अडीच हजार कोटींचे नुकसान अन् मदत शून्य

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः बोंड अळीग्रस्त कापूस तसेच धान उत्पादकांना मदत जाहीर करण्यात आली. परंतु संत्रानगरीत झालेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे मुख्य पीक असलेल्या संत्रा फळाच्या नुकसानीबद्दल कोणत्याही लोकप्रतिनिधीने ब्र शब्दही काढला नाही. परिणामी संत्रा उत्पादकांना वालीच नसल्याची भावना संत्रा उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे. देशात नऊ लाख हेक्‍टर तर विदर्भात दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. यातील ८० ते ९० हजार हेक्‍टर क्षेत्रावरील झाडे ही उत्पादनक्षम असल्याचे राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था सांगते. विदर्भाची वार्षिक उत्पादकता आठ ते नऊ लाख टन इतकी आहे. दरम्यान या वर्षीच्या हंगामात संत्रा उत्पादकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मृग बहरातील संत्रा घेणाऱ्या शेतकऱ्यांना अवेळी आणि अनियमित पावसामुळे नुकसान सोसावे लागले. २८ मे २०१७ रोजी झालेल्या अवेळी पावसामुळे मृग बहराचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर वातावरणातील बदल आणि तत्सम कारणांमुळे आंबिया बहरात फळगळ झाली. आंबिया आणि मृग बहरातील संत्र्याचे ११०० कोटी रुपयांचे नुकसान एकट्या अमरावती जिल्ह्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञ वर्तवितात. अचलपूर तालुक्‍यात आंबिया बहरातील फळगळीमुळे ८५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. तर नागपूर जिल्ह्यातही संत्रा फळगळीमुळे एक हजार कोटींपेक्षा अधिकची हानी झाल्याचा अंदाज आहे.

अधिवेशनातून संत्रा हद्दपार दरवर्षी संत्रा दर, फळगळीमुळे झालेले नुकसान असे मुद्दे संत्रानगरी अशी ओळख असलेल्या नागपुरात होणाऱ्या अधिवेशनात उचलले जातात. या वेळी मात्र विदर्भातील मंत्र्यांकडून या मुद्द्यांवर साधा ब्र शब्दही काढण्यात आला नाही, त्यामुळे संत्रा उत्पादकांमध्ये नाराजी आहे. अडीच ते तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान आंबिया आणि मृग बहरात झाल्याचा अंदाज संत्रा उत्पादक वर्तवितात. कापूस, धान उत्पादकांना दिलेल्या मदतीचे स्वागत होत असताना सरकारने आम्हालाही विचारात घ्यावे, अशी अपेक्षा संत्रा उत्पादकांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्‍त केली आहे.

संत्रा पट्ट्यातील आमदारांनी या प्रश्‍नांवर साधलेली चुप्पी बरीच बोलकी आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना कोणी वालीच नसल्याचे सिद्ध होते. आंबिया बहरातील संत्र्याला वातावरणातील बदलाचा फटका बसत फळगळ झाली. अमरावती जिल्ह्यात तर या संदर्भाने सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. हे काम सर्वेक्षणापुरतेच मर्यादित राहिले आणि मृग बहरातील नुकसानीची दखलच घेण्यात आली नाही. - रमेश जिचकार, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी,  वरुड, जि. अमरावती. अमरावतीसोबतच नागपूर, अकोला आणि वाशीम

जिल्ह्यांतदेखील संत्रा उत्पादक आहेत. परंतु अमरावती जिल्ह्यात सर्वेक्षणाचे आदेश झाले आणि उर्वरित जिल्ह्यांत यंत्रणेच्या हालचालीच नाही. एकच पीक आणि वातावरणदेखील सारखेच असताना एका जिल्ह्याला एक न्याय आणि एकाला वेगळा हे धोरणच शेतकऱ्यांच्या मुळाशी उठणारे आहे. सरकारने संत्रा उत्पादकांना दिलासा देण्याकरीता मदत जाहीर करावी. - मनोज जवंजाळ, संत्रा उत्पादक, काटोल, जि. नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com