कृषिपंपधारकांची बिले तपासून दुरुस्त होणार

कृषिपंपधारकांची बिले तपासून दुरुस्त होणार
कृषिपंपधारकांची बिले तपासून दुरुस्त होणार

मुंबई : राज्यातील सर्व ४१ लाख शेतीपंपधारक वीजग्राहकांची वीजबिले १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत तपासून दुरुस्त व अचूक करण्यात येतील. त्यानंतर अचूक वीजबिलांच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना राबविण्यात येइल. तसेच राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनांची वीजबिले १.१६ रुपये प्रति युनिट या दराने भरून घेतली जातील व या सर्व उच्च दाब वीजग्राहकांच्या बिलांमधील थकबाकी १५ ऑगस्टपर्यंत निकालात काढण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी इरिगेशन फेडरेशनच्या धडक मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली. निर्णयामुळे राज्यातील सर्व शेतकरी वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इरिगेशन फेडरेशनच्या वतीने शेतकरी वीजग्राहकांचा धडक मोर्चा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाचे व शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केले. शिष्टमंडळामध्ये एन. डी. पाटील यांच्यासह प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील व अरुण लाड हे सहभागी होते. या बैठकीमध्ये व चर्चेमध्ये आ. गणपतराव देशमुख, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर आदी आमदार सहभागी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दिवाकर रावते, चंद्रकातदादा पाटील, ऊर्जा सचिव अरविंद सिंग, संजीव कुमार, अभिजित देशपांडे आदी उपस्थित होते.

शेती पंप वीजबिले तपासून दुरुस्त करण्याचा निर्णय झाल्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी वीजग्राहकांची बिले किमान ४५% ते ५०% कमी होतील, असा दावा प्रताप होगाडे यांनी केला आहे. तसेच गेल्या ३ वर्षांत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३ वेळा शेतीपंप वीज दरात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी वीजग्राहकांच्या दरात व थकबाकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी वीज ग्राहकांचे शासकीय सवलतीचे वीजदर पुढील कालावधीसाठी १५ ऑगस्टपर्यंत नव्याने निर्धारीत करण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला. इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सर्वपक्षीय मोर्चामध्ये राज्यातील विविध उपसा सिंचन योजनांबरोबरच अन्य वैयक्तिक शेती पंप धारक मोठ्या संख्येने सहभागी होते. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इ. विविध पक्ष व संघटना सहभागी झालेल्या होत्या. प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा या जिल्ह्यांतील १० हजार हून अधिक शेतकरी आझाद मैदानावर सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com