आत्मातर्फे ८३९ गावांत शेतकऱ्यांना कामगंध सापळे देणार

आत्मातर्फे ८३९ गावांत शेतकऱ्यांना कामगंध सापळे देणार
आत्मातर्फे ८३९ गावांत शेतकऱ्यांना कामगंध सापळे देणार

परभणी ः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी परभणी जिल्ह्यातील ८३९ गावांतील प्रत्येकी पाच शेतकऱ्यांना एक एकर कपाशीच्या पिकांमध्ये लावण्यासाठी कामगंध सापळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बोंड अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या कीटकनाशकांच्या किमतीच्या ५० टक्के अनुदान थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) च्या माध्यमातून बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे, या संदर्भात आत्माच्या सूत्रांनी माहिती दिली.

परभणी जिल्ह्यातील ८४८ गावशिवारांमध्ये १० जूनच्या आधी लागवड केलेले कपाशीचे पीक पाते, फुले लागलेल्या अवस्थेत आहे. अनेक गावशिवारातील कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असल्याचे सर्वेक्षणात आढळून येत आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, आत्माचे उपसंचालक के. आर. सराफ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागातर्फे पीक पाहणीच्या माध्यमातून बोंड अळीचे सर्वेक्षण केले जात आहे. सध्या आढळून आलेल्या बोंड अळीच्या नियंत्रणासाठी तसेच १० जून नंतर लागवड केलेल्या कपाशीच्या पिकांवर बोंड अळीचा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांची माहिती शेतीशाळा, प्रक्षेत्र भेटीच्या माध्यामातून शेतकऱ्यांना दिली जात आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील प्रत्येकी एका गावशिवारात प्रत्येकी १०० हेक्टर कपाशीमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या अंतर्गत बोंड अळीच्या पतंगाचे मास ट्रॅपिंग करण्यासाठी हेक्टरी २० या प्रमाणे कामगंध सापळे लावण्यात येत आहेत. आत्मातर्फे उर्वरित ८३९ गावांमधील निवड शेतकऱ्यांच्या कपाशीमध्ये कामगंध सापळे लावण्यात येणार आहेत.त्यासाठी प्रत्येक गावातून आत्महत्याग्रस्त शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकरी यांना प्राधान्य देण्यात पाच शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. या शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रावरील कपाशीवरील बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या प्रात्यक्षिक क्षेत्रासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातर्फे बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शिफारशीत करण्यात आलेले कीटकनाशक तसेच निंबोळी अर्काची खरेदी केल्यानंतर किमतीच्या ५० टक्के अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) च्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून प्राप्त झालेले कामगंध सापळे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जात आहे, असे आत्माच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com