जळगाव : येथील जिल्हा परिषदेतर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून २०१२ पर्यंत आदर्श शेतकरी पुरस्कार दिले जात होते, पण ही परंपरा बंद झाली. जिल्हा परिषदेने पुन्हा ही परंपरा सुरू करावी, अशी मागणी मागील सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केली. पण अद्यापही या पुरस्कारांसंबंधीची तरतूद जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने केलेली नाही. यामुळे सदस्यांमध्ये नाराजी आहे.
जिल्हा परिषदेतर्फे यापूर्वी प्रत्येक तालुक्यातील प्रयोगशील, संघर्ष केलेल्या शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान केले जात होते. स्मृतिचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असायचे. परंतु २०१२ पासून ही परंपरा बंद पडली. मध्यंतरी म्हणजेच २०१४ मध्ये ही परंपरा पुन्हा सुरू झाली, परंतु जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने २०१५ साठी या पुरस्कारांबाबत तरतूद न केल्याने २०१५ पासून ही परंपरा पुन्हा खंडित झाली.
मागील जुलै महिन्यात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आदर्श शेतकरी पुरस्कारांची परंपरा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. सदस्य नानाभाऊ महाजन व इतरांनी ही मागणी उचलून धरली. त्यानुसार या पुरस्कारांसंबंधी तरतूद केली जाईल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी सभेत दिले होते. परंतु आता ऑक्टोबर महिना जवळ आला तरी तरतूद झालेली नसल्याचे समोर आले आहे.
जिल्हा परिषदेने आपल्या स्वनिधीचे (अर्थसंकल्प) अलीकडेच पुनर्विलोकन केले आहे. त्यात कृषी विभागासाठी तरतूद वाढवून पुरस्कारांसाठी निधी ठेवण्याची संधी जिल्हा परिषद प्रशासनाला होती. परंतु तशी कुठलीही तरतूद प्रशासनाने केलेली नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आता येत्या ११ ऑक्टोबरला आहे. या सर्वसाधारण सभेत सदस्य आदर्श शेतकरी पुरस्कारांचा मुद्दा मांडणार असून, प्रशासनाला जाब विचारणार असल्याची माहिती मिळाली.