भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवा

भुरीची लक्षणे
भुरीची लक्षणे

सर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ दिवसांमध्ये निरभ्र राहण्याची शक्यता आहे. नाशिक विभागात रात्रीचे तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाईल. सांगली, पुणे, सोलापूर विभागात तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. बंगालच्या उपसागरात तयार झालेले वादळ हळूहळू देशाच्या दक्षिण भागात वळले असले तरी  त्या परिणामामुळे आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यता फारच कमी आहे.

येत्या शनिवारी, रविवारी सांगली, पुणे विभागामध्ये वातावरण अधूनमधून ढगाळ होण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी रिमझीम पावसाची शक्यता आहे. नाशिक विभागात वातावरण ढगाळ होण्याची शक्यता नाही. सर्वच विभागामध्ये दुपारचे कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सकाळी कोठे दव पडले तरी दुपारच्या गरम वातावरणामुळे डाऊनी मिल्ड्यू कोठेही वाढण्याची शक्यता दिसत नाही. म्हणून फक्त संरक्षणात्मक फवारणी करावी. ज्या ठिकाणी बाग फुलोरा किंवा जवळच्या अवस्थेत आहे तेथे डाऊनी मिल्डूच्या नियंत्रणासाठी मॅंकोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी  घेण्यास हरकत नाही. घड फुलोऱ्यात असताना रात्रीच्या थंडीच्या पडलेल्या दवामुळे फुलांच्या टोपणात किंवा घडात जास्त वेळ पाणी राहण्याची शक्यता असते. त्यामुळे बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कळत-नकळत गळ होण्याची शक्यता असते. गळीच्या नियंत्रणासाठी वरील फवारणी उपयोगी ठरले.

ढगाळ वातावरण आणि रात्रीचे तापमान हळूहळू थंड होत असल्यामुळे पुढील काही दिवसात सर्वच विभागात भुरी वाढण्याची शक्यता आहे. भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्लूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारल्यास चांगले नियंत्रण मिळू शकते. सल्फर आंतरप्रवाही नसल्यामुळे फवारणीच्या योग्य कव्हरेजकडे लक्ष द्यावे. कॅनॉपी जास्त दाट असल्यास घडाच्या खालच्या बाजूची पाने १ ते २ पाने किंवा जास्त असलेल्या वांझ फुटी कमी कराव्यात. जेणेकरून घड व जवळपासच्या पानांवर सल्फरच्या फवारणीचे चांगले कव्हरेज होऊ शकेल. सल्फरच्या फवारणीनंतर सल्फर ज्या ठिकाणी पोहोचत नाही, असा ठिकाणी भुरी वाढू शकते. याची काळजी घ्यावी.  

सकाळचे तापमान कमी होत असल्यास आणि त्याचबरोबरीने दव किंवा आर्द्रता वाढत असल्यास जैविक उपाय भुरीच्या नियंत्रणासाठी फायद्याचे होऊ शकतो. तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या जवळपास असल्यास ॲंपिलोमायसीस ( २ ते ५ ग्रॅम किंवा मि.लि. प्रतिलिटर पाणी) वापर फवारणीसाठी प्रभावी होऊ शकेल. सकाळचे तापमान जास्त असल्यास ट्रायकोडर्माचा वापर फवारणीसाठी (२ ते ५ ग्रॅम किंवा मि.लि.प्रति लिटर पाणी) फायद्याचा होऊ शकेल.

भुरीचा प्रादुर्भाव झालेली १, २ पाने कॅनोपीमध्ये दिसत असल्यास जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीची फवारणी १ ते २ दिवसांच्या अंतराने लागोपाठ घ्यावी. जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीचा वापर करण्याअगोदर किंवा नंतर बागेमध्ये ट्राय अझोल किंवा ‘एचडीएचआय’ गटातील बुरशीनाशके वापरलेली नाहीत याची दक्षता घ्यावी.

बाग फुलोऱ्यात असताना वरील गटातील बुरशीनाशके वापरलेली असल्यास जैविक नियंत्रणाचा वापर न करता भुरीच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या वापरावर भर देऊन भुरी चांगल्या प्रकारे नियंत्रित करून घ्यावी. असा प्रकारची बुरशीनाशके फळधारणेनंतर म्हणजेच ५५ ते ६० दिवसांनंतर वापरल्यास रसायनांचा अंश सापडण्याचा धोका वाढतो म्हणून अशा बुरशीनाशकांचा वापर ५५ ते ६० दिवसांनंतर टाळणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून अशा बुरशीनाशकांच्या एखाद दोन फवारण्या फुलोरा ते फळधारणेपर्यंत घेतल्यास त्या नंतरच्या काळात त्याचा उपयोग करणे आवश्यक राहणार नाही. असे केल्यास ६० दिवसानंतरच्या बागेमध्ये जैविक नियंत्रणाच्या वापरावर भर देणे आवश्यक आहे.

ज्या बागेमध्ये अजूनपर्यंत भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर वापरलेले असेल अशा बागांमध्ये जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीचा वापर करणे फायदेशीर ठरणार आहे.

- ०२० -२६९५६००१ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com