पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार हळदीची जात निश्चित करून योग्य आकाराचे बेणे मिळवावे. बेण्यांची सुप्तावस्था मोडल्यानंतर रुंद वरंबा पद्धतीने हळदीची लागवड करावी.
जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९ महिने लागतात. हळव्या जाती लागवडीपासून ६ ते ७ महिन्यांत काढणीस येतात. उदा. आंबे हळद. निम गरव्या जाती ७ ते ८ महिन्यांत काढणीस येतात. गरव्या जाती ८ ते ९ महिन्यांत काढणीस येतात. उदा. सेलम, कृष्णा. त्यामुळे लागवडीपूर्वी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार हळद लागवडीसाठी योग्य जातींची निवड करावी. हळद लागवडीसाठी जेठा गड्डे, बगल गड्डे आणि हळकुंडे बेणे म्हणून वापरली जातात. बेणे निवडतांना खालील काळजी घ्यावी.
जेठा गड्डा ः मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठा गड्डा अथवा मातृकंद किंवा गड्डा असे संबोधतात. प्रामुख्याने लागवडीसाठी बेणे हे मातृकंदाचेच ठेवावे. सशक्त, निरोगी, जाड मातृकंद (गड्डा) बेणे म्हणून निवडावेत. बेण्यासाठी निवडलेल्या मातृकंदाचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. आकाराने त्रिकोणाकृती असावे. बगल गड्डे : जेठे गड्ड्याला आलेल्या फुटव्याच्या खाली येणाऱ्या गड्ड्याला बगल गड्डे असे संबोधतात. त्यास अंगठा गड्डे असेही म्हटले जाते. लागवडीसाठी निवडलेल्या बगल गड्ड्याचे वजन ४० ग्रॅमपेक्षा अधिक असावे. हळकुंडे : बगल गड्ड्याला आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. हळकुंडेदेखील बियाण्यासाठी वापरली जातात. बियाणांसाठी निवडलेल्या हळकुंडांचे वजन ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. जर मातृकंद कमी पडत असतील, तर हळकुंडे बेणे म्हणून वापरावेत. निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची [भेसळ मुक्त] असावीत. निवडलेले बियाणे त्वरित झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावे. बियाण्यांचा ढीग करताना हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. अन्यथा उगवणीवर परिणाम होऊ शकतो. बियाणे थोडासा उंचवटा करून कोन पद्धतीने ढीग करून रचावेत. ढीगावर हळदीचा वाळलेल्या पानांचा १० ते १५ सें.मी. जाडीचा थर द्यावा. ज्या ठिकाणी तापमान जास्त असते अशा ठिकाणी पाल्यावर गोणपाट टाकावे आणि केवळ गोणपाट भिजेल एवढेच पाणी गोणपाटावर शिंपडावे. साधारणत: २ ते २.५ महिन्यांच्या कालावधीपर्यंत बियाणे सुप्तावस्थेत जाते. या कालावधीत केवळ अंतर्गत बदल घडून येत असतात. कोणत्याही स्वरूपात बाह्य बदल दिसून येत नाहीत. सुप्तावस्था संपेपर्यंत बियाण्यांवर पाणी वगैरे शिंपडू नये. साधारण २ ते २.५ महिन्यांत सर्व बियाण्यांची सुप्तावस्था पूर्ण होते. सुप्तावस्था संपल्यानंतर बियाणेमध्ये बदल दिसून येतात. या वेळी बियाण्यांवरील डोळे फुगीर होतात, डोळे फुटण्यास प्रारंभ होतो. त्यानंतर मात्र बियाणे परत निवडावेत. बियांण्यावरील मुळ्या काढाव्यात, पानांचे शिल्लक रहिलेले अवशेष काढावेत आणि मुळ्याविरहित, रसरशीत बियाणे लागवडीसाठी वापरावे. जर लागवड करण्यास थोडाफार अवधी असेल, तर दिवसातून दोन वेळेस बियाण्यावर पाणी शिंपडावे. पाणी मारल्यामुळे बियाण्यांची एकसारखी उगवण होण्यास मदत होते. उष्ण सूर्यप्रकाश, वारा यांचा बियाण्यांशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. हळद लागवडीसाठी हळकुंडे व बगलगड्डे वापरण्यापेक्षा जेठे गड्डे वापरावे, त्यामुळे उत्पादन २५ ते ३० टक्के जास्त येते. बियाणे लागवडीपूर्वी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया अवश्य करावी. हळदीची लागवड रुंद वरंबा पद्धतीने केली असता, सरी वरंबा पद्धतीपेक्षा अधिक उत्पादन मिळते. अधिक उत्पादकतेसाठी हळदीची लागवड ही मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच करावी. हळद लागवडीपूर्वी निवडलेल्या जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. हळदीमध्ये मिश्र पीक म्हणून मिरची, घेवडा, कोथिंबीर, मूग, उडीद, मुळा, भुईमूग ही पिके घेणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.