परस्परांची साथ लाभली,प्रगतीची दारे खुली झाली

 ब्याळे दांपत्य शेतीत एकत्र राबते.
ब्याळे दांपत्य शेतीत एकत्र राबते.

लातूर जिल्ह्यातील जवळा (बु.) व्हाया बोरगाव येथील ब्याळे दांपत्याने केवळ अडीच एकर शेती असतानाही उत्पन्नाचे विविध मार्ग शोधून आपले जीवनमान व अर्थकारण उंचावले आहे. शेतीबरोबरच महिला बचत गटाच्या माध्यमातून पत्नीने तर जोडधंद्याच्या माध्यमातून पतीने मोठा हातभार लावला. त्यामुळेच प्रगतीची दारे त्यांच्यासाठी खुली झाली. परिस्थिती आणि नैसर्गिक समस्या व्यक्तीला प्रयत्नवादी बनवतात. त्यातूनच पारंपरिक पद्धतीला छेद देत नवे काही करून दाखवण्याची उभारी येते. लोक काय म्हणतील याचा विचार करत न बसता स्वतःमधील ऊर्जेला वाट मोकळी करून प्रयत्नांची शिकस्त केली की काहीतरी पदरात पडतेच. जवळा बुद्रुक (ता. जि. लातूर) येथील दैवशाला व शिवकुमार या ब्याळे दांपत्याचा हाच आदर्श घेण्याजोगा आहे. शेतीतील प्रयत्नवाद शिवकुमार यांची कोरडवाहू शेती. केवळ हंगामी पिके येत. त्यातून कुटुंबाचे जेमतेम दोनवेळचे भागायचे. पण एवढ्यावरच समाधान मानेल ती गृहलक्ष्मी कसली? तिने (दैवशाला) कंबर कसली म्हणून पतीला भरभक्कम साथ लाभली. मग दोघांनी लहान विहीर घेऊन पाण्याची व्यवस्था केली. पण शेतीतून फारसे हाती काही येत नव्हते. मग पतीने ‘स्पीकर’ भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. येणाऱ्या पैशांतून पुढे भुईमूग दोन एकर केला. दर चांगला मिळाला. त्यातून बरे पैसे शिल्लक राहिले. बॅंकेकडून वर्षभर चकरा मारून कर्ज घेऊन स्प्रिंकलर घेतले. पाइपलाइन केली. बचत गटाच्या माध्यमातून सक्रिय दैवशाला यांनीही २००६ च्या दरम्यान पुढाकार घेतला. त्यातून ऐश्‍वर्यादैवी महिला शेतकरी बचत गटाची स्थापना केली. दर महिना शंभर रुपये बचत करून गटातील बारा महिला अडचणीला मदत करीत. पुढे आणखी बऱ्याच जणी येऊन मिळाल्या. पुढे मन्मथमाऊली महिला बचत स्थापन झाला. इतर बंद गटही चालू झाले. त्यातून पिठाची गिरणी, डाळमील, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय भाजीपाला व अन्य पूरक व्यवसायांना चालना मिळाली. गटातील अनेक महिला आज घरासाठी आधार बनून मुलांच्या शिक्षणाला, घराच्या उभारणीला मदत करीत आहेत. एकेक करीत निर्माण झालेल्या गावातल्या पंचवीस गटांचा महासंघ एकता जिजाऊ महिला बचत गट या नावाने स्थापन झाला. तो नाबार्डकडे जोडला गेला. या गटांना ‘आत्मा’, स्वयंशिक्षण प्रयोग परिवाराने मोलाची मदत केली. आत्मविश्‍वास व कामांतील सातत्य यातून दैवशाला यांनीही स्वतःमधील उद्योजकत्व सिद्ध केले. विविध प्रयोगांतून प्रगतीकडे आज ब्याळे दांपत्य शेती व पूरक व्यवसायात एकमेकांचे कष्ट वाटून घेत प्रगतीचा एकेक टप्पा पुढे जात आहेत. पूर्वी सावकाराकडून कर्ज काढण्याची वेळ होती. आज हे दांपत्य आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले आहे. खरीप, रब्बी हंगामांतील पिकांची शेती सुरू आहेच. शिवाय दहा देशी गायी आहेत. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च करून चांगला गोठा बांधला. साधारण २० लिटरपर्यंत दूध दररोज डेअरीला घातले जाते. त्याची जबाबदारी शिवकुमार सांभाळतात. हायड्रोपोनिक्स चारा, मूरघास मांजरा कृषी विज्ञान केंद्राची मदत घेऊन यंदा एक पिशवीभर मूरघास तयार केले आहे. कडबाकुट्टी यंत्र घेतले आहे. हिरव्या चाऱ्यासाठी ल्युसर्न, जयवंत गवत प्रत्येक पाच गुंठ्यावर लावले आहे. अझोला खाद्य तयार केले जाते. चौदा ट्रेच्या आधारे हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा उत्पादित केला जातो. एस-९ कल्चर वापरून बायोडायनॅमिक पद्धतीने खत बनवले जात आहे. साधारण तील किलो निर्मितीचे उद्दिष्ट आहे. यंदाच्या वर्षीपासून सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. पुढील काळात सेंद्रिय चारा व त्यावर आधारित देशी गायींचे सेंद्रिय दूध पॅकिंग करून लातुरात विक्री करण्याचे नियोजन आहे. मुलगा शशीशेखरही आता शेतीत उतरलाय. त्याने कृषी पदविका घेतली आहे. नव्या विचारांनी तो प्रयोग करतो आहे. कर्ज काढून मोठा ट्रॅक्‍टर, मळणी यंत्र, रोटावेटर यंत्रे घेतली आहेत. शेळीपालन, ऊस रोपवाटिका शेती, दुग्ध व्यवसायाच्या जोडीला उस्मानाबादी, सिरोही, बोअर जातींच्या शेळ्यांचे पालन सुरू केले आहे. एका शेळीच्या संख्येपासून आज १५ पर्यंत संख्या झाली आहे. यंदाच्या वर्षी पाच बोकडांचीही विक्री केली आहे. सेंद्रिय पद्धतीचा गहू, ज्वारी, हरभरा, मूग, तूर, कांदा, लसूण किमान घरच्यापुरता तरी पिकवण्याचा प्रयत्न आहे. ऊस रोपवाटिकाही सुरू केली आहे. काही प्रमाणात भाजीपालाही पिकवतात. दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत यांचा उपयोग केला जातो. यासाठीची प्रशिक्षणे सर्व महिलांसाठी ब्याळे यांच्या शेतात घेतली जातात. त्यामुळे रसायनांवर होणारा अतिरिक्त खर्च वाचून येणारा उत्पादन खर्च कमी झाला. प्रगतीच्या वाटा मातीत राबून दैवशाला यांनी बचत गटाच्या माध्यमातून पैशाला पैसा जोडला. दांपत्याने शेती सिंचनाखाली आणली. बांधावर पंचवीस नारळाची झाडे लावली आहेत. त्यातून वीसेक हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. एका मुलाला कृषी पदविकेचे तर दुसऱ्याला (पवन) इंजिनिअरिंगचे शिक्षण देणे शक्य झाले. मुलगीही चांगल्या घरात दिली, याचे दांपत्याला समाधान आहे. जुने पडके घर भूकंपानंतर बांधून घेतले. घराची मालकीही पत्नीच्या नावे, शेतीचा तुकडाही त्यांच्याच नावे करण्याचा सुज्ञपणा शिवकुमार यांनी दाखवला. ते ॲग्रोवनचे नियमित वाचकही आहेत. त्यांच्या वाचनातूनच भाजीपाला शेतीत सुधारित तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. बचत गटाचे झाले फायदे देवशाला बचत गटातही सक्रिय असल्याचे काही फायदे झाले. गटातील बऱ्याच जणी गावी पाटोदा (जि. बीड) येथे बोअर पुनर्भरण, पाणलोट प्रयोग पाहण्यासाठी सहलीचा अनुभव घेऊन आल्या. मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर, उस्मानाबाद येथे सोयाबीनपासून उपपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण पन्नास महिलांनी घेतले. त्यात सोया दूध, दही, सोयाशेव, चकली, पनीर, चिवडा, खाकरा असे उपपदार्थ बनवून गटातल्या महिला कृषी प्रदर्शनात विक्री करतात. दैवशाला यांच्यासारख्या हिरकण्या पुढे आल्याने अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे. साहजिकच त्यांची समर्थ साथ लाभून प्रत्येकीच्या घरातील शेतीलाही मोठी चालना मिळाली आहे.

संपर्क- सौ. देवशाला शिवकुमार ब्याळे - ९७६६३५४६३१ शिवकुमार ब्याळे - ९५०३४९८४३३ (लेखक लातूर कृषी विभागांतर्गत मंडळ कृषी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com