अकोला ः अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अखत्यारीत असलेल्या अकोला व वाशीम जिल्ह्यातील सुमारे २० हजार सभासद शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अातापर्यंत लाभ देण्यात अाल्याची माहिती मिळाली.
शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शेतकऱ्यांची ‘ग्रीन यादी’ उपलब्ध करून दिल्यानंतर त्यामधील उपरोक्त शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांचे कर्जखाते कर्जमुक्त करण्यासाठी प्रक्रिया वेगाने राबवली जात अाहे.
कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अात्महत्या सातत्याने होत अाहेत. त्यातच शेतीमालाची उत्पादकता घटणे, भाव न मिळणे असे प्रकार होत अाहेत. यावरून विरोधकांनी सर्वत्र रान उठविल्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजनेअंतर्गत कर्जमाफी घोषित केली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी अाॅनलाइन अर्ज मागविण्यात अाले होते. या शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननी केल्यानंतर याद्या अापले सरकार पोर्टलवर अपलोड करण्यात अाल्या होत्या. याद्यांमधील नावे माहिती तंत्रज्ञान विभागाने विविध पातळ्यांवर तपासून त्यानंतर त्यास अंतिम मान्यता देण्यात अाली. त्यानुसार जाहीर झालेल्या ग्रीन यादीतील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात अाली.
‘ग्रीन यादी’त समावेश असलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची, खात्यांची अाणि कर्जांची पडताळणी केल्यानंतर मध्यवर्ती बॅंकेने दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली. बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंत अकोला व वाशीम जिल्ह्यातील मिळून सुमारे २० हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची खाती कर्जमुक्त झाली अाहेत. ही प्रक्रिया अविरत सुरू राहणार असून, अंतिम गोषवारा तयार व्हायला वेळ लागणार अाहे.
एकीकडे जिल्हा बँकेचे खातेदार कर्जमुक्त होत असताना दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकांच्या खातेदारांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जात अाहे. एवढ्याच संख्येत खातेदार कर्जमुक्त झाले अाहेत; परंतु यासंदर्भातील अाकडेवारी अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. कर्जमाफीसाठी जवळपास १०० कोटींचा अाकडा पोचला आहे.
शासनाने घोषित केलेली कर्जमाफीची मुदत २५ नोव्हेंबरला संपली. या मुद्यावरून विरोधक पुन्हा एकदा सरकारवर टीका करत अाहेत; मात्र दुसरीकडे सरकारने यंत्रणांना कामाला लावले असून, खाती कर्जमुक्त केली जात अाहेत. क्षणाक्षणाला ही अाकडेवारी व कर्जमाफीची रक्कम बदलत अाहे.