ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी आपल्या शेतमालाची विक्री सायकलवरून फिरून करायचे. अशातच राहती झोपडी जळून खाक झाली. पण खचून न जाता त्यांनी संसार पुन्हा उभा करून जिद्दीने शेती केली. मुलांना शिकवले. मुलांनीही आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. बदलत्या शेतीचा व बाजारातील मागणीचा वेध घेत बारमाही भाजीपाला व जोडीला नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. आज या कुटुंबाने शेतीतूनच भरभराट किंवा आर्थिक समृद्धी मिळवली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा प्रयोगशील बागायतदारांचा म्हणूनच अोळखला जातो. द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला या पिकात इथल्या शेतकऱ्यांनी राज्यात अोळख मिळवली आहे. तालुक्यापासून अवघ्या अकरा किलोमीटरवर असलेल्या ब्राह्मणगाव येथील सत्तर वर्षीय केवळ लक्ष्मण वाघ यांची लांडगे शिवारात तीन एकर शेती आहे. घरची आर्थिक परिस्थिती पूर्वी अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे पारंपरिक शेतीबरोबर काही प्रमाणात भाजीपाला पिकवून गावात त्याची सायकलीवरून फिरून विक्री करायचे. त्यातून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचे. दरम्यान १९७२ मध्ये शेतात राहात असलेल्या झोपडीला आग लागली. होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. त्यावेळी प्रशासनने ४९ रुपये व नवे घर बांधण्यासाठी सहा पत्रे अशी मदत देऊ केली. तीन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही होती. लहान मुलगा मदन अभ्यासात हुशार होता. त्याने सातवीनंतरचे शिक्षण मामाकडे घेतले. एमएबीएड पूर्ण केले. नव्या पिढीने सांभाळली शेतीची सूत्रे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मदन यांनी सहा महिने नोकरीचा शोध घेतला. पण ती काही मिळाली नाही. मग शेतीतच काही करता येते का याचा शोध सुरू झाला. ही साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘इंटरनेट’वर काम करीत असतांना पुणे येथील तळेगाव दाभाडे येथील प्रशिक्षण संस्थेतर्फे पाॅलिहाऊस विषयातील प्रशिक्षणाची माहिती झाली. हा अभ्यासक्रम पूर्ण करून हायटेक शेती सुरू करायचे ठरवले. रंगीत ढोबळीने उंचावला आत्मविश्वास बॅंकेकडून अर्थसहाय्य घेत वीस गुंठ्यात पाॅलिहाऊस उभारले. त्यात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. संपूर्ण नियोजन करून उत्कृष्ट मिरची पिकवली. मुंबई येथील भाजी मार्केटला रवाना केली. सुरवातीला दर काही समाधानकारक मिळाला नाही. पुढे मात्र कमाल दर किलोला ११० ते अगदी १४० रुपयांपर्यंत गेला. त्यावर्षी खर्च वजा जाता सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या उल्लेखनीय नफ्याने शेतीतील आत्मविश्वास उंचावला. मात्र त्यापुढील वर्षाने मात्र परिक्षा घेतली. यावेळी समाधानकारक दर न मिळाल्याने नुकसान झाले. शेती पद्धतीत बदल थोडीफार निराशा आली तरी मदन खचले नाहीत. त्यांनी बाजारपेठ व बदलत्या शेतीचा अभ्यास केला. त्यातून बारमाही भाजीपाला शेती व जोडीला रोपवाटिका व्यवसाय असा पर्याय उभा केला. आज स्वतःची तीन एकर, शिवाय काकांची साडेतीन एकर शेती ते कसताहेत. त्यात टोमॅटो, मिरची, खरबूज, कांदा, फ्लाॅवर असा विविध भाजीपाला असतो. तर सुमारे ६५ गुंठ्यात विविध भाजीपाला पिकांची रोपे तयार केली जातात. पूर्वीच्या २० गुंठ्यातील पाॅलिहाउसचा वापर त्यासाठी होतो. शेतीत कुटुंबाचे बळ वाढले मदन यांचे मोठे बंधू पद्माकर नाशिक येथे खाजगी कंपनीत तोकड्या पगारावर काम करीत होते. मदन यांनी त्यांना तसेच मधले बंधू रामकृष्ण यांनाही पूर्णवेळ शेतीसाठी प्रोत्साहीत केले. परस्परांच्या चर्चेतून तिघांनीही शेतीच्या जबाबदाऱ्या वाटून घेण्याचे ठरवले. त्यातून शेतीतील मनुष्यबळ व पाठबळही वाढण्यास मदत झाली. वाघ कुटुंबाच्या शेतीची वैशिष्ट्ये
संपर्क- मदन वाघ- ९५५२०००९०२, ७०३८८७६९०९.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.