परभणी जिल्ह्यातील बोरी (ता. जिंतूर) येथील सात गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत आचार्य भास्करभट्ट अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली आहे. सोयाबीन, हरभरा बीजोत्पादन, पॅकिंगमधून बियाणे विक्री, क्लीनिंग-ग्रेडिंग, डाळनिर्मिती आदी विविध उपक्रमांद्वारे मालाचे मूल्यवर्धन करण्यास कंपनीने सुरवात केली आहे. त्यातून कंपनीचा नफा वाढण्यास मदत होत आहे. समूहशक्तीच्या माध्यमातून बोरी परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न त्यातून होत आहेत. परभणी जिल्ह्यातील बोरी (ता. जिंतूर) हे महत्त्वाचे बाजारपेठेच ठिकाण आहे. गावपरिसरात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. सोयाबीन, तूर, मूग, कापूस, हरभरा, गहू आदी पिकांवर येथील शेतकऱ्यांचा भर असतो. आधुनिक शेती तंत्रज्ञान वापराच्या मानसिकतेतून बोरी गावातील काही शेतकरी एकत्र आले. त्यांनी आपल्या गावासोबत परिसरातील कौसडी, वाघी बोबडे, करवली, चांदज या पाच गावांतील सुमारे १३ शेतकरी गटांनाही सोबत घेतले. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा इरादा त्यांना सांगितला. त्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत २०१४ मध्ये बोरी येथे आचार्य भास्करभट्ट अॅग्रो प्रोड्यूसर ही शेतकरी उत्पादक कंपनी अस्तित्वात आली. कंपनीचे सदस्य
कंपनीची वैशिष्ट्ये व उपक्रम
सोयाबीन, हरभरा बीजोत्पादन सोयाबीन आणि हरभरा या महत्त्वाच्या पिकांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी कंपनीतर्फे सभासद शेतकऱ्यांमार्फत विविध वाणांचे बीजोत्पादन घेण्यात येत आहे. असे केले बीजोत्पादन सोयाबीन - २०१५- ९० एकरांवर ७०० क्विंटल २०१६ - १२० एकरांवर - ९०० क्विंटल २०१७ - ६० एकरांवर- ७०० क्विंटल. हरभरा २०१५ - २० हेक्टरवर ४०० क्विंटल. २०१६ ४२ हेक्टरवर ८०० क्विंटल. २०१७ मध्ये ३१.६० हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम. कंपनीचे क्लीनिंग, ग्रेडिंग युनिट आहे. बियाणे स्वच्छता, प्रतवारीनंतर ३० किलो वजनाच्या पिशव्यांमध्ये भरून बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. यंदा सात हजार रुपये प्रतिक्विंटल दराने बियाण्यांची विक्री झाली. अन्य वैशिष्ट्ये
लागवड तंत्रज्ञानात बदल पेरणीसाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) या सुधारित तंत्राचा अवलंब कंपनीच्या शेतकरी सदस्यांकडून होत आहे. बीबीएफ तंत्राच्या वापरामुळे जमिनीची धूप कमी होते. अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा होतो. पावसाच्या खंड काळात पीक तग धरून राहते, असे या शेतकऱ्यांना आढळले. हमीभावाने तूर खरेदी गेल्या वर्षी तुरीचे भरघोस उत्पादन आले. दर कोसळल्यामुळे हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात होती. परंतु बोरी परिसरातील शेतकऱ्यांना जवळचे खरेदी केंद्र नव्हते. या परिस्थितीत आधारभूत किंमत दराने तूर खरेदी करण्यासाठी कंपनीला परवानगी मिळाली. त्यामुळे परिसरातील गावातील शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विक्री करण्यासाठी जवळचे केंद्र उपलब्ध झाले. गेल्या वर्षीच्या हंगामात ८१ शेतकऱ्यांच्या एक हजार ७५० क्विंटल तुरीची खरेदी कंपनीतर्फे करण्यात आली. डाळमिलची उभारणी कंपनीच्या वाढीव व्यवसाय आराखड्यानुसार डाळमिलची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे. क्लीनिंग, ग्रेडिंग युनिटच्या शेजारी डाळमिल बसविण्यात येणार आहे. तूर, हरभरा यांसह मूग, उडीद आदी धान्यांची नेहमीच्या पद्धतीने विक्री करण्यापेक्षा डाळनिर्मिती करून विक्री केल्यामुळे मालाचे मूल्यवर्धन होऊन सभासद शेतकऱ्यांचा नफा वाढणार आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी कंपनीला भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक एम. एल. चपळे, उपसंचालक संतोष नादरे, श्री. सराफ, एमएसीपीचे पणनतज्ज्ञ शैलेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन कंपनीला मिळते. संपर्क- मधुकर थोरात - ९१६८९०९०८६, (शेतकरी कंपनी अध्यक्ष)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.