बहुविध पिके, तंत्रज्ञान यांचा सुरेख मिलाफ

कांदेबाग केळीत टरबुजाचे आंतरपीक.
कांदेबाग केळीत टरबुजाचे आंतरपीक.

मुंबईतील चांगली नोकरी सोडून शेतीतच प्रगती करायची, या उद्देशाने भगवान फकिरचंद पाटील यांनी आपले गाढोदे (ता. जि. जळगाव) गाव गाठले. सुमारे वीस वर्षे विविध पिकांचे प्रयोग करण्याबरोबरच विविध सुधारित तंत्र वापरण्यावर भर दिला. त्यातून शेती समृद्ध केली. प्रयोगशील व शेतीवर प्रेम करणारा शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळख निर्माण केली. अलीकडील काळात शेतीपेक्षा नोकरीलाच जास्त महत्त्व आले आहे. घरची शेती असली तरी निवृत्तीनंतर शेतीचे बघू, मग गावी जाऊ अशा भूमिका घेताना अनेक जण दिसतात. त्यातच अभियंतापदाची नोकरी सोडून घरी परतून शेती करण्याची, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याची धमक खूप कमी जणांमध्ये दिसते. हीच धमक दाखवून गाढोदे (ता. जि. जळगाव) येथील भगवान पाटील मुंबईतील नोकरी सोडून घरी परतले. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ते शेतीत रमले आहेत. घरच्या शेतीने साद घातली भगवान यांनी गावात सातवीपर्यंत तर दहावीपर्यंत नातेवाइकांकडे चोपडा (जि. जळगाव) येथे शिक्षण घेतले. चांगले गुण मिळाल्याने ‘इलेक्‍ट्रीकल’ विषयातून अमरावती येथून अभियांत्रिकीची पदविका घेतली. त्यानंतर गोरेगाव (मुंबई) येथे महानंद प्रकल्पात १९८४ ते १९८८ या काळात नोकरी केली. (तंत्रसहायक). घरची शेती त्यांना अधिक खुणावत होती. मग ‘मेंटेंनन्स’ विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला व पत्नीसह गावी परतले. घरची शेती गाढोदे गाव तापी व गिरणा नदी या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांमध्ये वसलेले गाव असून, काळी कसदार, मध्यम स्वरूपाची सुपीक जमीन या भागात आहे. केळी हे प्रमुख पीक असून कापूसही असतो. गावात भगवान यांच्यासहित आठ भावांचे संयुक्त कुटुंब होते. त्यांचे वडील फकिरचंद पाटील गावचे १५ वर्षे बिनविरोध सरपंच होते. त्या वेळी संयुक्त दीडशे शेती होती. पंधरा कूपनलिका होत्या. भगवान यांचे बंधू डोंगर यांचे चोपडा येथे कृषी निविष्ठा विक्री केंद्र आहे. अरुण हे किनोद (जि. जळगाव) येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. भगवान यांना राहुल व पंकज ही दोन मुले आहेत. राहुल होमिओपॅथीचे डॉक्‍टर असून, ते नाशिकला स्थायिक आहेत. पंकज कृषी पदवीधरक असून वडिलांसोबत शेती करतात. प्रयोगशील भगवान

  • केळीसाठी प्रसिद्ध आपल्या भागात २००५ मध्ये गवारगमचे बियाणे राजस्थानातून आणले. विक्री नंदुरबारातील व्यापाऱ्यांना केली. तीन एकर डाळिंब शेती केली.
  • सन २००५ मध्ये कुटुंब विभक्‍त झाल्यावर वाट्याला २२ एकर शेती व पाच कूपनलिका आल्या.
  • विविध प्रयोगांतून चांगले उत्पादन व उत्पन्न मिळवत तीन एकर शेती घेतली. आज २५ एकर शेती आहे.
  • परिसरातील १०० ते १५० शेतकऱ्यांकडून केळी संकलित करून भगवान पंजाब, दिल्लीकडील व्यापाऱ्यांना देतात. त्याचे कमिशन शेतकऱ्यांकडून न घेता व्यापाऱ्यांकडून घेतात. त्यासाठी किनोद या बाजारपेठेच्या गावी कार्यालयही घेतले आहे. या प्रक्रियेत कापणी रखडली, केळी शेतातच पिकली अशा अनुभवांनाही सामोरे जावे लागले.
  • तांत्रिक बाबी

  • जमिनीचा पोत राखण्यावर भर.
  • केळी लागवडीपूर्वी एकरी तीन ट्रॉली शेणखताचा वापर
  • यंदा १० एकर कांदेबाग केळीसाठी ८० ते ९० टक्के सेंद्रिय खतांचा वापर
  • -शेणखतासाठी दोन बैलजोड्या, दोन गायी व दोन म्हशींचे संगोपन
  • आंतरमशागतीसाठी छोटे ट्रॅक्‍टर. मालवाहतूक व अन्य कामांसाठी मोठे टॅक्‍टर
  • ज्या क्षेत्रात केळी लागवडीचे नियोजन, तिथे जुलैमध्ये कांदा पीक बेवड.
  • कुठल्याही पिकाचे अवशेष जाळत नाहीत. केळीचे खांब, खोडवे यांचे यांत्रिक तुकडे करून जमिनीत गाडतात.
  • चाऱ्यासाठी दरवर्षी ज्वारी
  • विविध पीक प्रयोग केळी दरवर्षी कांदेबाग. उतिसंवर्धित वाण. एकरी १७५० ते १८०० झाडे. प्रति १८ ते २० किलोची रास. -पंचवीस एकरांपैकी सुमारे १५ एकरांत केळीची दोन टप्प्यांमध्ये लागवड. त्यामुळे दीर्घकाळ माल उपलब्ध होतो. या भागातील अन्य मुख्य केळी पट्ट्यात मृगबहार असतो. त्या काळात व्यापारी या भागात कमी फिरकतात; मात्र कांदेबहार अन्य ठिकाणी कमी. त्यामुळे व्यापाऱ्यांचा अोढाही इकडे तसेच दरही तुलनेने अधिक मिळतात. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात पाहिलेला प्रयोग यंदा राबविला. यंदा आठ एकर कांदेबाग केळीत प्रथमच मल्चिंगवर टरबूज. कांद्याची करार शेती या भागातील प्रसिद्ध कंपनीसोबत पांढऱ्या कांद्याची शेती. पेरणीयंत्राचा वापर त्यासाठी. एकरी ८ ते १० टन उत्पादन मिळते. काहीवेळा दर मार्केटपेक्षा कमीही मिळतो; मात्र हमीभाव असतो. कांदा बीजोत्पादन दोन वर्षांपासून चार एकरांत एका कंपनीसाठी कांदा बीजोत्पादन. एकरी तीन क्विंटलपर्यंत उत्पादन. मागील वर्षी क्विंटलला ३५ हजार रुपये, तर यंदा ३० हजार रुपये दर. पपईत टरबूज (कलिंगड) पहिल्या टप्प्यातील कांदेबाग रिकामी झाल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीत टरबूज लागवड. त्यानंतर एक महिन्याने पपईची आठ बाय सात फुटावर लागवड. कलिंगडाचे एकरी २० टन, तर पपईचे प्रतिझाड ५० किलोपर्यंत उत्पादन. सर्व फळांची स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री. त्यामुळे जागेवरच मार्केट. अन्य पिकांचे प्रयोग

  • दोन वर्षांपूर्वी मल्चिंग आणि ठिबकवर तीन एकरांत हिरव्या व लाल मिरचीचे यशस्वी उत्पादन
  • मागील वर्षी चक्रीची (छोटे गंगाफळ) चार एकरांत लागवड. सुरत येथील मार्केट अभ्यासून त्याची शेती. एकरी ५० ते ६० हजार रुपये नफा मिळविला.
  • पूर्वी शेवग्याचीही यशस्वी शेती. पुढे विक्री व दर यांचे गणीत न जुळल्याने ही शेती थांबवली.
  • उर्वरित क्षेत्रात कापूस, ज्वारी. पॉलिहाऊस उभारण्याचा मानस.
  • संपर्क- भगवान पाटील-९९२३७८२१९८  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com