जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत फायदेशीर...

जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत फायदेशीर...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत फायदेशीर...

जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवणे आवश्यक आहे. दरवर्षी प्रत्येक जमिनीची नांगरट करावीच असे नाही. आपल्या जमिनीच्या आणि आपण घेणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार मशागत करावी. त्याकरिता त्या जमिनीवरील मागील पीक, पुढे द्यावयाचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादीवर अवलंबून असते. पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते. कारण या वेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरट खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो. जमिनीस सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा होतो.

  • हंगामात घ्यावयाच्या पिकानुसार नांगरटीची खोली ठरवावी. सर्वसाधारणपणे ऊस, बटाटा, आले, भाजीपाला इत्यादी बागायती पिकांसाठी जमिनीची १५ ते २० सें.मी खोल नांगरट करावी. ज्वारी, बाजरी, गहू, भुईमूग या पिकांसाठी जमिनीची १० ते १५ सें.मी. खोल नांगरावी.
  • नांगरटीमुळे जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे पाऊस, ओलीताचे पाणी जमिनीत सहज मुरते. जमिनीत हवा खेळती राहते. पाण्याचा चांगला निचरा होतो. पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीची प्राकृतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन जलदरीत्या होऊन पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये मुक्त होतात. जमिनीतील जीवाणूंची वाढ होते. जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता वाढते.     
  • जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास किंवा पीक काढल्यानंतर जमीन नांगरण्यास वेळ गेल्यास मध्यम व भारी जमिनीत ढेकळे निघतात, अशा जमिनीत खरीपाची पिके घ्यावयाची  असल्यास पहिला पाऊस पडेपर्यंत ढेकळे तशीच राहू द्यावीत. पाऊस आणि उन्हामुळे ढेकळे नरम होऊन फुटण्याचे काम आपोआप होते. दोनही हंगामात पिके घ्यावयाची असल्यास बैल अवजाराच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टर सहाय्याने ढेकळे फोडावीत. पाणी उपलब्ध असल्यास पाणी दिल्याने ढेकळे  नरम पडतात.त्यानंतर मैद फिरवल्याने ढेकळे फुटतात. जमिन सपाटीकरण होते.
  • ढेकळे फोडण्याने जमीन सपाट करण्यास सुलभ होते. कुळव्याच्या पाळ्या देता येतात. जमिनीत शेणखत,कंपोस्ट खत चांगले पसरविता येते. सरी सरळ रेषेत येते. गादीवाफे सहजरीत्या तयार करता येतात. ढेकळे फोडल्याने पूर्वीच्या पिकांची धसकटे, काडीकचरा वेचता येतो.
  • कुळवणीमुळे जमीन भुसभुशीत होते. जमिनीत हवा खेळती राहते. पिकांची मुळे योग्य खोलीपर्यंत वाढतात.तणांचे नियंत्रण होते. शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत मिसळावे.
  • सपाटीकरणामुळे पावसाचे पाणी किंवा पाटाचे पाणी एकाच दिशेने जमिनीतून वाहून न जाता किंवा कुठेतरी साचून न राहता ते सर्व ठिकाणी सारखे बसते. मात्र हे पुर्वमाशागातीचे काम प्रत्येक जमिनीत दरवर्षी करण्याची आवश्यकता नसते.
  • जमिनीचा भुसभुशीतपणा टिकून राहण्यासाठी तिच्या कणांची रचना सुधारली पाहिजे. यासाठी शेणखत अथवा कंपोस्ट खताचा वापर करावा. शेणखताच्या वापराने जलधारणशक्ती वाढते.
  •  ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com