माती, पाण्याची धूप वाचवली

पीक पद्धतीत बदल जमिनीचा मगदूर, हवामान, थंडीचा कालावधी, पाण्याची मर्यादीत उपलब्धता यावर आधारित कमी कालावधीची बटाटे, वाटाणा, पालेभाज्या यांसारखी पीक पद्धती उमराणी गावात अमलात आणली. उमराणीसारखे दुर्गम गाव आता कडधान्ये, भाजीपाला, चारा पिकांसाठी परिसरात वेगळी ओळख निर्माण करण्यात सफल झाले आहे. याच . पिकांचे उत्पादन २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढवणे शक्य झाले आहे.
शेतकऱ्यांनी श्रमदानातून कमी खर्चिक वनराई बंधारे बांधले.
शेतकऱ्यांनी श्रमदानातून कमी खर्चिक वनराई बंधारे बांधले.

नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत उमराणी (ता. धडगाव) गाव वसले आहे. जल व माती सुधारणा या अनुषंगाने येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात नंदूरबारच्या कृषी विज्ञान केंद्राने निक्रा प्रकल्पांतर्गत विविध तंत्रज्ञान राबवले. त्यातून पीकपद्धती बदलत कमी कालावधीच्या पिकांचा पर्याय या शेतकऱ्यांना मिळाला. वर्षभर भाजीपाला घेत त्याद्वारे कुटुंबाचे अर्थकारण उंचावणे त्यांना शक्य झाले. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेला धडगाव हा अत्यंत दुर्गम तालुका. या परिसरात कुपोषण, रोजगारासाठी स्थलांतरचा प्रश्न प्रत्येक डिसेंबरनंतर प्रकर्षाने जाणवू लागतो. साहजिकच तेथील शेती पद्धतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. हवामान बदलामुळे देशातील विविध भागांतील शेती धोक्यात आली आहे. त्याची तीव्रता कमी करून शेतकऱ्यांना फायदेशीर शेतीचे पर्याय देण्यासाठी देशपातळीवर ‘निक्रा’ प्रकल्प २०११ पासून सुरू करण्यात आला. राज्यात हवामान बदलाला संवेदनशील असलेल्या सात जिल्ह्यांची यात निवड झाली. त्यात नंदूरबारचाही समावेश होता. उमराणीत सुरू झाले स्थित्यंतर उष्ण तापमान व अवर्षण या बाबींना सातत्याने सामोरे जावे लागत असलेल्या धडगाव तालुक्यात उमराणी गावची मुख्यतः निवड ‘निक्रा’मध्ये झाली. पाणी व माती या दोन मुख्य घटकांची सुधारणा, त्यात शाश्वशता आणून त्यावर आधारित पीक पद्धतीत बदल करणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. नंदूरबार कृषी विज्ञान केंद्राने त्यादृष्टीने गावात तंत्रज्ञान सुधारणा करण्यास सुरवात केली. कृषी विद्यापीठात या अनुषंगाने झालेले संशोधन व त्यांची प्रात्यक्षिके घेणे हा कामांचा मुख्य गाभा होता. अशा झाल्या सुधारणा १) समूह पद्धतीने सिंचन व्यवस्थापन उमराणी गावातील शेतकऱ्यांची जमीन धारणक्षमता अल्प अाहे. आर्थिक परिस्थितीही कमकुवत असल्याने या शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर सिंचनाची साधने घेणे अवघड जात होते. ही गरज ओळखून ‘निक्रा’ प्रकल्पाअंतर्गत प्रत्येकी पाच शेतकऱ्यांचे गट तयार केले. समूह पद्धतीने पाण्याची उपलब्धता व त्याचे योग्य वितरण ही व्यवस्था अंमलात आणली. गाव परिसरात तीन नाले असून ते जानेवारीपर्यंत वाहतात. त्यांच्यातून पाणी घेण्यासाठी गटालाच मोटरपंप देण्यात आला. शेतकऱ्यांनी यात प्रति केवळ शंभर रुपये भरायचे होते.   २- कमी खर्चिक बंधाऱ्याद्वारे पाणी गाव परिसरातून वाहणारे तीन नाले फेब्रुवारी-मार्चपर्यंत प्रवाहीत असतात. त्या पाण्याचा वापर पूर्वी होत नसे. सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात रेती भरून कमी खर्चातील साखळी बंधारे त्यावर बांधण्यात आले. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढली. बंधारे बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: श्रमदान केले. या पाण्याचा उपयोग ४३ एकरांवरील रब्बी तसेच भाजीपाला पिकांसाठी झाला. पूर्वी वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविल्याने गावातील कोरडवाहू क्षेत्र पाण्याखाली आणण्यात यश आले.  

झालेला फायदा सुमारे ३५ शेतकऱ्यांना वनराई बंधाऱ्यांचा उपयोग करून भाजीपाला घेणे शक्य झाले. पूर्वी कोरडवाहू पद्धतीत हे शेतकरी हरभरा घ्यायचे. आता स्वखर्चाने शेतकरीच पुढे होऊन हे बंधारे बांधतात. ३)बांधबंदिस्तीद्वारे जल व मृद संधारण उमराणी उंचसखल क्षेत्रात वसलेले गाव आहे. सुमारे तीस वर्षांतील पर्जन्यमानाच्या अभ्यासावरून जास्त तीव्रतेच्या (६० मिमी प्रति दिन) पावसाच्या घटना गावात वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे या परिसरातून मोठ्याप्रमाणात मातीची धूप होऊ लागली. त्याचा पीक उत्पादनावर परिणाम होऊ लागला. साहजिकच वाहून जाणाऱ्या सुपीक मातीची धूप रोखणे आवश्यक वाटू लागले. त्यामुळे प्रायोगिक स्तरावर शेतकऱ्यांच्या शेतांची बांधबंदिस्ती करण्यात आली. माती अडविण्याच्या प्रयोगाचे यश पाहून शेतकऱ्यांनी संपूर्ण गावात मनरेगाअंतर्गत शेतांची बांधबंदिस्ती करून घेतली. झालेला फायदा पावसाच्या पाण्यामुळे होणारी मातीची धूप कमी करून पाणी जिरविण्यात गावकऱ्यांना यश आले. या कामामुळे मजुरीच्या रूपात सुमारे आठ लाख रुपये रक्कम ग्रामस्थांनी पदरात पाडून घेतली. अशी झाली बांधबंदिस्ती

  • उताराला आडव्या दिशेने चर खोदले. (दोन मीटर रूंदी व पाच मीटर लांबीचे)
  • दोन चरांमध्ये एक फूट अंतर
  • या चरांमधून निघणाऱ्या मातीचा बांध बनवला. पाऊस जास्त पडला तर जिरून जाण्याची व्यवस्था झाली.
  • ४)मूलस्थानी जलसंधारण उंचसखल जमीन असल्याने पावसाचे पाणी जमिनीत न जिरता शेतातून वाहून जाते. या पाण्यासोबत सुपीक मातीचा थरही वाहून जातो. या पाण्याचा पिकांना उपयोग व्हावा, पावसात पडणाऱ्या खंडामुळे पिकांना उद्‌भवणारा पाण्याचा ताण कमी व्हावा, यासाठी काही उपाय करण्यात आले. फायदे

  • उताराच्याविरुद्ध तसेच सरी वरंबा पद्धतीने लागवड यांसारख्या उपाययोजनांचा अवलंब केल्यामुळे पीक उत्पादनात स्थिरता मिळविण्यात शेतकऱ्यांना यश आले.
  • आदीवासी भागात मका भरपूर होतो. या भागातील शेतकऱ्यांचे हे रोजच्या खाण्यातील पीक आहे. पूर्वी तो लाकडी नांगराने बी सोडत जायचा. त्याऐवजी सरी वरंबा पद्धतीचा वापर सुरू केला. पावसाचे पाणी जास्त झाल्यास त्याचा योग्य निचरा होऊ लागला.
  • ५)सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर उपलब्ध पाण्याचे काटेकोर पद्धतीने व्यवस्थापन होण्यासाठी ठिबक, तुषार सिंचनासारख्या आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धतीचे प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतात घेण्यात आली. यामुळे शेतकरी उंचसखल क्षेत्रात पावसाळ्यानंतर भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये पिके सूक्ष्मसिंचनाद्वारे घेऊ लागले. उमराणीत स्प्रिंकलरचे पाच संच देण्यात आले असून शेतकरी हरभरा, भुईमूग, ज्वारी, मका आदी पिकांत त्याचा वापर करू लागले आहेत. फायदे-

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत भूजल संशोधन प्रकल्प आदीवासी उपयोजनेंतर्गत पाच शेतकऱ्यांना ठिबक सिंचन उपलब्ध करून दिले. त्यामुळे पाण्याचा वापर काटेकोर झाला. अल्प कालावधीची
  • भाजीपाला पिके मेथी, कोथिंबीर, पालक, भेंडी आदी पिके घेणे शक्य झाले. यातून कुटुंबासाठी
  • पोषक आहार तसेच नियमित अर्थार्जनाची सोय झाली.
  • पीक पद्धतीत बदल जमिनीचा मगदूर, हवामान, थंडीचा कालावधी, पाण्याची मर्यादीत उपलब्धता यावर आधारित कमी कालावधीची बटाटे, वाटाणा, पालेभाज्या यांसारखी पीक पद्धती अमलात आणली. गहू, मका यांसारख्या त्या परिसरात आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या पिकांना पर्याय देण्यात आला. उमराणीसारखे दुर्गम गाव आता कडधान्ये, भाजीपाला, चारा पिकांसाठी परिसरात वेगळी ओळख निर्माण करण्यात सफल झाले आहे. याच गावातील सौ. टेटीबाई कुशल पावरा, तानाजी फाडश्या पावरा आदी शेतकऱ्यांचा प्रयोगशील शेतकरी म्हणून राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. पिकांचे उत्पादन २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढवणे शक्य झाले आहे. जयंत उत्तरवार-९४०३६४७२९५ (पाणी व्यवस्थापन) आर. एम. पाटील-९८५०७६८८७६ (उद्यानविद्या) (लेखक कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com