थंडी सुरू होण्याआधीचा ऋतू म्हणजे ऑक्टोबर महिन्यातले तापलेले ऊन. ऑक्टोबर हीट म्हणूनच हा महिना ओळखला जातो. या ऋतूत उष्णता प्रचंड वाढते. बऱ्याचदा एखादे लक्षण उष्णतेशी संबंधित आहे हे लक्षातच येत नाही. प्रत्येक वेळी छातीत आग होणे हे लक्षण असेल असे नाही. या सर्व लक्षणांची माहिती असणे अावश्यक अाहे. वातावरणात बदल झाल्यावर दुपारी प्रखर ऊन, मधेच येणारी परतीच्या पावसाची सर याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून सुरवातीपासूनच योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणे
उष्मा वाढल्यानंतर तळहात-तळपाय यांची आग होणे! डोळे गरम होणे, खूप घाम येणे, डोळे लाल होणे, संपूर्ण शरीर स्वतःला गरम असल्याचे भासणे अशी विविध लक्षणे व्यक्तिपरत्वे कमी-जास्त प्रमाणात दिसून येतात. शरीराचा गरमपणा स्वतःला जाणवत असला तरी थर्मामीटरमध्ये ताप दिसत नाही, लघवीला जळजळ होणे, शौचास होताना आग होणे या गोष्टीही उष्णता वाढल्यानेच होतात. काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळणे, आग होणे, वारंवार तोंड येणे या सर्व लक्षणांचे मूळ कारण उष्णता वाढणे हे अाहे. अर्थात लघवीला जळजळ हे युरिन इन्फेक्शनचेही लक्षण असते. त्यामुळे योग्य ठिकाणी आवश्यक त्या प्रयोगशालीन तपासण्या करून घेणे आवश्यक ठरते, पित्ताच्या उष्ण गुणात वाढ झाल्याने विविध उष्णतेशी संबंधित लक्षणे जाणवतात. उन्हामुळे त्वचा कोरडी पडते. त्यासाठी रोज खोबरेल तेल लावून त्यानंतर स्नान करावे. साबण लावणे टाळावे. तेलाने त्वचा मुलायम होते. रात्री झोपताना तळपायास तूप लावावे. ज्यामुळे झोप शांत लागते आणि डोळ्यांचेही आरोग्य सुधारते. विशेषतः उष्णतेचा परिणाम म्हणून डोळे ताणावणे, लाल होणे, ही लक्षणे कमी होतात. कामाहून घरी परत आल्यावर डोळ्यावर थंड दुधात बुडवलेल्या मऊ कापडाच्या घड्या ठेवाव्यात किंवा मऊ कापड गुलाब पाण्यात बुडवून घड्या ठेवाव्यात. लगेच चांगला परिणाम दिसून येतो. पोटात घेण्यासाठी प्रवाळ पिष्टी वटी, कामदुधा वटी योग्य मात्रेत घेतल्यास उष्णता कमी होते. गुलकंद रोज एक चमचा सेवन करावा. अनेकांना तोंड येणे हे लक्षणही आढळते. अशावेळी जाईची पाने चावून त्याचा रस तोंडात धरावा आणि चूळ भरावी अर्थात पाने स्वच्छ धुऊन घेतलेली हवीत. जेष्ठमध पावडर आणि कामदुधा वटी बारीक करून तुपात कालवून तोंड आलेल्या भागावर लावावे नंतर धुवून टाकावे. कामदुधा वटी पोटातही घ्यावी. पण मात्रा तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवावी. शरीरांतर्गत उष्णता वाढते तेव्हा त्या विविध लक्षणांच्या जोडीला आणखी एक पाहावयास मिळते ते म्हणजे नेहमीचे जेवणही तिखट लागते किंवा छातीत जळजळते. अशावेळी आवळा पावडर जेष्ठमध पावडर समभाग एकत्र करून अर्धा चमचा प्रमाणात पाण्यासह घ्यावी. शिवाय चंद्रकला वटी, प्रवाळ पिष्टी ही औषधे योग्य मात्रेत घेतल्यास परिणाम चांगला होतो. लघवीला जळजळ होत असेल तर धने पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. प्रयोगशाळेत तपासण्या करून घ्याव्यात. चंद्रकला वटी पोटात घ्यावी. बऱ्याचदा त्या ठिकाणी खाज येते. अशावेळी त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने जागा धुवावी. शौचास आग असल्यास जेष्ठमध पावडर धमासा पावडर एकत्र करून तुपासह घ्यावी. त्या ठिकआणी शतधौत धृत लावावे. आपण औषधे पोटात घेतली तरी पथ्य पाळावेच लागते. त्याशिवाय औषधे लागू पडत नाही. आहारात फार तिखट चमचमीत पदार्थ टाळावेत. दही टाळावे, त्याऐवजी गोड ताक प्यावे. लोणची, पापड, तळलेले पदार्थ बंद करावेत. पाणी भरपूर प्यावे. कोल्ड्रींक्स, ज्युसेस टाळावेत. फळे भरपूर खावीत. बाहेर जाताना रूमाल बांधावा. पाण्याची बाटली बरोबर ठेवावी. चप्पल न घालता फिरणे टाळावे. सनकोट, फूल शेर्टचा उपयोग करावा, ज्यामुळे सूर्यकिरणांपासून बचाव होतो. - विनीता कुलकर्णी