कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेल

कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेल
कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेल

कडवंची हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव. जल, मृद संधारण, पीक बदल, शेततळ्यातून सरंक्षित साठा करत गावाने हंगामी तसेच फळपिकातून क्रांती केली. शेतीला पूरक उद्योगांचीही जोड दिली. केंद्राने भविष्यात पर्यायी पीक पद्धती आणि एकात्मिक शेती पद्धती शेतकऱ्यांमध्ये रुजविण्यास सुरवात केली आहे.

जालना जिल्ह्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची स्थापना सप्टेंबर, १९९२ मध्ये झाली. मार्च १९९३ पासून कृषी विज्ञान केंद्राने प्रत्यक्ष कामकाजास सुरवात केली. सुरवातीला दोन वर्षे कृषी विज्ञान केंद्र हे जालना शहरातील संस्थेच्या जागेत कार्यरत होते. १९९६ मध्ये खरपुडी येथील नवीन वास्तूत स्थलांतरित झाले. तंत्रज्ञानाचा प्रसार हा कृषी विज्ञान केंद्राच्या ध्येय धोरणांचा केंद्रबिंदू. निवडक गाव समूहांच्या माध्यमातून शेती आणि शेती संलग्न आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणे व प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्याचे उद्दीष्ट होते. निवडलेल्या गाव समूहातील मुख्य गावास ‘फोकल व्हिलेज’ तर सभोवतालच्या २ ते ३ गावांना ‘सॅटलाईट व्हिलेज’ त्या वेळी संबोधले जायचे. कृषी विज्ञान केंद्रात सुरवातीपासूनच कृषिविद्या, उद्यानविद्या, पीक संरक्षण, कृषी अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, गृह विज्ञान विषयातील तज्‍ज्ञ कार्यरत आहेत. संस्थेचे सचिव बॅरिस्टर जे. एम. गांधी आणि विश्‍वस्त कृषिभूषण विजय आण्णा बोराडे हे कृषी विज्ञान केंद्र जास्तीत जास्त लोकाभिमुख कसे होईल याबाबत सकारात्मकदृष्ट्या मार्गदर्शन करत होते. मृद, जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनात मराठवाडा शेती साह्य मंडळाचे पायाभूत काम असल्यामुळे त्यादृष्टीनेच सर्व योजना आखण्यात आल्या. प्रशिक्षणाला सुरवात

  • कडवंची हे खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव. कापूस हेच गावाचे मुख्य पीक. रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू लागवड. फळबागा नावालाच होत्या. जवळच्या पीरकल्याण येथील धरणातून यशवंत सहकारी पाणीवाटप संस्थेच्या माध्यमातून पाच कि. मी. पाइपलाइन करून काही क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न दगडू पाटील क्षीरसागर, भगवानराव क्षीरसागर, विठठल आण्णा क्षीरसागर यांनी केला होता. मात्र, ज्यावेळी कृषी विज्ञान केंद्राने या गावामध्ये तंत्रज्ञान प्रसाराचे काम सुरू केले तेव्हा ही योजना कार्यरत नव्हती.
  • बहुतांश जमीन भारी, मध्यम, हलकी. त्यानुसार गावाचा बेंचमार्क सर्व्हे करून पीक नियोजनाचा अभ्यास झाला. त्या वेळी गावात फक्त दोन एकरावर एकच द्राक्ष बाग होती. काही शेतकरी थोड्याफार प्रमाणात भाजीपाला आणि दुग्धव्यवसाय करायचे. केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित विभागनिहाय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. मराठवाडा शेती साह्य मंडळाचे विश्‍वस्त कृषिभूषण विजयआण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवातीला लोकांची क्षमता बांधणी आणि नंतर प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. गावकऱ्यांच्या मदतीने बेंचमार्क सर्व्हे आणि नेट प्लॅनिंग यामध्ये केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरली. केंद्राने पाणलोटाचे विविध उपचार आणि माथा ते पायथा ही संकल्पना सुचविली. जमिनीच्या मगदुरानुसार पीक नियोजन आणि पद्धतींचा अवलंब करण्यात आला.
  • गावाची बहुतांश जमीन फळबाग लागवडीस योग्य असल्यामुळे डाळिंब, सीताफळ, चिंच, द्राक्ष अशी मध्यम ते कमी पाण्यावर येणारी आणि हमखास उत्पन्न देणाऱ्या फळझाडांच्या लागवडीस चालना मिळाली. हंगामी पिकाच्या नवीन जाती, भाजीपाला, फुलशेती, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय यांसारख्या पूरक उद्योगांच्या उभारणीमध्ये तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या गटचर्चा, प्रशिक्षणे, क्षेत्रीय भेटी, अभ्यास सहलीतून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. सन १९९५-९६ ते २००१-०२ या कालावधीत पाणलोट प्रकल्प पूर्णत्वास आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने पाणलोटाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले.
  • तंत्रज्ञान प्रसाराचे टप्पे

  • सुरवातीच्या दोन वर्षांत कपाशीच्या नामदेव, सावता, तुराब, एके-४  आणि सोयाबीनच्या एमएसीएस-१३, जेएस-३३५, एमएयूएस-१२४, एमएयूएस-२ या जातींच्या प्रात्यक्षिकांतून प्रसार.
  • तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, बाजरी पिकाच्या नवीन जाती, सुधारित मशागत पद्धतींची प्रात्यक्षिके.
  • रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू लागवडीचे प्रात्यक्षिके, नवीन वाणांच्या बियाण्यांची उपलब्धता.
  • कमी पाण्यात येणाऱ्या मोहरीच्या पुसा बोल्ड वाणाचा प्रसार, त्यामुळे गव्हाखालील क्षेत्र कमी होऊन शेतकरी मोहरीकडे वळाले.
  • भाजीपाला, चारा पिकांची प्रात्यक्षिके.
  • बचत गटांतून महिलांचे सक्षमीकरण.
  • निर्धूर चुली, भाजीपाला टिकवून ठेवण्यासाठी झिरो एनर्जी कूल चेंबर, महिलांसाठी उपयुक्त सुधारित अवजारांची प्रात्यक्षिके.
  • रेशीम उत्पादकांचा गट
  • शेतकऱ्यांना जोडधंद्यातून पैसा मिळावा, यासाठी २५ रेशीम उत्पादक शेतकरी गटाची उभारणी.
  • रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न. १५० अंडीपुंजातून ७० ते ८० किलो कोषांचे उत्पादन.
  • शेतकऱ्यांचा शास्त्रीय दृष्टीकोन वाढीस लागला. अळी अवस्था, कोषनिर्मितीची शास्त्रीय माहिती झाली. त्याचा फायदा कापसातील एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसारासाठी झाला.
  • शेळीपालन, दुग्धव्यवसायाची जोड.  
  • पपईतून पीक बदल
  • गावामध्ये २५ पपई उत्पादकांचा गट.
  • लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंत प्रशिक्षण.
  • रोपवाटिका, लागवड नियोजनामुळे चांगला दर.
  • पहिल्यांदाच सामान्य शेतकऱ्यांना एका एकरातून लाख रुपयांची मिळकत.
  • पाणलोट विकासाचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी विज्ञान केंद्राने गावाला तांत्रिक साह्य कायम ठेवले. सुरवातीला शेतकऱ्यांनी डाळिंब लागवडीला पसंती दिली. मात्र रोग, किडींचा प्रादुर्भाव, बाजारभावातील अनिश्‍चितता यामुळे डाळिंब लागवड फारशी वाढली नाही. मात्र, द्राक्ष लागवडीचा यापूर्वीचा अनुभव आणि विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे द्राक्ष लागवड सुरु झाली.

  • फळबाग क्षेत्र ठिबकखाली यायला सुरवात. सूक्ष्म सिंचनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण.
  • दुग्धव्यवसाय वाढण्यासाठी बॅंकांच्या मदतीने प्रयत्न.
  • सन २००५ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून प्लॅस्टिक आच्छादित सामूहिक शेततळ्यांची निर्मिती. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एल. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन. मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन शेततळ्यांमध्ये वाढ.
  • शेततळी होण्यापूर्वी पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि पाणलोटानंतर घ्यावयाची काळजी याबाबत प्रशिक्षण. शेततळ्याची आखणी आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन.
  • शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून शेततळ्यांची निर्मिती, ठिबक सिंचन, विक्री व्यवस्था, काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक साह्य. यातून द्राक्ष लागवडीस चालना. आज गावात अंदाजे १२०० एकरावर द्राक्ष लागवड. सुमारे पाचशेच्या आसपास शेततळी.
  • गावामध्ये शेततळ्यातील संरक्षित पाण्यावर एक एकरपासून ते २० एकरापर्यंत द्राक्ष लागवड करणारे शेतकरी. एकरी ४ ते ५ लाखांचे उत्पन्न. कडवंचीमध्ये पाणलोट विकासापूर्वी (१९९४-९५) केलेल्या सर्वेक्षणानुसार शेतीपासून मिळणारे एकूण उत्पन्न ७७ लाख रुपये एवढे होते, ते मागील वर्षी (२०१७-१८) सुमारे ७५ कोटींच्याही पुढे.
  • भविष्यातील दिशा

  • उपलब्ध जमीन, पाणीसाठवण क्षमता यांच्या मर्यादेचा विचार करता भविष्यात पर्यायी पीक पद्धती आणि एकात्मिक शेती पद्धती शेतकऱ्यांमध्ये रुजविण्यास सुरवात केली आहे.
  •   भाजीपाला, फुलशेती लागवडीवर भर. लहान शेतकऱ्यांना आर्थिक स्राेत निर्माण करून देण्यासाठी  प्रयत्न.
  •   गायरान जमीन आणि शक्‍य तेथे बांबू लागवडीतून कायमस्वरूपी उत्पन्न मिळविण्यावर भर.
  • शेततळयांमध्ये मत्स्यपालनाला चालना. यातून उत्पन्न वाढ.
  • शेतकरी, महिला बचत गटातून शेळीपालन, कुक्कुटपालन, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगांची उभारणी.
  • निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन आणि प्रभावी विपणनाचे नियोजन.
  • शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून समांतर यंत्रणांच्या सहकार्याने कडवंची आणि शेजारील गावांना गरजेनुसार तांत्रिक मार्गदर्शन.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com