औरंगाबाद जिल्ह्यात १३००० लिटर कीटकनाशक विक्री बंद

तेरा हजार लिटर कीटकनाशकांच्या विक्री बंदचे आदेश
तेरा हजार लिटर कीटकनाशकांच्या विक्री बंदचे आदेश

औरंगाबाद : कृषी विभागाच्या वतीने आजवर औरंगाबाद जिल्ह्यातील १९८ कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १३ हजार लिटर/किलो कीटकनाशकांवर विक्री बंदीचे आदेश देण्यात आले असून, ६६ कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.  यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करणाऱ्या व्यक्‍तींचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी सुरू झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी विभागाच्या वतीने जवळपास १९८ कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली, अजूनही तपासणीचे काम सुरू आहे. या तपासणीदरम्यान विविध कारणांवरून जिल्ह्यातील ६६ कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. काहींना त्यांच्याकडे आढळलेल्या त्रुटींसाठी विहित मुदतीत त्याविषयीचा पुरावा सादर करण्याची संधीही देण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान १३ हजार लिटर/किलो कीटकनाशकांवर विविध कारणांवरून विक्री बंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

बिगरनोंदणीकृत प्रॉडक्‍ट हद्दपार यवतमाळच्या घटनेनंतर शासनाच्या वतीने काही अपेक्षित बाबींच्या अनुषंगाने शासन आदेश निर्गमित करण्यात आला. त्याला अनुसरून कृषी विभागाच्या वतीने असे प्रॉडक्‍ट आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र निर्गमित करण्यात आले. या पत्रामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील यंत्रणेच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्रांना बिगरनोंदणीकृत प्रॉडक्‍टविषयी सजग करण्यात आले. परिणाम स्वरूप जिल्ह्यातील सर्वच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बिगरनोंदणीकृत प्रॉडक्‍ट जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली.  ग्रामसभांच्या माध्यमातून जागर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमधून ग्रामसभांच्या माध्यमातून कीटकनाशकांचा वापर, घ्यावयाची काळजी या प्राधान्याच्या विषयासह इतर शेतीविषयक प्रश्नांवर शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. नॉन बीटी लागवड करणे, फरदड न घेणे, कीटकनाकाशके फवारताना घ्यावयाची आदर्श काळजी, आदी ठराव या अनुषंगाने घेण्यात आले. दोषी आढळणाऱ्यांवर कारावाईसोबतच यवतमाळसारखे प्रकार आपल्याकडे घडू नये यासाठी प्रत्येक ग्रामसभेतून फवारणीची कामे सतत करणाऱ्या शेतकरी व मजुरांची माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांचे प्रबोधन व प्रशिक्षणाचा मानस असून फवारणीची गरज, केवळ व्यावहारिक नफ्याचा उद्देश ठेवून कृषी निविष्ठांची विक्री होता कामा नये, यासाठी यंत्रणा व कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या समन्वयातून काम सुरू असल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com