सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली आहे, तर काही ठिकाणी अजून छाटणी सुरू होत आहे. अशा परिस्थितीत सततच्या पावसामुळे अडचणी येत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. घड जिरण्याची समस्या ः
ज्या ठिकाणी फळछाटणी होऊन पोंगा अवस्था असेल आणि यावेळी ढगाळ वातावरण किंवा पाऊस असेल तर वेलीमध्ये अचानक बदल घडून आलेले दिसतात. यालाच शरीरशास्त्रीय हालचालीमध्ये येत असणाऱ्या अडचणी म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये मुळांद्वारे वेलीमध्ये होत असलेले सायटोकायनीनचे वहन कमी प्रमाणात होते. तर जिबरेलिन्सचे प्रमाण वाढते. म्हणून वेलीच्या वाढीचा जोम जास्त होतो. वाढलेल्या जिबरेलीन्समुळे नवीन फुटीत येत असलेला घड जिरण्याकडे प्रवृत्त होतो. पोंगा अवस्थेतील बागेत फक्त डोळे फुटण्याची अवस्था असल्यामुळे हे आपल्याला कळून येत नाही. या परिस्थितीतील बागेतील बोद मोकळे रहातील याची काळजी घ्यावी. बोदातून पाणी बाहेर जाण्याकरता दोन ओळीमध्ये एक छोटी चारी घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. सध्याच्या काळात बागेतून बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. वाढीचा जोम कमी करण्याच्या उद्देशाने पोंगा अवस्थेमध्ये शोषण करण्यास सक्षम असलेला डोळा बघून ०-०-५० ची फवारणी (दीड ते २ ग्रॅम प्रति लिटर) तसेच ६ बीए १० पीपीएम (शिफारशीप्रमाणे) फवारणी केल्यास घड जिरण्यावर नियंत्रण ठेवता येईल. याचसोबत जमिनीतून ठिबकद्वारे ०-०-५० हे २ ते ३ किलो प्रति एकर द्यावे. यामुळे वेलीची वाढ नियंत्रणात राहील. त्याळे घड जिरण्याची समस्या कमी राहील. फळछाटणीनंतर प्रत्येक काडीवर ३ ते ४ डोळ्यांना हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग केले जाते. त्यानंतर सगळेच डोळे फुटून येतात. या सर्व फुटीपैकी आवश्यक तेवढ्या फुटी व घड राखून इतर फुटी १४ ते १५ व्या दिवशी काढण्याची शिफारस आहे. यावेळी वाढीचा जोम जास्त दिसून येतो. प्रत्येक फुटीवर चार-पाच पानाची ही अवस्था ३ ते ४ फुटी मिळून दाट कॅनॉपी तयार होते. फुटी काढण्याकरिता विलंब झाल्यास या कालावधीमध्ये जास्त आर्द्रतेचे वातावरण तयार होते. त्यासोबत वेलीमध्ये नायट्रेट प्रमाण वाढते. पाऊस सतत असल्यामुळे नाजूक घडाच्या दांड्यावर जर काहीवेळ पाणी साचून राहिले तरी फळकुजीची संभावना जास्त असते. या समस्येवर मात करण्याकरिता बागेतील फेल फुटी वेळेवर काढाव्यात. सुरवातीच्या काळात तळातील १ - २ पाने काढून घ्यावीत. जेणेकरून कॅनॉपी सुटसुटीत राहून मोकळी हवा खेळती राहील. ०-०-५० एक ते दिड ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून २ ते ३ फवारण्या केल्यास वेलीची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. फळछाटणीनंतर पोंगा अवस्था ते फुलोरा अवस्थेपर्यंतच्या बागेत या वातावरणात डाऊनीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी दिसून येतो. विशेष म्हणजे काळ्या जमिनी असलेल्या बागेत कमी पाऊस असूनसुद्धा आर्द्रता जास्त वाढलेली असेल. बागेतील तापमान अाणि दाट कॅनॉपी यामध्ये डाऊनी रोगाच्या जिवाणूंना पोषक वातावरण मिळते. या रोगाचे जिवाणू जमिनीतून मातीच्या कणाद्वारे तसेच हवेतूनसुद्धा प्रसार होतो. ज्या ठिकाणी झडतीचा पाऊस आला असेल त्या ठिकाणी वेलीच्या खालून मातीच्या उडण्यामुळे रोगाचा प्रसार होण्याची संभावना जास्त असते. ज्या ठिकाणी ओलांडा किंवा काडीवर अगोदर असलेली जुनी रोग्रस्त पाने हवेद्वारे रोगाचा प्रसार करण्यात कारणीभूत ठरतात. बऱ्याच ठिकाणी आपल्या सोईनुसार आपण एकाच क्षेत्राची टप्प्याटप्प्याने छाटणी करतो. ही परिस्थिती रोग वाढण्यास मदत करते. संपर्क ः ०२०-२६९५६०६० राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे