पिकं हातची गेली, शिवारात फक्त हिरवा पाला

मी तुरीत मुगाची पेरणी केली होती. मुगाचे पीक वाया गेल्यात जमा आहे. आता फक्त तुरीलाच पावसाचा फायदा होईल. पूर्वहंगामी कापूस पिकातही रोगराई असल्याने उत्पादन खर्च वाढला. पावसाचा खंड आमच्याकडे जवळपास २५ दिवस होता. - अतिष रामचंद्र पाटील, शेतकरी, गाळण, ता. पाचोरा
गोजोरे, ता. भुसावळ ः सुनसगाव ते गोजोरे यादरम्यानच्या एका हलक्‍या जमिनीत उडदाचे पीक पिवळे पडले आहे.
गोजोरे, ता. भुसावळ ः सुनसगाव ते गोजोरे यादरम्यानच्या एका हलक्‍या जमिनीत उडदाचे पीक पिवळे पडले आहे.

पावसाचा खंड २२ ते २४ दिवसांचा राहिला. हव्या त्या वेळी उडीद, मूग, मका पिकाला पावसाचे पाणी मिळालेच नाही. फूल गळ झाली. मुरमाड भागात तर पिके पिवळी, काळी पडली. तूर वगळता कडधान्य पिके हातची गेली आहेत. आता पाऊस आला तरी त्याचा लाभ फक्त कापूस, ज्वारी, तुरीला होईल. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचे दिवस कमीच राहिले, अशा हताश प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. 

‘ॲग्रोवन’ने पावसाचा खंड व पीकस्थिती याबाबत जिल्ह्यातील जामनेर, भुसावळ व जळगाव तालुक्‍यांतील काही गावांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली. तसेच पाचोरा, चाळीसगाव आदी भागातील पीकस्थितीची माहिती ‘ॲग्रोवन’चे वाचक, शेतकरी यांच्याकडून जाणून घेतली. त्यात खरिपाबाबत समाधानकारक स्थिती नसल्याचे समोर आले आहे. जळगाव तालुक्‍यातील शिरसोली, जळके, विटनेर भागातील हलक्‍या व मुरमाड जमिनीत कोरडवाहू कापूस, कडधान्य पिकांची वाढ पुरती खुंटली. मागील आठवड्यात मध्यम व जोरदार पाऊस झाला. पण उडीद, मुगात फूल गळ होऊन फुले कोरडी झालेली दिसली. 

पुढे जामनेर तालुक्‍यातील पळासखेडे, मोहाडी, नांद्रा, नेरी दिगर भागातही जळगावपेक्षा वेगळी स्थिती नव्हती. सकाळपासून पाऊस असल्याने शिवार सुने सुने होते. काही गुराखी, शेळीपालक आपल्या पशुधनासह रस्त्यावर दिसले. या भागात कोरडवाहू कापसाची उंची दीड ते दोनच फूट आहे. त्याला ना पाते आहेत ना फुले. काही काळी मातीमिश्रीत भागात मुगाचे पीक हिरवे दिसत होते. परंतु त्याला हव्या तशा शेंगा नव्हत्या. पळासखेडे येथे दूध उत्पादक अधिक आहेत. हिरवा चाऱ्यासाठी त्यांना वणवण फिरावे लागत असल्याचे जाणवले.

कारण पावसाचा खंड असल्याने हिरव्या गवताची टंचाई निर्माण झाली आहे. ज्वारीचे पीक किंचीत शेतांत दिसले. ती निसवणीवर आलेली. पण तिचा बुंधा बारीक पडला आहे. निसवण रखडल्याची स्थिती होती. पळासखेडे - विटनेरदरम्यानचा विटनेरनजीकचा तलावही कोरडाच दिसला. शेळ्या, पशुधन त्यानजीक चरत होते. दोन वर्षे हा तलाव कोरडाच असल्याचे शेळीपालक सोमा नाईक म्हणाला. 

पुन्हा जळगाव तालुक्‍यात प्रवेश केला. उमाळे, कंडारी या गावांमध्ये हलक्‍या व मुरमाड जमिनीत काही शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापसाचे पीक चांगले वाढविले आहे. काहींनी मागील दोन तीन दिवस सिंचन केल्याचे कळले. त्यात पुन्हा पावसाचे पाणी. कैऱ्या सडण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कोरडवाहू कापूस पीक या भागात कमीच होते. पुढे भुसावळ तालुक्‍यातील कुऱ्हे पानाचे, गोजोरा, वराडसीम, सुनसगाव भागात पाहणी केली. या भागातही लाल माती मिश्रीत मुरमाड जमिन आहे.

काही शेतांमध्ये उतार अधिक असल्याने या शेतांमध्ये उडदाचे पीक अगदी पिवळे पडले होते. मुगाला बारीक शेंगा दिसत होत्या. झाडाखाली कोरड्या फुलांचा थर साचलेला होता. पावसाअभावी ज्वारीची कणसेच बाहेर पडलेली नव्हती. काही शेतकऱ्यांनी कापसात उडदाची पेरणी केलेली होती. अशा शेतांमध्ये पीकस्थिती बरी दिसत होती. पण उडदाला हव्या तशा शेंगाच नव्हत्या. 

प्रतिक्रिया माझे कोरडवाहू कापसाचे पीक दोन फुटांपर्यंत वाढले आहे. पण त्याला ना पाते लागले आहेत ना फुले. आमच्या भागात मुरमाड जमीन असल्याने कडधान्य पिकांना मोठा फटका बसला. तुरीचे पीक बरे येईल, असे दिसते.  - सुभाष काळे, शेतकरी, कुऱ्हे पानाचे, ता.भुसावळ

माझे पूर्वहंगामी कापसाचे पीक तेवढे बरे दिसत आहे. परंतु कडधान्य पिके तर हातची गेली आहेत. आता पाऊस आला, पण त्याचा लाभ कडधान्याला होणार नाही. कारण फुले गळून पडली. अनेक ठिकाणी पीक पिवळे पडले.  - संदीप पाटील, शेतकरी, पिंपळगाव गोलाईत, ता. जामनेर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com