फेरोसिमेंट पद्धतीने बांधलेली डोम आकाराची पाणी साठवण टाकी
फेरोसिमेंट पद्धतीने बांधलेली डोम आकाराची पाणी साठवण टाकी

'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल व्यवस्थापनाचा प्रसार

जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि वापराबाबत जनजागृती केली जाते. संस्थेने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील ४५ तालुक्‍यांत पाणी साठवण्याच्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे. संस्थेतर्फे जलसंधारण आणि फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने टाकी बांधण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, पावसाळ्यात पडणारा पाऊस प्रत्येकाच्या जमिनीमध्ये, खाचरामध्ये तसेच माळरानावर जिरवून, साठवून त्याचा योग्य विनियोग व्हावा, या उद्देशाने आम्ही समविचारी लोकांनी २००१ पासून प्रयत्न सुरू केले. कोकणात कमी अधिक पडणारा पाऊस उपयोगात कसा येऊ शकेल याचा अभ्यास केला. या अभ्यासातून २००३ मध्ये जलवर्धिनी प्रतिष्ठानची स्थापना करून कर्जत तालुक्‍यात कामाला सुरवात केली. पहिली दोन वर्षे गावपातळीवर आदिवासी पाड्यात जाऊन लोकांची भेट घेऊन तेथे पडणारा पाऊस आणि त्याकरिता कोणते उपाय योजता येतील आणि त्यांच्याकडून कशाप्रकारे काम करून पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करता येईल याचा पाठपुरावा केला.

प्रात्यक्षिकातून प्रसार  कर्जत तालुक्‍यातील मोरेवाडी गावात २००५ मध्ये शेततळी, वनराई बंधारे, बावखळ या कामातून गावकऱ्यांना त्यांच्या जमिनी, खाचरांमध्ये पाऊस कसा जिरवता येईल याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यातून काही अनुभवही आले. छतावर पडणारे पाणी फेरोसिमेंटच्या टाक्‍यामध्ये पागोळीद्वारे साठवून पावसाळ्यात तसेच पावसाळ्यानंतर वापरात येऊ शकते हा विश्‍वास निर्माण झाला. फेरोसिमेंटच्या दहा हजार लिटर क्षमता असलेल्या टाक्‍यांना सितारा (आयआयटी, पवई)  संस्थेकडून अर्थसाह्य मिळाले. पावसाचे पाणी योग्य तंत्रज्ञानाने प्रत्येकाला परवडेल आणि कमी खर्चात कसे साठवता येईल याचा विचार करून संस्थेने तेरा प्रकारच्या मॉडेलवर अभ्यास केला.

लोकसहभागातून टाक्यांची उभारणी

  •  दिशादर्शन केंद्रास भेट दिल्यानंतर काही शेतकऱ्यांनी १० ते १५ हजार लिटरच्या टाक्‍या शेतावर किंवा वाडीत बांधल्या आहेत. गरजू शेतकऱ्यांनी टाकी उभारणीसाठी लागणारे जोते, रेती आणि मजूर उपलब्ध करून दिले तर जलवर्धिनीतर्फे वेल्ड मेश, चीकन मेश, लोखंडी सळ्या, सिमेंट इत्यादी उपलब्ध करून दिले जाते.
  •  १० फूट व्यास व ४ फूट उंच टाकी करता जलवर्धिनी तर्फे पुरवण्यात येणाऱ्या साहित्यास अंदाजे १६,००० रूपये १४ फूट व्यास व ४ फूट उंच जमिनीवरील टाकीस अंदाजे २५,००० रुपये खर्च येतो. जमिनीवरील टाकीकरिता अंदाजे प्रतिलिटर खर्च ४ ते ५ रुपये आणि जमिनीखालील टाकी करता अंदाजे प्रतिलिटर खर्च २.५ ते ३.५ रुपये इतका येतो. सधन शेतकरी सर्व खर्च स्वतः करतात आणि जलवर्धिनीस तंत्रज्ञान पुरवल्याबद्दल मानधनही देतात.
  •  कर्जत तालुक्‍यात लोक सहभागातून आजपर्यंत ४५ टाक्‍या बांधल्या आहेत. याचबरोबरीने ६७ पाणी साठवण टाक्‍या बांधल्या आहेत. गुहागर तालुक्यामध्ये २१ टाक्‍या लोक सहभागातून बांधण्यात आल्या आहेत. एक टाकी शेतकऱ्यांनी स्वखर्चातून बांधली आहे.
  •  संस्थेने नाटे (जि. रत्नागिरी) येथील भराडीन वाडी तसेच गेटाची वाडी (जि. ठाणे) येथे पाण्याची योजना करण्यासाठी तांत्रिक व काही आर्थिक साह्य दिले आहे. कमी खर्चात पाण्याची योजना वाडीत करता येते याचे हे चांगले उदाहरण असून त्याचा ग्रामस्थांना फायदा होत आहे.
  •  मोगरज (ता. कर्जत, जि. रायगड) येथे आदिवासी शेतकऱ्यांनी आठ पाणी साठवण टाक्‍या बांधल्या आहेत. मोगरजमध्ये पाच आदिवासी कुटुंबांनी लोक सहभागातून १२०० लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाक्‍या घराजवळ बांधल्या. पावसाळ्यात छतावरील पाणी त्यात जमा होते. म्हणजे पावसाळ्यात घरात वापरावयास लागणारे पाणी बाहेरून आणावे लागत नाही. पावसाळ्यानंतर शेतकरी विहीर, विंधन विहीर किंवा नदी, तलाव यातील पाणी घरगुती वापरासाठी आणतात.
  •  गुहागर येथील २१ शेतकऱ्यांनी पाणी साठवण टाक्‍याकरिता लागणाऱ्या खर्चात शेतकऱ्यांचा ४० ते ५० टक्के  सहभाग आहे. अशी उदाहरणे सर्व ठिकाणी पहावयास मिळतात.
  • दिशादर्शन केंद्रांची उभारणी

    कर्जत येथील कै. अनंत श्रीधर ओक वनौषधी केंद्रात २००६ मध्ये पावसाच्या पाण्याचे पहिले दिशादर्शन केंद्र उभारण्यात आले. यामध्ये पावसाचे पाणी कसे साठवता येईल तसेच त्याचा योग्य वापर शेतकऱ्यांना कसा करता येईल याची माहिती देण्यास सुरवात केली. सध्या कर्जत, कशेळे, वांगणी तसेच पनवेल येथील युसुफ मेहरअली सेंटर (जि. रायगड), दापोली (जि. रत्नागिरी), इस्कॉन (पाटीलपाडा, तलासरी, जि. पालघर) येथे दिशादर्शन केंद्रांची सुरवात झाली आहे. याठिकाणी गावातील लोकांना पिण्याकरिता, शेतीकरिता, वरकस जमिनीवर लागवडीकरिता आणि जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याचा उपयोग कसा करता येईल याची माहिती दिली जाते. आजपर्यंत संस्थेने १७ जिल्ह्यातील ४५ तालुक्‍यात पाणी साठवण्याचे तंत्र पोचविले आहे. अंदाजे शंभरहून अधिक गावात पाणी साठवण टाक्‍या किंवा साठवण क्षमता निर्माण केली आहे. याठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडणारे पावसाचे पाणी जिरवून कशा पद्धतीने वापरावे याचेही मार्गदर्शन केले जाते. दिशा दर्शन केंद्रामध्ये पाणी साठवण्याच्या विविध पद्धती दाखवल्या जातात.

    विविध राज्यांत तंत्रज्ञान प्रसार

    संस्थेने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील ४५ तालुक्‍यांत पाणी साठवण्याच्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे. अंदाजे १०० पेक्षा जास्त गावात पाणी साठवण टाक्‍या किंवा साठवण क्षमता निर्माण केली आहे. तसेच गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश व उत्तराखंड या राज्यांतही पाणी साठवण टाक्‍या बांधल्या आहेत. संस्थेने राज्य तसेच परराज्यातील वीस पेक्षा जास्त सामाजिक संस्थांना पाणी साठवण्याविषयी मार्गदर्शन केले आहे. तसेच आजपर्यंत पंधराहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जलसंधारण व फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने टाकी बांधण्याचे प्रशिक्षण दिले आहे. यासाठी काही प्रमाणात इंडियन वॉटर वर्क्‍स असोसिएशनचे साह्य मिळते. फेरोसिमेंट बरोबर नैसर्गिक धागे वापरून जमिनीखाली पाणी साठवण टाकी कशी बांधायची याची माहिती दिली जाते. नैसर्गिक धागे वापरून जमिनीखाली पाणी साठवण टाकी बांधण्याचे तंत्रज्ञान जलवर्धिनीने विकसित केले आहे हा नावीन्यपूर्ण प्रकार आहे. आतापर्यंत संस्थेने नारळाचा काथ्या, केळीचे धागे, अंबाडीचे धागे, जुटचे धागे, कुमीया आणि केवण धागे वापरून अंदाजे ३० पाणी साठवण टाक्‍या वेगवेगळ्या ठिकाणी तयार केल्या आहेत.

    - उल्हास परांजपे, ९८२०७८८०६१

    (लेखक जलवर्धिनी प्रतिष्ठान संस्थेचे ट्रस्टी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com