जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष द्यावे

जमीन सुपीकता चर्चासत्रात (डावीकडून) डाॅ. कैलास मोते, डॉ. हरिहर कौसडीकर, स्मार्टकेमचे उपसरव्यवस्थापक संजय जगताप.
जमीन सुपीकता चर्चासत्रात (डावीकडून) डाॅ. कैलास मोते, डॉ. हरिहर कौसडीकर, स्मार्टकेमचे उपसरव्यवस्थापक संजय जगताप.

आळंदी (जि. पुणे): गेल्या काही वर्षांत जमिनीच्या सुपीकतेकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. पिकाचे उत्पादन वाढविताना त्याच गंभीरतेने जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. येथून पुढील काळात जमिनीची सुपीकता कायम राखणे हे आव्हान आहे. सरपंचांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन  अॅग्रोवन सरपंच महापरिषदेत विविध तज्ज्ञांनी केले. अॅग्रोवनने यंदाचे वर्ष जमिनीची सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या अनुषंगाने जमिनीची सुपीकता कायम राखण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपायांबाबत जमिनीच्या सुपीकतेबाबत तज्ज्ञांनी आपले विचार मांडले.

महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेचे शिक्षण व संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, मृद व जलसंधारण विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते, स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजीज’चे उपसरव्यवस्थापक संजय जगताप आदी तज्ज्ञांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी डॉ. कौसडीकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. सामू नियंत्रणात नाही, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण झपाट्याने खाली येत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता संयुक्त राष्ट्रसंघाने गांभीर्याने उपायांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जमिनी सुधारणेसाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील विविध विभागांत अन्नद्रव्यांची कमतरता गंभीरतेच्या पातळीवर आहे. याचा परिणाम सर्वच हंगामांतील पिकांच्या वाढीवर होत आहे. क्षारपड जमिनीचा विषयही गंभीर आहे. जमीन सुधारायची असेल तर इथून पुढील वीस वर्षात प्रभावीपणे प्रयत्न केले, तरच जमीन सुपीकतेकडे जाऊ शकते. सरपंचांनी आपल्या गावांतील इतर प्रश्‍नांबरोबरीने जमिनीच्या आरोग्यालाही प्राधान्य देण्याची गरज आहे.'' जमीन सुपीकतेसाठी सॅंपल डे डॉ. मोते म्हणाले की, राज्यातील ४० टक्के जमीन पडीक आहे. कोकण व डोंगराळ भागात तर जमीन सुपीकतेची जटील समस्या आहे. राष्ट्रीय प्रकल्प विकासांतर्गत आम्ही याबाबत अभियान राबवत आहोत. केंद्राच्या वतीनेही दोन वर्षांपूर्वी शाश्‍वत शेती अभियान सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २३ लाख मृदा नमुने काढण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात १८ लाख नवीन नमुने काढण्यात येणार आहेत. त्यानुसार आरोग्यपत्रिकेचे वाटप सुरू आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे काम अग्रेसर आहे. पुढील काळात जमीन सुपीकतेबाबत सॅम्पल डे उपक्रम गावपातळीवर साजरा करणार आहोत. यासाठी सरपंचांनी सहभाग घ्यावा.'' श्री. जगताप म्हणाले की, पीक फेरपालट न केल्याने अन्नद्रव्यांचा साठा कमी झाला आहे. पिकांचे आरोग्य बिघडण्यामागील हे एक कारण आहे. जमिनीच्या आरोग्याबरोबर माणसाचेही आरोग्य बिघडत आहे. याला जमिनीतील कमी होणारी अन्नद्रव्येच कारणीभूत आहेत. माती परीक्षण करणे, सेंद्रिय पदार्थांचा वापर जमिनीत प्रभावीपणे करणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. सरपंचांनी शेतकऱ्यांना याकामी प्रोत्साहन द्यावे. ॲग्रोवनचे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी सूत्रसंचालन केले. अॅग्रोवनचे यंदा जमीन सुपीकता वर्ष अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविकात २०१८ वर्ष अॅग्रोवनच्या वतीने जमीन सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्याअंतर्गत आगामी वर्षभर अॅग्रोवनच्या माध्यमातून जमीन सुपीकतेविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आणण्याचे कार्य केले जाणार आहे. राज्यातील विविध भागांतील जमिनीचा लेखाजोखा मांडताना, त्यावरील उपायांच्या दृष्टीने मोहीम आखणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com