कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारी, कलिंगड

कृषी सल्ला
कृषी सल्ला

सद्यस्थितीचा विचार करता पिकानिहाय खालील प्रकारे नियोजन करावे. 

भात अवस्था-परिपक्वता तयार झालेल्या भातपिकाची सकाळी कापणी करून घ्यावी. त्याची लगेच मळणी करावी. भात उन्हामध्ये चांगले वाळवणे.

आंबा

  • फांदेमर रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या फांद्यांमधून डिंक येत असल्यास रोगग्रस्त साल तासून घ्यावे. त्या ठिकाणी बोर्डो मिश्रणाची पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराइडची पेस्ट लावावी.
  • आंब्यावरील फांदेमर रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराइड ३ ग्रॅम.
  • आंब्यामध्ये रोगट व सुकलेल्या फांद्या, बांडगुळे कापून घ्यावीत. त्या ठिकाणी १ टक्का बोर्डो मिश्रण लावावे.
  • आंबा बागांमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी डेल्टामेथ्रिन (२.६ ईसी) ०.९ मि.ली. टीप -फवारणी खोडावर, फांद्यांवर व बागेच्या आजूबाजूच्या रायवळ आंब्यांनासुद्धा करावी.
  • काजू काजूवरील ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी लॅंबडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के) ०.६ मि.ली.

    नारळ/सुपारी

  • नारळाच्या कोंबकुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी कुजलेला कोंब साफ करून घ्यावा. त्यामध्ये १ टक्का बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून ओतावे.
  • नारळावरील गेंडाभुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी, बागेमध्ये शेणखताच्या खड्ड्यात दर दोन महिन्यांनी शिफारशीत कीडनाशकाचे द्रावण फवारावे.
  • नारळावरील सोंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी,
  • खोडावर १ मीटर उंचीवर गिरमिटाच्या साहाय्याने १५ ते २० सें.मी. खोल तिरपे छिद्र पाडून, त्यामध्ये २० मिली क्‍लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २० मिली नरसाळ्याच्या साहाय्याने ओतावे. छिद्र बंद करून घ्यावे.
  • भाजीपाला लागवड रब्बी हंगामासाठी टोमॅटो, वांगी व मिरची यांची रोपे तयार करावीत. रोपांचे जीवाणूजन्य मर या रोगांपासून संरक्षण करण्याकरिता पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर कॉपर ऑक्सिक्‍लोराइड २ ते २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी, तसेच वाफ्याच्या बाजूने मुंग्यांच्या बंदोबस्तासाठी शिफारशीत कीडनाशकाचा वापर करावा. पेरणीपूर्वी ३ ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

    कलिंगड    कलिंगडाची लागवड करण्यासाठी जमीन नांगरून कुळवून तयार करावी. लागवडीसाठी ४ मीटर अंतरावर पाट किंवा सऱ्या काढाव्यात. पाटाच्या दोन्ही बाजूंस ९० सें.मी. अंतरावर ३० x ३० x ३० सें.मी. आकाराचे खड्डे करून त्यात १ ते १.५ किलो चांगले कुजलेले शेणखत व कार्बारील (१० टक्के पावडर) १० ग्रॅम याप्रमाणे मिसळून खड्डा भरून घ्यावा. प्रत्येक खड्ड्यात ३-४ बिया एकमेकांपासून ४-५ सें.मी. अंतरावर व २ ते २.५ सें.मी. खोलीवर लावाव्यात. रुजवा झाल्यानंतर १५ दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी २ चांगली जोमदार रोपे ठेवावीत. या पिकाला प्रतिहेक्‍टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याची मात्रा द्यावी. स्फुरद आणि पालाश याची संपूर्ण मात्रा व नत्राची १/३ मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा सम प्रमाणात विभागून १ व २ महिन्यांनी लागवडीनंतर द्यावी.

    संपर्क ः : डॉ. सुभाष चव्हाण, ९४२२४३१०६७ : डॉ. ज्ञानेश्‍वर जगताप, ९४०३९८८१४३ : प्रा. विरेश चव्हाण, ९४२२०६५३४४ (कृषिविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com