मुंबई : सार्वजनिक वितरण प्रणालीच्या डिजिटलायझेशनमुळे दरमहा ३८ हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाली आहे, तर उद्योग विभागाच्या ‘मैत्री’ प्रकल्पाच्या माध्यमातून ९० हजार कोटींच्या प्रकल्पांना फायदा झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. १) सांगितले.
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केलेल्या डिजिटलायझेशनमुळे सध्या राज्यात २.५ कोटी रेशन कार्ड डिजिटल झाली आहेत. आधार लिंकिंगमुळे सुमारे दहा लाख शिधापत्रिका कमी झाल्या आहेत. तसेच ‘आपले सरकार’ या पोर्टलवर तक्रार निवारण प्रणालीमध्ये एकूण १.७७ लाख ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ९५ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
तसेच रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी झाली असल्यास त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सात-बारा संगणकीकरण ९७ टक्के पूर्ण झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड हे तीन जिल्हे वगळता इतर ठिकाणी ऑक्टोबरपासून सात-बारा देण्यास सुरवात होईल, असे त्यांनी सांगितले.