पुणे विभागात रब्बीची २४ टक्के पेरणी

मोडकसागर धरण, संग्रहित छायाचित्र
मोडकसागर धरण, संग्रहित छायाचित्र

पुणे : यंदा खरिपातील अखेरच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विभागातील शेतकऱ्यांनी आता रब्बीची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या १७ लाख ३६ हजार ४८ हेक्टरपैकी चार लाख १२ हजार ५७७ हेक्टर म्हणजेच २४ टक्के पेरणी झासल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

चालू वर्षी खरीप हंगामातील जून, जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी भागात खरिपातील पिके वाया गेली आहेत. उशिराने झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, काढणीच्या अवस्थेत रोग, किडीचा झालेल्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट आल्याचे चित्र आहे; परंतु हंगामात झालेल्या पावसामुळे धरणे भरल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात लागणारी पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.

यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने रब्बी ज्वारीच्या पेरण्या खोळबल्या होत्या; परंतु उशिराने का होईना काही शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली आहे. त्याचबरोबर खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाकडे शेतकऱ्यांचा ओढा अधिक असल्याने हरभरा आणि गव्हाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

सध्या नगर जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन, बाजरी, मका, भूईमूग या पिकांची काढणी सुरू आहे. कापूस पिकांची बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी वेचणीचे कामे सुरू आहेत. तूर पीक फुले व शेंगा लागणेच्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी रब्बी हंगामाचे मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी वापसा आहे, तिथे पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ज्वारी, गहू, मका, हरभरा या पिकांची सरासरीच्या सहा लाख ४५ हजार ९९ हेक्टरपैकी १ लाख ८९ हजार ६२४ हेक्टर म्हणजेच २९ टक्के पेरणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात बाजरी, मका, भूईमूग, सोयाबीन या पिकांची कापणी अंतिम टप्प्यात आहे. पश्चिमेकडील पट्ट्यात भातपीक काढणीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी रोग, किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे; तर बारामती, दौंड, शिरूर, आंबेगाव, जुन्रर, हवेली या तालुक्यात रब्बी ज्वारीच्या पेरणीस सुरवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या चार लाख ४ हजार ७३ हेक्टरपैकी ८२ हजार २०६ हेक्टर म्हणजेच २० टक्के पेरणी झाली आहे.

सोलापूरमध्ये बाजरी, मका, सोयाबीन, सूर्यफूल, भूईमूग या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या सहा लाख ८६ हजार ८७६ हेक्टरपैकी एक लाख ४० हजार ७४७ हेक्टर म्हणजेच २० टक्के पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com