उसाचा तब्बल ११ वा खोडवा !!

गेल्या बारा वर्षांत उसाचे पाचट एकदाही जाळलेले नाही. कुट्टी करून तर काही वेळा अखंड जागेवर पसरवून ते कुजवले जाते. गेल्या वर्षी पाण्याची समस्या उदभवली. मात्र सर्वत्र पाचटाचा थर असल्याने ऊस वाचला. - उदयसिंह मोरे पाटील
उदयसिंह मोरे पाटील (उजवीकडे) य़ांचा उसाचा खोडवा व त्याची जाडी. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे जमीन सुपीक झाली आहे.
उदयसिंह मोरे पाटील (उजवीकडे) य़ांचा उसाचा खोडवा व त्याची जाडी. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे जमीन सुपीक झाली आहे.

खेड (ता. कर्जत, जि. नगर) येथील उदयसिंह हिंदूराव मोरे-पाटील यांनी शून्य नांगरणी, सेंद्रिय घटकांचा अधिकाधिक वापर व अत्यंत कमी उत्पादन खर्च या बळांवर ऊसशेती यशस्वी केली आहे. त्यातून उसाचा तब्बल ११ वा खोडवा राखत समस्त शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. सोबत आपली जमीनही सुपीक व आरोग्यदायी केली आहे.   कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील प्रयोगशील शेतकरी कै. डॉ. देवांगी आर. प्रफूलचंद्र यांचे नाव ऊसशेतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर अमर झाले. शून्य नांगरणी, अत्यंत कमी उत्पादन खर्च व पूर्णतः सेंद्रिय घटकांचा वापर या बळावर उसाचे तब्बल ४० खोडवे घेण्याची किमया त्यांनी घडवली. हा जागतीक विक्रमच ठरावा. महाराष्ट्रातही असाच आदर्श उदयसिंह मोरे-पाटील (खेड, ता. कर्जत, जि. नगर) यांनी शेतकऱ्यांपुढे तयार केला आहे. यंदाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये त्यांच्या शेतात उसाच्या तब्बल ११ व्या खोडव्याची तोडणी झाली. किमान पंधरा खोडवे ठेवण्याचे ध्येय ठेऊन त्यांचे पुढील व्यवस्थापनही सुरू झाले आहे. ११व्या खोडव्याचा व्हीडिअो... शेतीचे संस्कार उदयसिंह यांनी लहानपणापासूनच वडिलांकडून शेतीचे संस्कार आत्मसात केले. ‘बीकॉम’ची पदवी घेतल्यानंतर शेतीत ‘करियर’ सुरू केले. सुरवातीच्या काळात भाजीपाला पिके भरपूर प्रमाणात केली. दहा एकरांवर कलिंगड घेत उल्लेखनीय उत्पादनही घेतले. साधारण १५ वर्षांपूर्वी ते ऊसशेतीकडे वळले. अर्थशास्त्र अभ्यासूनच खोडवा शेती उदयसिंह सांगतात की, ऊस लावला तेव्हाच त्याचे अर्थशास्त्र डोक्यात पक्के केले होेते. शेती आतबट्ट्याची करण्याची वेळ राहिलेली नाही. रासायनिक खते, मजुरी यावर खूप खर्च येतो. आजच्या स्थितीत उसाचा एकरी उत्पादन खर्च ७५ हजार रुपयांपेक्षा कमी नाही. दर हाती नाहीत. नफा नगण्यच मिळतो. या सर्व बाबी अभ्यासूनच खोडवा ठेवण्यास सुरवात केली. पाहाता पाहाता यंदा तब्बल ११ व्या खोडव्यापर्यंत पोचलो. या पिकानेच जमा- खर्च, नफा सगळे काही शिकवले. उदयसिंह यांची शेती दृष्टिक्षेपात

  • शेती २५ एकर.
  • साधारण बारा वर्षांपूर्वी साडेतीन फुटी सरी पद्धतीचा पॅटर्न होता. खोडव्यामुळे तो आजही कायम --जमीन- हलकी ते मध्यम, ऊस वाण- फुले २६५, लागवड हंगाम- डिसेंबर ते जानेवारी
  • क्षेत्र खोडवा
  • सव्वा एकर ११ वा खोडवा (यंदा फेब्रुवारी- मार्चमध्ये तुटला)
  • चार एकर सातवा खोडवा
  • साडेतीन एकर आठवा खोडवा
  • उत्पादन

  • लागवडीच्या उसाचे एकरी ६२ टनांपर्यंत उत्पादन मिळाले.
  • खोडवा उसाचे उत्पादन- एकरी ३५, ३८ ते ४० टनांच्या आसपास.
  • उत्पादन खर्च- एकरी १५ हजार रुपयांपर्यंत
  • परिसरातील खासगी, सहकारी अशा दोन- तीन साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा. प्रति टन २५५० ते तीनहजार रुपये दर.  
  • ऊसशेतीची वैशिष्ट्ये

  • धैंच्या जागेवरच गाडून उसाची लागवड केली. माती परिक्षणाच्या आधारे गरज लक्षात घेऊनच खतांचे व्यवस्थापन केले.
  • गेल्या बारा वर्षांत उसाचे पाचट एकदाही जाळलेले नाही. कुट्टी करून तर काही वेळा अखंड जागेवर पसरवून ते कुजवले जाते. गेल्या वर्षी पाण्याची समस्या उदभवली. मात्र सर्वत्र पाचटाचा थर असल्याने ऊस वाचला.
  • यंदा तुटलेल्या ११ व्या खोडव्याला एक ग्रॅमही रासायनिक खत दिले नाही. केवळ सेंद्रिय खतावर तो पोसल्याचे उदयसिंह सांगतात
  • उपलब्ध होईल त्यानुसार शेणखत व मळीचा वापर. (सरासरी तीन ते चार वर्षांनी- दीड ते दोन ट्रॉली)
  • गवत किंवा तण शेताबाहेर न टाकता जागेवरच कुजवले जाते. उदयसिंह सांगतात की तुझे आहे तुझपाशी हे निसर्गानेच मला शिकवले. त्याच संज्ञेनुसार निसर्गाचे अन्न त्याला परत देतो.
  • रानात सर्वत्र भरपूर प्रमाणात गांडूळे. रान भुसभूशीत झाले आहे. मातीत अोलावा दिसून येतो.
  • मशागतीचा खर्च शून्यावर आणला.
  • लागवडीसंबंधी सर्व नोंदी. यंदाच्या खोडव्यासाठी फक्त पाचट कुट्टीचा खर्च आला.
  • पाणी पाटाद्वारे. उजनी धरणाचे ‘बॅक वॉटर’ असल्याने शेवाळामुळे ठिबक संच चोक अप होण्याचा धोका. आता ठिबकचा विचार. नवी विहीर खोदली आहे. भीमा नदीवरून अडीच ते तीन किलोमीटर पाइपलाइन.
  • पाणी साधारण तीन आठवड्याने किंवा पिकाची गरज पाहूनच दिले जाते. पाचटाचा थर जमिनीवर असल्याने सव्वा ते दीड महिन्याने पाणी दिले तरी चालते.
  • ऊस तुटून गेल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी आठव्या, नवव्या खोडवा उसाला एकरी सुपर फॉस्फेट दोन गोणी, पोटॅश एक व युरिया एक गोणी असे खत. त्यानंतर पाऊस पडायच्या आधी मे च्या अखेरीस हलका डोस.
  • बॅरेलमध्ये शेणखतात पाचट कुजवण्याचे द्रवरूप जीवाणू खत मिसळले जाते. पाटाने ते दिले जाते.
  • वर्षातून चार वेळा या पद्धतीचा वापर.
  • गेल्या चार- पाच वर्षांत खुरपणीची वेळ आलेली नाही. उसाची बांधणीही करीत नाही. त्यामुळे मजूरबळ व त्यावरील खर्च वाचतो. पाणी देण्यासाठीच काय ते मजूरबळ वापरले जाते. तणनाशकाचा वापर प्रत्यक्ष शेतात न करता फक्त पाटाच्या बाजूलाच.
  • यंदा चार एकर नवी लागवड. त्यात हरभऱ्याचे आंतरपीक.
  • मुलांना केले उच्चशिक्षित उदयसिंह पोलिस पाटीलही आहेत. शेती हाच उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. अभ्यास, कष्टातूनच उत्पन्न वाढवले. खोडवा शेतीत खर्च आटोक्यात ठेऊन जी बचत केली त्या जोरावरच मुले उच्चशिक्षीत केली. धनंजय ‘बीई’ (आयटी) असून तो पुण्यात नोकरी करतो. धनश्री दंत वैद्यकशास्त्राच्या (बीडीएस) तिसऱ्या वर्षाला शिकते आहे. वडील म्हणून याचे मोठे समाधान व अभिमान अाहे. आजवर शेतीसाठी कोणत्याही प्रकारे कर्जही काढावे लागले नसल्याचे उदयसिंग सांगतात. प्रशिक्षणातून ज्ञानवृद्धी बारामती येथील ‘व्हीएसबीटी’ व कृषी विज्ञान केंद्र यांचे मार्गदर्शन. परिसंवाद, चर्चासत्रे, प्रदर्शने यांना आवर्जून उपस्थिती. ॲग्रोवनचे नियमित वाचन, त्याच्या ॲपचाही वापर. मार्केटमध्ये नवे कोणते तंत्रज्ञान आले आहे याबाबत ‘अपडेट’.

    प्रतिक्रिया उदयसिंह मोरे पाटील यांनी सेंद्रिय व्यवस्थापनावर भर देत उसाचे जे अकरा खोडवे घेतले आहेत त्याबाबत ते कौतुकासाठी पात्र आहेत. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे, ती सुपीक करणे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा कृतीमधूनच उसाचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवणे शक्य होते. -ज्ञानदेव हापसे, वरिष्ठ ऊसशास्त्रज्ञ संपर्क- उदयसिंह मोरे पाटील-९४२०४००४९९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com