काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा उमेदवार आत्तापर्यंत जाहीर

काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा उमेदवार आत्तापर्यंत जाहीर
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा उमेदवार आत्तापर्यंत जाहीर

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी उमेदवार जाहीर करण्यात सध्या तरी पुढे असल्याचे चित्र आहे. या दोन्ही पक्षांनी आतापर्यंत लोकसभेसाठी दोन याद्यांमधून प्रत्येकी बारा उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांची अद्यापही घोषणा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेस उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील आतापर्यंत १२ उमेदवार जाहीर झाले आहेत. दुसऱ्या यादीत दक्षिण मध्य मुंबईमधून माजी खासदार एकनाथ गायकवाड, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, शिर्डीतून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, धुळे येथून कुणाल रोहिदास पाटील, नंदूरबारमधून के. सी. पडवी, वर्धा येथून माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या कन्या अ‍ॅड. चारुलता टोकस आणि यवतमाळ वाशिममधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  त्याआधी पहिल्या यादीत काँग्रेसने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), माजी खासदार नाना पटोले (नागपूर), मिलिंद देवरा (मुंबई दक्षिण), प्रिया दत्त (मुंबई उत्तर मध्य) आणि डॉ. नामदेव उसेंडी हे (गडचिरोली-चिमूर) लोकसभा मतदारसंघातून यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसनेही आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी माढामधून माघार घेत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादीने प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल कोल्हे आधी शिवसेनेमध्ये होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. नाशिकच्या शेजारी असलेल्या दिंडोरीमधून धनराज महाले, बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.  राष्ट्रवादीने पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, कल्याणमधून बाबाजी पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हातकणंगले या ठिकाणी राजू शेट्टींना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने नगर शहरचे आमदार संग्राम अरुण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राष्ट्रवादी २२ जागा लढवणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील ४८ पैकी ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. लोकसभेसाठी धनगर, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम उमेदवार देऊन आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे. आघाडीच्या पहिल्या यादीत अकोला आणि सोलापूरच्या उमेदवारांचा समावेश नाही. या दोन्ही मतदारसंघांतून खुद्द प्रकाश आंबेडकर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com