गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी आवश्यक

गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी आवश्यक
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी आवश्यक

द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये वातावरणातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे अनेक अडचणी येत असतात. काही भागांमध्ये नुकतीच गारपीट झाल्याने बागांना फटका बसला आहे. अशा अडचणी जाणून घेऊन त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ. येत्या दोन दिवसांमध्ये सांगली, उस्मानाबाद, लातूर भागामध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे वातावरण पुन्हा निरभ्र राहील. परिणामी, या भागातील तापमानामध्ये वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. यासोबतच औरंगाबाद, जालना, लातूर, भागामध्ये तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस व त्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. अन्य भागांमध्ये ४० अंशांपर्यंत तापमान राहील. सध्याच्या परिस्थितीत हवेचा वेग ८ ते १४ किमी प्रतितास असेल. मात्र, हा वेग वाढत जाईल. या वातावरणामध्ये द्राक्ष बागेवर होणारा परिणाम आणि उपाययोजना याविषयी माहिती घेऊ. गारपीट झालेल्या बागेतील परिस्थिती ः सांगली जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागेमध्ये नवीन काड्याचे नुकसान जास्त झाले. या भागामध्ये पाणी कमी असल्यामुळे बऱ्याच बागेमध्ये खरड छाटणी ही वेळेवर करण्यात आली असेल. येथील बऱ्याच बागांमध्ये सध्या सबकेन तयार होऊन सबकेनच्या पुढील फुटीचा शेंडा मारला गेला आहे. अशा वेळी गारांचा मार बसल्यास आधी पाने चिरतील, तुटून पडतील व त्यानंतर काडीवर जखमा होतील. सबकेनच्या अवस्थेत ही काडी परिपक्व झालेली नसते. काडीची गुलाबी रंगाकडून दुधाळ रंगाकडे वाटचाल सुरू असताना या काडीवर जर मार बसला, तर जखमा होण्यासोबतच काडी मोडण्याची स्थिती असेल. काही बागेत ३-४ पाने अवस्था असून, पूर्ण पाने व काडीसुद्धा तुटलेल्या दिसत आहेत. या बागांमध्ये खालील प्रकारे नियोजन करावे. १) ज्या बागेत गारपीट झाली व काडीवर जखमा झालेल्या असतील अशा ठिकाणी बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. पुढील काळात बागेमध्ये आर्द्रता जास्त प्रमाणात राहील. त्यामुळे ट्रायकोडर्माची फवारणीसुद्धी फायद्याची राहील. २) जिथे फक्त पाने चिरलीत अशा ठिकाणी परिस्थिती पाहून पुन्हा ३-४ पाने वाढवून घ्यावीत. यामुळ पुढील घडाच्या पोषणाकरिता आवश्यक असलेले अन्नद्रव्य काडीमध्ये गोळा करता येईल. ३) ज्या बागेमध्ये ३-४ पानांच्या अवस्थेत गारपिटीमुळे पाने व काडी मोडल्याची स्थिती असेल; तिथे काडीच्या तळातील १-२ डोळा राखून खराब झालेली काडी काढून टाकावी. ४) अन्नद्रव्यांचा पुरवठा या वेळी आवश्यक असेल. नत्र व स्फुरदयुक्त किंवा फक्त नत्रयुक्त खतांचा पुरवठा करावा. ५) या वेळी बागेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त वाढेल व त्याचा फायदा नवीन वाढीकरिता होईल. अशा स्थितीमध्ये बागेमध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भावही वाढू शकतो. तेव्हा फिप्रोनील (८० डब्ल्यू जी) ०.६२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) २.२० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. जुन्या बागेतील व्यवस्थापन ः जुन्या बागेत या वेळी सबकेन काही ठिकाणी तयार झाले असेल, तर काही ठिकाणी सबकेनची वेळ असावी. ज्या बागेत सबकेन करून बगलफूट जर पीचिंग केली असल्यास ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त वाढेल, अशा ठिकाणी काडीवर बगलफुटी जास्त प्रमाणात येण्याची शक्यता असेल. या बगलफुटी तशाच राहिल्यास कॅनोपीमध्ये गर्दी वाढून भुरी रोगाची समस्या वाढू शकते. अशा बागेत बगलफुटी काढून टाकणे व सोबतच शेंडा पीचिंग करणे गरजेचे असेल. काही भागामध्ये कोरडे वातावरण व या पूर्वीपासून असलेल्या मिलीबगच्या प्रादुर्भावामुळे छाटलेल्या बागेत पाने चुरगळल्यासारखी दिसून येतील. मिलीबगचा प्रादुर्भाव या काळात जास्त वाढतो. नवीन निघत असलेली फूट मिलीबगच्या प्रादुर्भावामुळे एका ठिकाण गोळा होते. त्यानंतर वाढ थांबते. याकरिता इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ४ मि. लि. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com