तोंडली शेतीत मिळवले पाटील दांपत्याने प्रावीण्य

पाटील दांपत्य शेतीत एकत्र कष्ट करीत असल्याने तोंडली बागेत निरोगी व सशक्त फळे आलेली दिसतात.
पाटील दांपत्य शेतीत एकत्र कष्ट करीत असल्याने तोंडली बागेत निरोगी व सशक्त फळे आलेली दिसतात.

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव-हिवरे तर्फे येथील तुकाराम व संगीता या चक्कर-पाटील दांपत्याने भाजीपाला शेतीत प्रावीण्य व नाव दोन्हीही मिळवले आहे. अठरा वर्षांपासून फ्लॉवरची यशस्वी शेती करणारे हे दांपत्य आता तोंडली पिकाच्या शेतीत उतरले आहे. बाराही महिनेही तोंडलीला मागणी राहते आणि बाराही महिने हे पीक उत्पादन देत राहते, असा पाटील यांचा अनुभव आहे. पुणे जिल्ह्यात नारायणगावपासून सहा किलोमीटर अंतरावर हिवरे तर्फे शिवारात तुकाराम व संगीता हे चक्कर-पाटील दांपत्य राहते. त्यांची १२ एकर बागायती शेती आहे. अठरा वर्षांपासून फ्लॉवरच्या शेतीत सातत्य ठेवत पाटील यांनी त्यात प्रावीण्य मिळवले आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी पाटील तोंडली पिकाकडे वळले. तोंडली पीक व्यवस्थापन

  • क्षेत्र- सुमारे २२ गुंठे, झाडे- सुमारे ७५०
  • पहिल्या टप्प्यात एकूण भांडवली गुंतवणूक- तीन लाख रु.
  • तोंडली घेण्यापूर्वी राज्यात तसेच गुजरात भागात फिरून मार्केटचा अभ्यास केला. चुलत बंधू प्रदीप यांची नर्सरी असल्यामुळे त्यांच्याकडूनही माहिती गोळा केली.
  • सुरवातीला आंतरपीक म्हणून दोन पिके घेतली. मका लावला. त्यातून २५ हजार रुपये तर फ्लॉवरमधून ४० हजार रुपये मिळाले. हाच पैसा तोंडली बाग उभारणीत उपयोगी आला.
  • रान तयार करण्यासाठी पाचटाचे १०० गठ्ठे साडेतीन हजार रुपयांना विकत आणून बोदाजवळ गाडले. त्यासाठी साडेतीन हजार रुपये वेगळी मजुरी दिली.
  • शेणखत वापरून पाचट गाडले. त्याचा फायदा असा झाला की पावसाळ्यात झाडाच्या खोडांना पक्केपणा आला. अन्नद्रव्य व्यवस्थापनात कमतरता येऊ दिली नाही. १९-१९-१९, १७-४४-०, मंगल, बोरान, झिंक यांचा प्रमाणात वापर केला.
  • पुनर्लागवडीनंतर दोन ते तीन महिन्यानंतर पहिला तोडा हाती आला.
  • वर्षभर तोडे सुरूच पाटील यांचा दुग्धव्यवसायही आहे. मात्र त्यापेक्षाही तोंडली शेती त्यांना फायदेशीर वाटते. पहिले पीक निघाल्यानंतर बागेने कधीच स्वस्थ बसून दिले नाही. हिवाळ्यात दिवसाआड १०० ते १२५ किलो, पावसाळ्यात सुमारे १०० किलो, तर उन्हाळ्यात २५० ते ३०० किलो दिवसाआड तोडा व्हायचा. वर्षभर तोडे सुरूच राहतात. प्रकारानुसार दर बाजारात एक-दीड पेरा आकाराच्या तोंडलीला ‘कळी’ म्हणतात. त्याची थोडी वाढ झाली की आकार गोल होते. व्यापारी त्याला बदला म्हणतात. दर हे कळीलाच मिळतात. बदल्याला त्यापेक्षा कमी असतात. कळीचे दर- वर्षभर (किलोचे) सरासरी- २० ते २५ रुपये (बदला- ९ ते १० रु.) जुलै-आॅगस्टमध्ये जास्त- ४५ ते ५० रु. तोंडलीतील महत्त्वाचे अनुभव

  • पाटील दांपत्य पहाटेपासून कामांत मग्न होते. सौ. पाटील म्हणाल्या, की तोडणी सुरू झाली की मजूर, वाहतूक, बाजार अशा सर्व व्यवस्थांचे नियोजन आधीच करावे लागते. या साखळीत एकाही घटकाला उशीर झाला की मालाचा आकार वाढतो. त्यातून लिलावात कमी दर मिळतो. तोडणी वेळेत करावीच लागते. श्रम खूप असतात, तरच नफा मिळतो. गोठयात पहाटे शेण-गोमूत्र काढून सकाळ-संध्याकाळ धारा काढण्याचे कामही करावे लागते.
  • उन्हाळ्यात दर कमी होतात. किलोला २० रुपये दरानेही माल विकावा लागतो. तोडणीसाठी मजूर मात्र २५० ते ३०० रुपये मजुरी घेतात. नारायणगाव भागातून वाशी मार्केटसाठी वाहतूक व्यवस्था तयार असल्यामुळे अडचणींशी सामना कमी करावा लागतो.-तोंडली शेतीत मनुष्यबळाची गुंतवणूक महत्त्वाची असते. माणूस सतत कामात अडकून पडलेला असतो. सौ. पाटील म्हणाल्या की बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था, निविष्ठांची खरेदी यांची बहुतेक कामे पती सांभाळतात. मी तोडणी, मजूर व्यवस्थापन, प्रतवारी, मालाचे पार्सल व्यवस्थित ठेवणे ही जबाबदारी सांभाळते. मजूर कमी-जास्त झाल्यास कामे स्वतः करून समस्येवर मात करावी लागते.
  • तोंडली रोपांची मोठी नर्सरी उभारण्याची जिद्द या दांपत्याने ठेवली आहे. रोपे मिळवताना स्वतःला झालेला त्रास इतरांना होऊ नये असा उद्देश आहे.
  • पाटील यांच्यापासून प्रेरणा घेत धुळे जिल्ह्यातील मोहन संजय भिसे या २३ वर्षीय तरुणानेही तोंडली बाग उभारली आहे. मांडव साधा लाकडी ठेवला आहे.
  • भांडवली गुंतवणूक (७०० झाडांसाठी)

  • रोपे खरेदी (१५ रु. प्रतिरोप) - ११ हजार रुपये
  • बांबू खरेदी - १५ हजार रु.
  • शेणखत (चार ट्रॉली)- २० हजार रु.
  • मांडवासाठी लोखंडी अॅंगल्स व तारा- पावणेदोन लाख रु.
  • ठिबकसंच - ३० हजार रु.
  • तोंडली शेतीसाठी पाटील यांच्या टिप्स

  • बाजाराचा अभ्यास करून मगच लागवड करावी.
  • हक्काची बाजारपेठ व नियमित खरेदीदार मिळाल्यास शेती परवडते
  • भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करावा
  • अतिपाऊस व प्रचंड उष्णतेच्या पट्ट्यात लागवड टाळावी
  • लागवड किमान दहा गुंठे हवी
  • कमी लागवडीच्या बागेसाठी लोखंडाऐवजी बांबूचा मांडवा करावा.
  • उत्पादन सुरू झाल्यानंतर सतत तोडणी करावी लागते. त्यामुळे घरचे मनुष्यबळ उत्तम
  • - मजूर उपलब्धतेचे नियोजन करावे. तोडणी वेळेवर न केल्यास फळे मोठी होतात. बाजारात कमी दर मिळतो.
  • केवळ लागवड न करता पुढे नर्सरी देखील करता येते. रोपवाटिका उभारणीचे शास्त्र व तंत्र समजावून घ्यावे.
  • एकात्मीक कीड-रोग व्यवस्थापनाचा अवलंब
  • हिरवळीची खते लावून गाडली जातात.
  • झेंडूची लागवड. त्यातून सूत्रकृमींचे नियंत्रण होते. मित्रकीटकांसाठी आसरा.
  • दर आठवड्याला जैविक कीडनाशकांची तसेच ताक व गुळाची फवारणी
  • कडुनिंब, मिरची,आले, लसूण, गोमूत्र अर्क आदींमार्फत फवारणी
  • संपर्क ः तुकाराम चक्कर-पाटील, ९९७५८६१४७८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com