उन्हाळी भुईमूग अवस्था ः शेंगा भरणे शेंगा भरत असताना जास्तीत जास्त आकार व वजन वाढण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश (००:००:५०) ७० ग्रॅम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण (मल्टीमायक्रोन्युट्रीएंट) ५० ग्रॅम प्रती १५ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. लसूण अवस्था ः काढणी लसूण पिकाची काढणी केल्यानंतर तो लसूण साठवणगृहात हवा खेळती राहील अशा रीतीने साठवावा. चारा पिके
सध्या चाराटंचाई असताना उपलब्ध चाऱ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करावा. हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती, अॅझोला उत्पादनातून कमी खर्चात पशुखाद्यास पर्याय तयार करावेत. उपलब्ध असलेल्या शुष्क चाऱ्यावर युरिया प्रक्रिया केल्यास जनावरे चांगल्याप्रकारे खातात. क्षार पुरवठा आणि पशुआहार पुरविण्याचे वेळेत योग्य ते बदल यांचा अवलंब करावा. प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून ३० ते ४०% पर्यंत होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो. ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे, अशा जमिनीत आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. सरी, वरंबे व चरी खालील जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास १६% जास्तीचे क्षेत्र वापरता येते. आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करून नेमकेच पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही व जमिनीची धूप होत नाही. तसेच, या पद्धतीद्वारे रासायनिक खते देणे शक्य असते. पाणी वापरातील बचत ५०% पर्यंत व उत्पादनातही लक्षणीय वाढ होते. जमिनीतील क्षार मुळाच्या खाली जात असल्याने व मुळाभोवतीची संतृप्त असल्याने क्षारांचा उपद्रव कमी होतो. तणांचे प्रमाण, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे शक्य असते. तुषार सिंचनानंतर पाऊस पडला तरी पिकांवर अनिष्ठ परिणाम होत नाही. कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्रावर सिंचन करता येते. पाण्याच्या कमतरतेनुसार पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर (ठिबक सिंचन व तुषार सिंचन ) पीकनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात करावा. त्यामुळे पाण्याची बचत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर न केलेल्या पिकांच्या तुलनेत १००% उत्पादनात वाढ दिसून येते. उत्पादित होणाऱ्या मालाची गुणवत्ता व प्रतदेखील उल्लेखनीय असते. कृषि अभियांत्रिकी खरीप हंगामासाठी शेत तयार करण्यासाठी नांगरट करणे, ढेकळे फोडणे, पाळी देणे अशी कामे पूर्ण करावीत. बैलजोडीने कामे करत असल्यास कामे सकाळच्या सत्रात आटोपून घ्यावीत. खरीप नियोजन
पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंबे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्याच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. आपल्या शेतातील मातीचा नमुना त्यात अन्नद्रव्याचे प्रमाण, जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजेच सामू तपासून जमिनीबाबतची माहिती घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाण्याचे नियोजन करावे. (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)