत आहेत. त्यातील तत्त्वे, मुद्दे केवळ इंग्रजी येते म्हणून सर्वांनाच समजतील असे नाही. प्रत्येक मुद्द्याचे चिंतन करून प्रत्यक्ष शेतामध्ये, जमिनीच्या सुपीकतेसाठी कशाप्रकारे राबवायचे याचा विचार व्हायला हवा. सामान्य शेतकऱ्यांसाठी काही मुद्दे दिले आहेत. ते उपयोगी ठरतील असे वाटते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.