मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा आरोग्य सेओवा, स्वच्छता जागृतीपासून सुरू झालेला प्रवास शिक्षण, पायाभूत सुविधा आणि जल-मृद् संधारणाच्या कार्यापर्यंत पसरला आहे. संस्थेच्या प्रयत्नांतून मराठवाड्यातील चौदा गावांत नदी, नाला खोलीकरण, बंधारा पुनरुज्जीवन व नव्याने बंधारे निर्मितीची कामे झाली. जलसंधारणाच्या कामामुळे शेती, पूरक उद्योग आणि ग्रामविकासाला नवी दिशा मिळाली आहे. औरंगाबाद येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्था शिक्षण, आरोग्य, जलसंधारणाच्या कामामध्ये अग्रेसर आहे. येत्या काळात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत विस्तार करण्याच्या अनुषंगाने अध्यक्ष मनसुख झांबड आणि सचिव तथा प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम आणि शेती विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
आरोग्य लोकसेवा प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आरोग्य लोकसेवांवर आधारित देखरेख प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा नोडल संस्था म्हणून संस्था तीन तालुका समन्वय संस्थांबरोबर काम करते. वैजापूर, गंगापूर या तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्राची या प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी संस्था आग्रही असून, त्यासाठी जनसुनवाईसारखे कार्यक्रम हाती घेतले जातात. एनएचएम अंतर्गत शासकीय आरोग्य केंद्रांमार्फत ग्रामीण जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सेवांविषयी मूल्यमापन, पर्यवेक्षण, आरोग्य देखरेख व नियोजन समितीमार्फत केले जाते.
जलसंधारणाच्या कामांनी घेतला वेग
ग्रामीण विकास संस्थेने २०१४ पासून औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यांतील चौदा गावात जलसंधारणाचे काम केले आहे. करंजगावापासून सुरू झालेली जलसंधारणाच्या कामाची मोहीम १४ गावांत पोचली. दहा टक्के लोकसहभाग, दात्यांची मदत व संस्थेच्या योगदानातून ही कामे झाल्याने काही गावे पाणीदार होत आहेत. १४ गावांमध्ये ४६ नाल्यांच्या खोलीकरण, गाळ काढण्याची कामे पूर्ण. जुने चार सिमेंट बांध दुरुस्त करण्यात आले असून, बारा नवीन बंधाऱ्यांची कामे. आठ पाझर तलावांतील गाळ काढण्याची मोहीम पूर्ण. गावशिवारातील चार छोट्या तळ्यांची कामे पूर्ण. या कामांमुळे ५ लाख २५ हजार घनमीटर पाणीसाठा. याचा १५ हजार एकर क्षेत्रास सिंचनासाठी फायदा. ३५० शेतकऱ्यांनी स्वखर्चाने पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतल्याने सुमारे २५० एकर जमीन कसदार होण्यास मदत. करंजगावाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला बोर नदीला मिळणाऱ्या दोन्ही नाल्यांवर बंधाऱ्यांची निर्मिती व पुनरुज्जीवन. यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ. शेतीसाठी फायदा. जलसंधारणाच्या कामांमध्ये संस्थेला बजाज ऑटो लिमिटेड, ग्रीव्ह इंडिया, एचडीएफसी बॅंक, श्रीमद रामचंद्र मिशन, धरमपूर यांची मदत. तसेच शेतकरी, लोकसहभागातून विकासाला गती. बालशिक्षणाचा ‘अंकुर’ प्रकल्प
ग्रामीण भागातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने संस्थेने ‘अंकुर’ प्रकल्प हाती घेतला. संस्था व ‘युनायटेड वे ऑफ मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने मॉन्सँटो इंडिया पुरस्कृत प्रकल्प. डिसेंबर २०१७ मध्ये प्रक्रिया पूर्ण झालेला हा प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १६ गावांतील १६ अंगणवाड्यांमध्ये जानेवारी २०१८ पासून राबविण्यास सुरवात. या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी इमारतीचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकविण्याचे तंत्र अवलंबिले जाते. सहभागी अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटांतील २८६ मुले व २९१ मुली, तर ० ते ३ वयोगटांतील २७७ मुले व २५० मुलींना अंकुर प्रकल्पामधून शिक्षण. अंगणवाडीमध्ये मुक्त खेळ, गाणी, गप्पा, चित्रकोडी यांच्या माध्यमातून शिक्षण. उपक्रमात पालकांचा सहभाग. मुलांच्या सहली, प्रवेश उत्सव, वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन. सामाजिक उपक्रमातून लोकांना साथ
औरंगाबाद शहरात रेल्वे स्टेशनजवळ संत गाडगे बाबा सभागृह येथे बेघर निवारागृहाची सोय. व्यसनमुक्तीसाठी सल्ला समुपदेशन. करंजगाव येथे ६ ते १२ वयोगटातील अनाथ मुलांसाठी निवारागृह. इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण, प्राथमिक आरोग्य उपचार सेवा, भोजन सुविधा मोफत. करंजगाव येथे संस्थेच्या स्वमालकीच्या दीड एकर जागेत ५० मुलांसाठी निवासी वसतिगृह. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, चाइल्डलाइन फाउंडेशन व महिला बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रकल्प. या प्रकल्पाच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त मुले, बालकामगार, व्यसनाधीन होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेल्या मुलांना मोफत सल्ला देऊन मदतीसाठी सहकार्य. राज्य सरकार, स्वयंसेवी संस्था व कॉर्पोरेट सेक्टरशी चाइल्ड लाइनशी हेल्पलाइन प्रकल्प जोडलेला आहे. प्रकल्पांतर्गत १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास मोफत सेवा. संस्थेचा स्वनिधीसह विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून करंजगाव, राहेगव्हाण, गोळवाडी, धोंदलगाव, माळीसागज आदी जवळपास आठ गावांमध्ये सुलभ शौचालयाची उभारणी. ५५० शौचालयांचे बांधकाम. करंजगाव हगणदारीमुक्त झाले असून, इतरही गावे हगणदारीमुक्त करण्याचा संस्थेचा संकल्प. औरंगाबाद जिल्ह्यात लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प आणि लिंक वर्कर योजनेच्या शंभर संवेदनशील गावांमध्ये एड्स प्रतिबंध व नियंत्रणासाठी कार्य. संसर्गीत व्यक्तीला आरोग्य सेवा मिळवून देणे, समुपदेशन, तपासणी सेवा सुविधा मिळवून देणे, रेड रिबीन क्लबची स्थापना, स्वयंसेवक प्रशिक्षण व त्यांचे विविध मार्गांतून सबलीकरण करण्याचे काम. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण उपक्रम. ठाण्यामधील भांडुप परिसरातील प्रतापनगर झोपडपट्टीमधील मुलांना संगणक साक्षरतेचे धडे. ई स्टेप लर्निंग प्रोग्रॅमच्या माध्यमातून २४५ युवती व युवकांना प्रशिक्षण. त्यापैकी १९६ जणांना रोजगार. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात मातृ संस्था म्हणून कार्य. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षणाची गोडी लागली अंकुर प्रकल्पामुळे अंगणवाडी शिक्षणात चांगला बदल झाला. हसत खेळत शिकणाऱ्या मुलांना अंगणवाडीचे वातावरण आनंदी वाटू लागल्याने उपस्थिती वाढली. जयशीला बिरसोनी,अंगणवाडी सेविका, (गणोरी, जि. औरंगाबाद) शेतीला मिळाले पाणी माझ्या शेतालगत झालेल्या गट्ट्यामुळे विहिरीला पाणी आले. जलसंधारणाच्या कामामुळे पिकाने मोठी साथ दिली. आता शेती बरोबरीने वेल्डिंगचा जोडधंदा सुरू करत आहे. नवनाथ जाधव, (करंजगाव, जि. औरंगाबाद) पाणी समस्या सुटली संस्थेने जलसंधारणाची कामे केल्याने फायदा झाला. पाणी समस्या सुटली आहे. गावाला टॅंकरची गरज नाही अशी परिस्थिती झाली आहे. भागीनाथ घोडके, (उपसरपंच, करंजगाव, जि. औरंगाबाद) जोडधंद्याला मिळाली साथ तेरा हजार कोंबड्यांच्या पोल्ट्रीला लागणारे पाणी जलसंधारणाच्या कामामुळे उपलब्ध झाले. त्यामुळे माझ्या पोल्ट्री व्यवसायाने गती पकडली आहे. सोमनाथ मगर,(करंजगाव, जि. औरंगाबाद)