नायगाव येथील महाजन कुटुंबातील ऋषीकेश व विशाल हे उच्चशिक्षीत चुलतबंधू नोकरीच्या मागे न लागता आपल्या ८५ एकरांत प्रभावी व्यवस्थापन करीत आपली शेती उत्तम प्रकारे विकसित करीत आहेत. सुमारे ४० हजार केळीझाडांचे काटेकोर संगोपन करताना मल्चिंगवर तूर, कापूस घेत कमी खर्चात चांगले उत्पादन घेतले. नाल्यातून झिरपणारे पाणी चारी व विहिरीत साठवून त्याचा वापरदेखील वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणता येईल. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर या तालुका ठिकाणापासून २० किलोमीटरवर नायगाव आहे. तापी नदी येथून सुमारे दोन किलोमीटरवर आहे. या नदीवरून अनेक शेतकऱ्यांनी जलवाहिन्या टाकून सिंचनाची व्यवस्था केली आहे. येथील महाजन कुटुंबाची एकत्रित ८५ एकर जमीन सध्या नवी पिढी अत्यंत उत्साहाने व जबाबदारी सांभाळते आहे. उच्चशिक्षित पिढीकडे शेतीची सूत्रे ऋषीकेश यांचे वडील अशोक व विशाल यांचे वडील किशोर यांनी केळीची पारंपरिक शेती अनेक वर्षे केली. मध्यंतरीच्या काळात उत्पादन काहीसे कमी होत असल्याचे लक्षात आले. ऋषीकेश यांनी कृषी विषयातील बीएस्सी पदवी व पुण्याहून परदेश व्यापारसंबंधीचा पदविका अभ्यासकक्रम पूर्ण केला आहे. विशाल देखील बीएस्सी ॲग्री असून मुंबईहून कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयातील पदविका त्यांनी घेतली आहे. उच्चशिक्षित असूनही शहरातील नोकरीच्या मागे न लागता दोघांनीही आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग आपल्याच शेतीच्या विकासासाठी करायचे ठरवले. त्या दृष्टीने शेतीची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक ज्ञान, अभ्यास व तंत्रज्ञान वापर यातून त्यांनी सुधारणा सुरू केल्या. जमिनीचा विकास अशोक व किशोर यांनी कष्टपूर्वक आपली २० एकर शेती ८५ एकरांवर नेली. धाबे गावच्या शिवारात त्यांची जमीन आहे. त्यांच्या काळातच १९८६ मध्ये तापी नदीवरून जलवाहिनी उभारली होती. सध्या त्यांच्याकडे अशा चार जलवाहिन्या आहेत. नऊ कूपनलिका व विहिरींच्या रूपाने सिंचनक्षमता आहे. जमीन खडकाळ, मुरमाड आहे. ती सुपीक करण्यासाठी हजारो ट्रॉली माती शेतात टाकण्यात आली. केळीचे संगोपन
जमीन सुपीकतेसह व्यवस्थापन चोख
शून्य मशागत, मल्चिंगवर तूर, कापूस मागील वर्षी आठ एकरांत पॉली मल्चिंगवर कलिंगड घेतले. क्षेत्र रिकामे झाल्यानंतर मशागत न करता त्याच मल्चिंग पेपरच्या आधारे प्रत्येकी चार एकरांवर तूर व कापूस लावला. हे प्रयोग दोन तीन वर्षांपासून सुरू आहेत. शून्य नांगरणी असल्याने झालेल्या कमी खर्चात कापसाचे एकरी १३ क्विंटल तर तुरीचे एकरी नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले.
चारी खोदून सिंचन व्यवस्था बळकट चार फुटांवर मुरूम लागतो. इथल्या जमिनीत नैसर्गिक नाल्याचा पाझर आहे. भर मे महिन्यात किंवा उन्हाळ्यातही हे पाझर येतात. नाला झुळूझुळू वाहत असतो. हे पाणी वाया जाऊ नये यासाठी ब्लास्टींग करून सुमारे २० फूट चारी तयार केली. लांबी साधारण ४०० मीटर केली. विहिरीत ‘इनलेट’ करून पाण्याचा संचय वाढवला. हे पाणी पंपाने शेतीला वापरले जाते. यंदा या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. संपूर्ण ८५ एकरांसााठी ‘ ड्रीप ऑटोमेशन’ यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न आहे. समाधानी संयुक्त कुटूंब ऋषीकेश व विशाल या दोन्ही चुलतबंधूंचे सारे कुटूंब म्हणजे दहा सदस्य एकत्र नांदतात. ऋषीकेश यांचे थोरले बंधू योगेश अस्थिरोगतज्ज्ञ असून रावेर येथे त्यांचे हॉस्पिटल आहे. शेतीची जबाबदारी सांभाळून ऋषीकेश यांनी नायगावात कृषी सेवा केंद्रही सुरू केले आहे. संपर्क- ऋषीकेश महाजन - ९५७९५३४५३४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.