आखातात १८ हजार टन केळी निर्यात

केळीची जळगाव व नंदुरबार आणि सोलापुरातून प्रतिदिन २० ते २२ कंटेनर निर्यात आखाती राष्ट्रांमध्ये सुरू आहे. आखातातून केळीला मागणी कायम असून, दरही या हंगामात वाढले आहेत. सध्या केळीसंबंधी चित्र चांगले आहे. परंतु पुढे पाणीटंचाईमुळे आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील केळी लागवड घटल्याने केळीचा तुटवडा भासणार असून दर मात्र टिकून राहतील. - के. बी. पाटील, केळीतज्ज्ञ
केळी निर्यात
केळी निर्यात

जळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५ कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) याप्रमाणे सुमारे १८ हजार मेट्रिक टन केळीची आखाती देशांमध्ये निर्यात झाली आहे. सध्या आखाती राष्ट्रांमध्ये सरासरी प्रतिदिन २० ते २२ कंटेनर केळी निर्यात होत आहे. रमजानमुळे देशांतर्गत बाजारातही केळीचा उठाव वाढला असून, दरांवरील दबाव दूर झाला आहे. यातच पाणीटंचाईमुळे महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात मिळून सुमारे १० ते ११ हजार हेक्‍टरने केळी लागवड घटल्याचा अंदाज आहे.  महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातील केळीची काढणी जून, जुलैच्या सुरवातीपर्यंत पूर्ण होईल. यातच पाणीटंचाईमुळे आंध्र प्रदेशातील कडप्पा, कर्नूल, हजारीबाग, अनंतपूर या भागांत केळी लागवड कमी झाली आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्‍टरने केळी लागवड घटली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात जुलै ते डिसेंबर यादरम्यान केळीचा तुटवडा भासू शकतो. जुलै-ऑगस्टमध्ये देशांतर्गत बाजारात केळीचे दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांची व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील केळीखालील क्षेत्र पाच हजार हेक्‍टरने घटून ८८ हजार हेक्‍टरवर येऊ शकते. आंध्र प्रदेशातील क्षेत्रही ६० ते ६५ हजार हेक्‍टरपर्यंत राहू शकते. थंडीने राज्यातील केळीला फटका बसला तर उष्णतेमुळे महाराष्ट्रसह, गुजरात, आंध्र प्रदेशातील केळीचे नुकसान होत आहे. यामुळे दर्जेदार केळी जुलैपासून पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाहीत.  सध्या महाराष्ट्रातून केळीची प्रतिदिन २० ते २२ कंटेनर एवढी निर्यात आखातात होत आहे. रावेर (जि. जळगाव) येथून प्रतिदिन १० कंटेनर, शहादा (जि. नंदुरबार) येथून प्रतिदिन सहा कंटेनर आणि टेंभूर्णी (जि. सोलापूर) भागातून प्रतिदिन चार कंटेनर निर्यात होत आहे. निर्यातीच्या केळीचे दर मागील आठ ते दहा दिवसांत क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढले असून, सध्या कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर रावेर, जळगाव, शहादा भागांतील केळी उत्पादकांना खरेदीदार देत आहेत. जळगाव जिल्ह्यात १० आघाडीच्या केळी निर्यातदार कंपन्यांकडून निर्यात सुरू आहे. तर नंदुरबारमध्ये सहा कंपन्या केळी निर्यातीसाठी कार्यरत आहेत. आखातातून प्रतिदिन ३० ते ३५ कंटेनरची मागणी आहे. तेथील मोठ्या खरेदीदारांना फिलिपिन्समधून सध्या केळी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. देशात आंध्र प्रदेश वगळता गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून बऱ्यापैकी केळी उपलब्ध होत आहे, अशी माहिती मिळाली.   मागणी कायम देशांतर्गत बाजारात काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशातून खानदेशात केळीसंबंधी मागणी कायम आहे. फैजपूर (ता. यावल), सावदा (ता. रावेर), मुक्ताईनगर भागातून प्रतिदिन पाच ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळी काश्‍मिरात पाठवली जात आहेत. १३ व १६ किलो क्षमतेच्या बॉक्‍समध्ये पॅकिंग करून तेथे केळी पाठवली जात असून, या दर्जेदार केळीला प्रतिक्विंटल १३०० रुपयांपर्यंतचे दर थेट जागेवर शेतकऱ्यांना मिळत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com