जळगाव जिल्ह्यातील पिलखेडे गाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. सुधारित पद्धतीने केळीची शेती करून व्यापाऱ्यांनाही खरेदीसाठी आपल्या गावात आणणे येथील ग्रामस्थांनी भाग पाडले आहे. गावाने अनेक उच्चशिक्षित घडवले. अभियंते व डॉक्टर यांचे गाव म्हणून पिलखेडेची ओळख तयार झाली आहे. शिक्षणाची कास धरून प्रगतिपथावर असतानाच या मंडळींनी शेतीशी नाळ तोडलेली नाही. शेतीतून ग्रामविकास याच संकल्पनेवर गावाने विकास साधला आहे. जळगाव जिल्हा म्हणजे केळीचे आगर. या तालुक्यातील पिलखेडे हेदेखील केळीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. गिरणा नदीकाठावर हे गाव वसले असून, तापी नदीदेखील गावापासून सुमारे साडेतीन किलोमीटरवर आहे. भूगर्भात मुबलक जलसाठे आहेत. कूपनलिका प्रत्येक शेतात दिसते.
केळीची उत्पादकता वाढली पिलखेडेत बागायती क्षेत्र सुमारे ८५ टक्के आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने कंदांचा वापर करून इथले अधिकाधिक शेतकरी केळीची लागवड करायचे. पुढे जमिनी जशा कडक होऊ लागल्या तसे उत्पादन कमी होऊ लागले. उत्पादकता प्रतिरास १४ किलोपर्यंत आली. करपा रोगाचे संकटही २०११-१२ मध्ये आले. प्रमुख पीक संकटात आल्याने शेतकरी एकवटले. त्यांनी आदर्श पीक व्यवस्थापनाचे सामूहिक प्रयत्न सुरू केले. रोगग्रस्त झाडांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यावर भर दिला. सुधारणा केली, फरक दिसला आज ठिबकचा वापर गावात जवळपास ९० ते १०० टक्के असावा. ऊतिसंवर्धित रोपांचा वापरही वाढला आहे. पीक फेरपालट कटाक्षाने केली जाते. केळीची उत्पादकता तीन- चार वर्षांत हळूहळू वाढली. ती प्रतिरास २० किलोपर्यंत आणण्यात शेतकऱ्यांनी यश मिळविले. केळीचे क्षेत्र घटू दिले नाही. केळीचे मार्केटिंगही शेतकरी व्यवस्थितपणे करतात. केळी दर्जेदार असल्याने व्यापारी थेट गावात येऊन मोठ्या वाहनातून केळीची वाहतूक करतात. मार्चपर्यंत केळी उपलब्ध किलोमागे दीड ते दोन रुपये जादा दर अनेक शेतकऱ्यांना मिळताे. एकरी २५ टन व काहीवेळा त्याहून अधिक उत्पादन पिलखेडेचे शेतकरी घेऊ लागले आहेत. सचोटीने व्यवहाराचे सूत्र शेतकऱ्यांनी बांधल्याने मंदीच्या काळातही व्यापारी पिलखेडे येथील केळीची खरेदी टाळत नाहीत. नोव्हेंबरपासून केळी कापणीसाठी उपलब्ध होऊ लागते. ती मार्चपर्यंत सुरू असते. जमीन सुपीकतेचे महत्त्व जाणले जमीन सुपीकतेचे महत्त्व गावातील अनेकांना पटले आहे. केळीचे अवशेष अगदी जाड खांबही शेतात कुजविण्यावर त्यांनी भर दिला आहे. जमिनीत सूक्ष्मजीव वाढावेत, केळीच्या शेतीला अन्नद्रव्ये जमिनीत सहज मिळावेत, यासाठी केळी लागवडीच्या शेतात उडीद, मुगाची खरिपात पेरणी केली जाते. मळणीनंतर काड शेतातच आच्छादन म्हणून पसरविले जाते. शेत नांगरून १५ ते २० दिवस पडू दिले जाते. मग जमीन भुसभुशीत करून ऑक्टोबरच्या अखेरीस कांदेबहार किंवा कांदेबाग केळीची लागवड केली जाते.
कपाशीची थेट खरेदी दर्जेदार कापूस पिकविला जात असल्याने व्यापारी थेट गावात येऊन खरेदी करतात. जिनिंग किंवा शासकीय खरेदी केंद्रात कापूस नेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर मागील पाच- सहा वर्षांत अपवादानेच आली असावी. गावात उच्चशिक्षितांची संख्या चांगली एमबीबीएस, एमडी डॉक्टरही या गावात घडले अाहेत. संगणक, स्थापत्य या विषयातील अभियंत्यांची संख्याही कमी नाही. व्यवसाय, नोकरीनिमित्त त्यांना शहरात राहावे लागते; परंतु शेतीशी असलेली नाळ त्यांनी तोडलेली नाही. रविवारच्या सुटीला गावी येऊन ते आपल्या शेतीचे व्यवस्थापन करतात. गावातील विकासकामे
प्रतिक्रिय़ा गावातील मुले, मुली शिकूनसवरून मोठी झाली. त्यांची गाव, शेतीशी नाळ कायम आहे. यामुळे समृद्धी टिकून आहे. शेतीमुळे गावाचा विकास झाला आहे. -उमानंद चौधरी, शेतकरी अक्षय नरेंद्र चौधरी- ७०५८५८५८९८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.