माळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्न

मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर दगडालाही पाझर फुटतो असे म्हणतात. याच गुणांच्या जोरावर आणि नियोजनबद्ध पाण्याच्या व्यवस्थापनावर शंकरवाडी (जि. लातूर) येथील भागवत बोर्डे यांनी माळरानावर शेतीचे स्वप्न साकारले आहे. केळी, आंबा आणि कलिंगडाच्या शेतीने त्यांच्या शेतीचे अर्थकारण उंचावले आहे.
भागवत बोर्डे यांनी फुलवलेली माळरानावरील आंब्याची बाग
भागवत बोर्डे यांनी फुलवलेली माळरानावरील आंब्याची बाग

मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर दगडालाही पाझर फुटतो असे म्हणतात. याच गुणांच्या जोरावर आणि नियोजनबद्ध पाण्याच्या व्यवस्थापनावर शंकरवाडी (जि. लातूर) येथील भागवत बोर्डे यांनी माळरानावर शेतीचे स्वप्न साकारले आहे. केळी, आंबा आणि कलिंगडाच्या शेतीने त्यांच्या शेतीचे अर्थकारण उंचावले आहे.

लातूर जिल्ह्यातील शंकरवाडी (ता. चाकूर) हे हे निव्वळ खडकाळ जमिनीवर वसलेले गाव आहे. येथील बहुतांश जमिनी लालसर मातीच्या आहेत. गावातील भागवत बोर्डे यांची सहा एकर जमीन आहे. डोंगराळ स्वरूपाची जमीन असल्याने त्या प्रकारची पीकपद्धती घेणे गरजेचे होते. त्यादृष्टीने भागवत यांनी जमिनीची चांगली मशागत करण्यावर भर दिला. जमिनीची सुपीकता वाढवून आज ते माळरानावर चांगली हिरवाई फुलवू लागले आहेत.

आंबा बागेला दिले प्राधान्य केवळ दगडगोटे असलेल्या व पडीक अशा अडीच एकर माळावर आंब्याची बाग लावण्याचे ठरवले. जमिनीची चांगली सुधारणा केली. शक्य तेवढे दगडगोटे बाजूला करून घेतले. सन २००८ मध्ये २० बाय २० फूट अंतरावर खड्डे खोदले. केशर, बदाम आणि मलगोबा या जातींच्या एकूण ८० झाडांची लागवड केली आहे. खड्यात तलावातील गाळ, शेणखत व अन्य सेंद्रिय घटक वापरले. माळावरील पाणी खाली वाहून न जाता तिथेच मुरावे यासाठी आंब्याच्या दोन ओळीत चर खंदले. सन २०१५ च्या भीषण दुष्काळात पाणी कमी पडत असताना आवश्यकतेनुसार टँकरने पाणी विकत घेतले. ते टाकीत साठवले. त्यावर बाग जगवली. अलीकडील वर्षांत बाग चांगले उत्पादन देऊ लागली आहेत. आंब्याला गोडवा चांगला असल्याने चापोली व परिसरात मागणी आहे. भागवत यांचे किराणा मालाचे विक्री केंद्र असल्याने आंब्याचे मार्केटिंग सोपे होते. मागील वर्षी त्यांना या पिकातीन ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा दीड टन आंब्याची विक्री झाली आहे. साधारण ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दर मिळतो.   तळ्यातील गाळाचा वापर आपली जमीन सुपीक करण्यासाठी भागवत कायम प्रयत्नशील असतात. त्या दृष्टीने २०१५ मध्ये त्यांनी सुमारे ३०० ट्राॅली एवढा गाळ तळ्यातून आणला व शेतात पसरला. साधारण दर तीन वर्षांनी शक्य होईल त्यानुसार सुमारे १०० ,१५० व काही वेळा त्याहून अधिक ट्रॉली गाळ शेतात वापरला जातो. या जमिनीवर सोयाबीन, तूर व रब्बीची पिके घेतली जातात. सेंद्रिय शेतीवर जास्त भर दिला आहे. दरवर्षी एक एकरवर सहा ते सात ट्रॉली शेणखताचा वापर होतो. त्यासाठी लहान- मोठी आठ जनावरे जोपासली आहेत. आवश्यकतेनुसार गांडूळ खत विकत घेतले जाते.     कुटुंबाची साथ  शेतात सालगडी न ठेवता स्वतः व कुटुंबातील सदस्य शेतात कष्ट घेतात. सकाळचा व संध्याकाळचा वेळ ते न चुकता शेतीला देतात. त्यानंतर दिवसाच्या वेळेत विक्री केंद्राची जबाबदारी पाहतात. मात्र दिवसभर त्यांची पत्नी शेताचील व्यवस्थापन सांभाळते. मुलगा विशाल कृषी पदवीच्या अंतीम वर्षात शिक्षण घेत अाहे. साहजिकच त्याचीही साथ शेतीत मिळते. नवे विचार शेतीत आणणे शक्य होते. विशालने बाजारपेठेचा अभ्यास करीत यंदाच्या मे महिन्यात अर्धा एकरवर मल्चिंग व ठिबकवर मिरची लागवडीसाठी वडिलांना प्रेरित केले. मिरची लागण्यास सुरवात झाली आहे. यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. केळीने आत्मविश्वास उंचावला पारंपारिक पिकातून म्हणावे तसे उत्पन्न मिळणे कठीण असस्याचे लक्षात आल्यावर एक एकर क्षेत्र बागायती करून त्यात २००८ मध्ये केळी लागवड केली. त्यातही पाण्याचे सुयोग्य नियोजन महत्वाचे ठरले. आता एकरी २५ टनांपासून ते ३२ टन उत्पादनापर्यंत पोचणे त्यांना शक्य झाले आहे. एक एकरांत नियोजनबद्धरित्या चांगले उत्पन्न मिळाल्याने आत्मविश्वास वाढला.   दुष्काळात कलिंगडाने तारले सन २०१५ -१६ मध्ये राज्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत न खचताभागवत यांनी विंधन विहीर घेतली. त्यास पाणीही लागले. त्या आधारे फेब्रुवारी २०१६ मध्ये एक एकरात कलिंगडाची लागवड केली. विंधन विहिरीचे पाणी विहिरीत साठवून ठिबकद्वारे आवश्यक तेवढे पाणी दररोज देत राहिले. यातून १८ टन उत्पादन मिळाले. या वेळी बाजारात अावक कमी असल्याने व्यापाऱ्यांकडून किलोला १० रुपये दर मिळवण्यात ते यशस्वी झाले. यात एक ते दीड लाख रुपये उत्पन्न त्यांना दुष्काळातही मिळाले. 

पाण्याचे नियोजन एक विहीर व विंधन विहीर आहे. शेताशेजारीच तलाव असल्याने त्यास पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. उन्हाळ्यात विंधन विहिरीतील पाणी विहिरीत साठवले जाते. डोंगराळ भाग असल्याने बागेला पाणी देण्यासाठी दोन हजार लिटर क्षमतेची टाकी उंच ठिकाणी बांधली आहे. त्यात प्रथम पाणी साठवले जाते व आवश्यकतेनुसार ते ठिबकद्वारे झाडाला दिले जाते. माळरानावरील कष्टाला आले फळ माळरानावरील पडीक जमिनीतून आंब्याच्या पिकाद्वारे उत्पन्नाचा स्त्रोत सुरु झाला. केळी व कलिंगडातूनही दरवर्षी समाधानकारक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो. जमिनीची सुपीकताही वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माळरानावर हिरवाईचे स्वप्न साकारता आले. ॲग्रोवनचेही नियमित वाचन करतो. माझ्या भागाला अनुकूल कोणती नवी पिके घेता येतील त्यादृष्टीने ॲग्रोवनमधील माहिती मोलाची ठरते. संपर्क : भागवत बोर्डे, ९४०५७३९१३१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com