थेट विक्रीतून मिळवतो अपेक्षित नफा

उसामध्ये हरभऱ्याचे आंतरपीक
उसामध्ये हरभऱ्याचे आंतरपीक

परभणी शहरातील भारतीय बाल विद्यामंदिर शाळेमध्ये राजाभाऊ पांचाळ हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षकीपेशा सांभाळून पांचाळ हे सहजपूर-जवळा शिवारातील शेतीही चांगल्या प्रकारे करतात. शेतीमालाची थेट ग्राहकांना विक्री करत अपेक्षित नफा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

राजाभाऊ ग्यानदेव पांचाळ यांचे मूळ गाव जिंतूर तालुक्यातील निवळी-खुर्द. करपरा मध्यम प्रकल्पासाठी या गावातील शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्यात आले. त्यात पांचाळ कुटुंबाची जमीन गेली. गावाचे पुनर्वसन झाले. पुनर्वसन झाल्यानंतर गावाशेजारी जमीन घेऊन तिथे शेती करायची अशी राजाभाऊंच्या वडिलांची इच्छा होती. परंतु जमीन मिळाली नाही. त्यामुळे गावामध्येच ग्यानदेव पांचाळ शेती अवजारे तयार करून देण्याचा पारंपरिक व्यवसाय करू लागले. १९७२ च्या दुष्काळात गावकऱ्यांचे खूप हाल झाले. त्यामुळे  पारंपरिक व्यवसायात अडकून न पडता मुलांनी शिक्षण घेऊन नोकरी करावी, असे ग्यानदेव पांचाळ यांना वाटत होते. परंतु गावात शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे राजाभाऊ यांना त्यांच्या मामांकडे आजोळी बोरी (ता. जिंतूर) येथे शिक्षणासाठी ठेवण्यात आले. बोरी येथील शाळेतून चौथी उत्तीर्ण झाल्यानंतर पाचव्या वर्गासाठी त्यांची औरंगाबाद येथील पब्लिक स्कूलमध्ये निवड झाली. १९८२ मध्ये विशेष प्रावीण्यासह दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वसमत येथे शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. बी.ए. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८५ साली राजाभाऊ पांचाळ हे परभणी येथील भारतीय बाल विद्या मंदिरमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. दरम्यानच्या काळात १९८८ मध्ये नांदेड येथील श्रीगुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सहायक ग्रंथपाल असलेल्या श्रद्धा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर ते नांदेड येथे वास्तव्यास गेले. दरम्यानच्या काळात पांचाळ यांनी बी.एड.एम.एड. पदवी संपादन केली. सध्या ते परभणीमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा श्रीकांत हा औरंगाबाद येथे नोकरी करतो.

खरेदी केली शेती

पांचाळ पती-पत्नी दोघेही नोकरी असल्यामुळे खरे त्यांना शेती करायची गरज नव्हती. परंतु वडिलांचे जमीन घेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी राजाभाऊ पांचाळ यांनी २००७ मध्ये परभणी शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील सहजपूर-जवळा शिवारामध्ये सात एकर पडजमीन खरेदी केली. जमीन लागवडीखाली आणण्यासाठी पांचाळ यांनी चांगली मशागत केली. ढासळलेल्या विहिरीचे खोलीकरण आणि बांधकाम केले. पीक नियोजनाबाबत राजाभाऊ पांचाळ म्हणाले, की पीक नियोजन करण्यापूर्वी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील तज्ज्ञ तसेच परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला घेतला. नोकरीत असल्यामुळे दैनंदिन शेती व्यवस्थापनासाठी सालगडी ठेवला. पहिल्या वर्षी पाच एकर सोयाबीन आणि दीड एकर हळदीची लागवड केली. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्याच्या मार्गदर्शनामुळे पिकांचे चांगले उत्पादन मिळू लागले. २०१३ पर्यंत मी हळद आणि सोयाबीन ही पिके घेत होतो. वाळविलेल्या हळदीचे मला एकरी २० क्विंटल, तर सोयाबीनचे एकरी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. गेल्या तीन वर्षांत पाऊस कमी झाल्यामुळे विहिरीमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे हळद लागवड बंद केली. सोयाबीन पिकानंतर चार एकर गहू, तीन एकर हरभरा लागवड असते. गव्हाचे एकरी १३ क्विंटल, तर हरभऱ्याचे ५ क्विंटल उत्पादन मिळते. यंदा पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे अडीच एकरांवर पूर्व हंगामी उसाची लागवड केली. चार फुटांची सरी सोडून बेणे प्रक्रियाकरून लागवड केली. त्यामध्ये हरभऱ्याचे आंतरपीक घेतले. सध्या तीन एकरावर गहू लागवड आहे. दरवर्षी अर्धा गुंठा क्षेत्रावर लसणाची लागवड करतो. बैलांची हौस असल्याने लालकंधारी बैलजोडी शेतात आहे. बैलांसाठी बांधावर गवताची लागवड केली आहे. मात्र ज्वारीचा कडबा मात्र विकत घ्यावा लागतो.

सालगड्याच्या साथीने शेतीचे नियोजन नोकरीच्या निमित्ताने पांचाळ काही वर्षांपूर्वी नांदेड ते परभणी असा दररोज प्रवास करायचे. परंतु सध्या पांचाळ परभणी येथे वास्तव्यास आहेत. शालेय सुटीच्या दिवशी ते शेतीवर जातात. सालगड्याच्या बरोबरीने आठवड्याचे नियोजन करतात. गरजेनुसार मदतीला मजूर घेतले जातात. सोयाबीन, गव्हाच्या काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जातो. दरवर्षी शेतीतील उत्पन्न पीक व्यवस्थापनासाठी वापरले जाते. सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ शेती करण्याचा त्यांचा मानस आहे. जमीन खरेदी करून वडिलांचे स्वतःची शेती असण्याचे स्वप्न साकार झाल्याचे त्यांना समाधान वाटते.

थेट ग्राहकांना गव्हाची विक्री  शेतीमालाच्या विक्रीबाबत पांचाळ म्हणाले, की मी सोयाबीन, हरभऱ्याची परभणी बाजारपेठेत विक्री करतो. परंतु गव्हाची घरूनच विक्री करतो. माझ्या शाळेतील सहकारी, तसेच गावातील मित्रमंडळी दरवर्षी सुगीनंतर लगेच घरी येऊन गव्हाची खरेदी करतात. खात्रीशीर गहू मिळत असल्यामुळे सगळा संपतो. योग्य दर्जा आणि थेट विक्रीमुळे बाजारपेठेतील दरापेक्षा क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये अधिक दर मला मिळतो. जमीन सुपीकतेवर भर पांचाळ यांनी माती परीक्षण करून घेतले आहे. त्यानुसार पिकांना संतुलित प्रमाणात खतमात्रा दिल्या जातात. शेणखताच्या जास्तीत जास्त वापरावर भर आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नांगरट केली जाते. यामुळे जमीन भुसभुशीत होते. तणकट कमी निघते. तण नियंत्रणासाठी आंतरमशागतीवर भर दिला आहे. जोरदार पावसाच्या पाण्यामुळे मातीचा सुपीक थर वाहून जाऊ नये, यासाठी प्रत्येक अडीच एकरानंतर बांध घातलेले आहेत. कृषी विद्यापीठ, तसेच परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांना भेट देऊन पीक व्यवस्थानात दरवर्षी ते सुधारणा करतात. येत्या काळात केळी लागवडीचे त्यांनी नियोजन केले आहे. शेतरस्त्यासाठी पुढाकार सहजपूर-जवळा शिवाराचा समावेश जायकवाडीच्या लाभक्षेत्रात होतो. पांचाळ यांची जमीन गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. सुरवातीच्या काळात या शेताकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. पावसाळ्यात चिखल झाल्यामुळे शेतीमालाच्या वाहतूकीसाठी बैलगाडीदेखील नेता येत नव्हती. या भागातील सर्वच शेतकऱ्यांना रस्त्याअभावी त्रास सहन करावा लागत होता. हे लक्षात घेऊन राजाभाऊंनी ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकऱ्यांना एकत्रित करून लोकवर्गणीतून रस्ता तयार करण्याची संकल्पना मांडली. सर्वजणांनी यास होकार दिला. लोकवर्गणीतून चांगला रस्ता तयार झाला. एेकेकाळी बैलगाडी जात नसलेल्या रस्त्याने आता उसाची वाहतूक होत आहे. संपर्क : राजाभाऊ पांचाळ, ९६५७५७७७०५  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com